Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS
Showing posts with label गदिमा. Show all posts
Showing posts with label गदिमा. Show all posts

मी वाजवीन मुरली

यापूर्वी मी या घटनेचा उल्लेख केला आहे पण आज त्याच घटनेच्या तर्कसंगतीपर्यंत पोचणे आणि त्या पलीकडेही थोडं,.... असं काही घडल्याने, पुन्हा एकदा सुधीर मोघे.
आणि वसंत पवार.
आणि आता गदिमाही.

सुधीरजींशी ओळख झाली तेव्हाच केव्हातरी त्यांनी मला एका गाण्याच्या पहिल्या काही ओळी ऐकवल्या होत्या. गाणं खूप जुनं होतं. 'मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका…'

मी ते पहिल्यांदाच ऐकत होते. ते म्हणाले, " १९५३ सालच्या 'अबोली' चित्रपटात आहे. संगीतकार आहेत वसंत पवार. लक्ष देऊन ऐक. ह्या गाण्याची चाल हुबेहूब १९६० सालच्या 'अवघाचि संसार'मधील 'रूपास भाळलो मी…'ची आहे. दोन्ही चित्रपटांचे संगीत वसंत पवारांचेच असल्याने बाकी प्रश्न उद्भवत नाहीत. पण का एका संगीतकाराला आपलीच चाल अशी काही वर्षांनी परत वापरावी असं वाटलं असेल ?"

मला त्यांच्या कवितांविषयीचे त्यांचे मत माहीत होते. त्यांना वाटे, एका उर्मीतून जन्माला आलेली कविता अथवा गीतरचना, तशीच्या तशीच असू द्यावी. त्यात नंतर काही बदल करू नयेत. तसे बदल करायला त्यांचा विरोध असायचा. अगदी एखाद्या संगीतकाराने काही कारणाने त्यांना विनंती केली तरीही. एकदा निर्मिती झाली की तिला तिच्या नशिबावर सोडून कवीने पुढे जावं, असं त्यांना वाटे. त्यामुळे हे चाल परत वापरण्याचे त्यांना खूपच आश्चर्य वाटत होते.
मी म्हंटलं, "पवारांना, या चालीला म्हणावा तितका न्याय मिळाला नाही, असं वाटलं असेल. आणि 'रूपास भाळलो मी… 'चे रसिकांच्या मनातील स्थान पाहता, ही शक्यता अधिक वाटते."
"असेल कदाचित.", सुधीरजी म्हणाले.

या संभाषणामुळे "मी वाजवीन मुरली…'चे कुतुहल मात्र कायम जागृत राहिलं. पुढे त्याची संपूर्ण ध्वनीफित मिळाली आणि ते 'आठवणीतली गाणी'वर पोचलं.

गेल्या आठवड्यात 'अबोली' चित्रपटातील गीतांची चित्रफित यूट्यूबर बघायला मिळाली. त्याच चित्रपटात अजून एक गाणं  आहे. 'रिमझिम करी बरसात, मेघा" हे पं. सुरेश हळदणकर यांनी गायले आहे. त्यांचे सूर जणू या गाण्यात नुसते रिमझिम बरसत नाहीत तर कोसळून आपल्याला आनंदाने चिंब भिजवतात…. पण पडद्यावर चित्रपटाचा नायक मात्र बाथ टबमध्ये बसून शॉवरच्या धारांकडे बघून हे गाणं गाताना दिसतो. थोडक्यात गीताचे शब्द आणि चित्रिकरणाचा फारसा ताळमेळ नाही.
वसंत पवारांचे या चित्रपटाचं संगीत दुर्लक्षित राहिलं, असं परत एकदा वाटून गेलं.

यानिमित्ताने गेले काही वर्ष जितक्या वेळा 'मी वाजवीन…' ऐकलं, तितक्या वेळा या गीताच्या शेवटच्या कडव्यातील शब्दांनी माझं लक्ष न चुकता वेधून घेतलं. शब्द गदिमांचे आहेत.

गदिमा हे गीतकार आणि कवी यातली सीमारेषा पार मिटवून टाकतात. त्यांच्या गीतरचनांमधील काव्य, यावर पुष्कळ काही लिहिता येईल. तसंच त्यांनी लिहिलेलं एखादं चित्रपट गीत 'संतवाणी'ची उंची गाठतं.

राधाकृष्णाचे प्रेम, हा मध्यवर्ती विषय असलेले हे गीत, त्याच्या शेवटच्या कडव्यात वेगळं वळण घेते. हा चित्रपट सामाजिक असल्याने गीतातील 'राधा' आणि 'कृष्ण' ही अर्थातच रूपकं आहेत.

कृष्ण राधेला म्हणतो,
मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका
होऊनिया मुकी तू वाळूत काढ रेखा

या गीतरचनेत कृष्ण, त्यांच्या दोघांच्या प्रेमाला 'माया' असं म्हणतो.
खरं तर दोघं कालिंदीच्या तीरी आहेत. कदंब वृक्ष आहे. वाळूत काढलेलल्या रेघा आहे. ती दोघंच आहेत. तीसरं कुणीही नाही.  तरी तो राधेला म्हणतो,  'माया' तुझी नि माझी…
कालिंदीचा किनारा, ते शांत संथ पाणी
राधामुकुंद दोघे, तिसरे न तेथ कोणी
माया तुझी नि माझी सांगू नकोस लोकां !

पुढे जाऊन कृष्ण राधेला म्हणतो, जरी आपण आत्ता प्रेमिक असलो तरी-
मायेत याच दोघे, ये मायलेक होऊ
प्रीतीत याच राधे, होऊ बहीणभाऊ
प्रेमास बंध नाही, ही बंधने तरी का?

हे जे आपले प्रेम आहे राधे,…
आणि प्रेम म्हणजे जर एकमेकांत जीव अडकणे आहे….
तर जन्मांतरीच्या फेर्‍यात आपण कुठल्याही नात्याने समोर आलो, तरी ते तसंच राहील.
कधी माय-लेक असू, कधी बहिण-भाऊ, कधी प्रियकर-प्रेयसी…
कधी सखा-सखी तर कधी गुरू-शिष्य किंवा अजून काहीही.

राधा-कृष्ण यांच्या प्रचलित प्रेमसंबंधाच्या कल्पनेला, फक्त तीन ओळीत, पार उधळून लावत गदिमांनी त्याला खोल आणि व्यापक संदर्भ दिला आहे.

माया तीच आणि तेवढीच…. नात्याचं रूप काहीही असो !
प्रेमास बंध नाही, ही बंधने तरी का ?

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

गीत रामायण, गदिमा आणि शेक्सपिअर


( हा लेख २०१५ साली 'गीतरामायण हीरक महोत्सव स्मरणिका' - 'अवघ्या आशा श्रीरामार्पण' मध्ये प्रसिद्ध झाला आहे. आभार- सुमित्र माडगूळकर आणि समस्त माडगूळकर परिवार. )

गीत रामायणाचा हीरक महोत्सव आपण अतिशय आनंदाने साजरा करत आहोत. ही कलाकृती म्हणजे प्रतिभेचा अतुलनीय आविष्कार आहे. तसेच तीने लोकप्रियतेचेही उत्तुंग शिखर गाठलं आहे. गेली चार पिढ्या आणि सहा दशकं गीत रामायण मराठी मनावर अधिराज्य गाजवत आहे आणि पुढील अनेक शतके गाजवेल हेही निश्चित आहे. यातील हनुमंताच्या तोंडी असलेल्या ओळींमध्ये छोटासा बदल करून असं म्हणता येईल,
जोंवरि हें जग, जोंवरि भाषण
तोंवरि नूतन (गीत) रामायण


गीत रामायणाच्या शाश्वततेवर इतका ठाम विश्वास जेव्हा एवढा मोठा जनसमुदाय एकमताने ठेवतो, तेव्हा या विश्वासाचा आधार, वैश्विक पातळीवरील काही कलाकृतींमध्ये शोधता येतो का? असा एक विचार मनात आला. असं साहित्य, ज्यास शब्दश: शेकडो वर्षांचा इतिहास आहे आणि ज्यास जन-सामान्यांइतकीच भाषाप्रभूंची मान्यता आहे. अर्थात शेक्सपिअरपेक्षा मोठं नाव समोर येईना.

शेक्सपिअरचे लिखाण साधारणत: इ.स १५९० ते १६१३ या काळातले. इंग्रजी भाषेतले. तात्कालीन आंग्ल संस्कृतीचा प्रभाव आणि संदर्भित विषय असलेले. त्यामुळे गदिमांच्या गीत रामायणाशी त्याचे, ना विषयाचे ना संस्कृतीचे साम्य. पण दोन्हींमध्ये काही समान धागे आहेत. तसं आधुनिक काम आहे, सर्वमान्य आहे आणि कॅलेंडरची पानं झुगारून देण्याची क्षमता आहे. या अनुषंगाने गीत रामायण व शेक्सपिसरीअन साहित्य, यात शैलीची काही साम्यस्थळं शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्‍न आहे.

शेक्सपिअर यांनी लिहिलेल्या एकूण ३८ नाटकांपैकी ३४ नाटकांची बीजे / कथासूत्रे किंवा नाटक म्हणूनही, त्यांच्या आधी लिहिलेले होते. जसे रोमिओ-ज्युलिएट हे आर्थर ब्रूक यांनी १५६२ मध्ये लिहिले होते. किंग लिअर, मॅकबेथ इ. हॉलिंशेड्स्‌ क्रॉनिकल्स्‌ मध्ये १५८७ मधे ‍प्रकाशित झालेले होते. याची सप्रमाण माहिती उपलब्ध आहे. पण या मूळ कथाविष्कारांवर शेक्सपिअर यांनी आपल्या शब्दसंपन्‍नतेची अशी काही झळाळी चढवली की काळाचा ओरखडा त्यांवर ओढणे केवळ अशक्य.
रामकथेस हजारो वर्षांचा इतिहास आहे. अनेक व्यक्‍तींनी, विविध भाषांमधून, काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ती समर्थपणे मांडली आहे. वाल्मीकी, तुलसीदास, मोरोपंत ही त्यातील काही मोजकी, ठोस नावे. गदिमांनी या असंख्य वेळा अभिव्यक्‍त झालेल्या रामकथेचे, गीत रामायणाच्या रुपाने सोने केले ते निव्वळ आपल्या प्रतिभेच्या जोरावर. शब्दांची नादमधूर मांडणी, पटकथेसारखा असलेला कथानकाचा नाट्य / चित्रमय बहाव, यांच्या बळावर गीत रामायण दीर्घायू... चिरायु हे होणारच.

शेक्सपिअर हे त्यांच्या नाटकांसाठी जरी प्रामुख्याने ओळखले जात असले तरी त्यांचे वर्णन प्रथमत: कवी आणि मग नाटककार असे करता येईल. त्यांनी कविता / सुनितें (sonnets) ही कारर्किर्दीच्या सुरुवातीच्या काळात लिहिली. नंतरच्या काळात काव्य, त्यांच्या नाटकांचा जवळपास सत्तर टक्के भाग व्यापू लागले. त्यांच्या काव्यात जात्याच स्वर-तालांचा मेळ असतो. हा परिणाम साधण्यासाठी त्यांनी जी अनेक तंत्रे वापरली त्यातील एक प्रमूख तंत्र alliteration म्हणजे अनुप्रासांचा सुयोग्य आणि चौफेर वापर, हे होय. उदा.
१. “For as you were, when first your eye I eyed” (Sonnet 104)
२. “When to sessions of sweet silent thought
I summon up remembrance of things past” (Sonnet 30)
गदिमांच्या गीत रामायणातही नादांची गुंफण, ताल-स्वरांचे गुंजन भरून ओसंडते आहे. त्यांनीही अनुप्रासांचा भरगच्च वापर केला आहे. कुठलाही अट्टहास न करता, शब्दांचा सहज सुंदर खेळ करत हे साधणं, ही माडगूळकरांची signature style आहे. याची काही मोजकी उदाहरणे-
१. “कैक कैकयी करी नवसासी”
२. “दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला”
३. “जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात”
४. “प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट.. प्रभुचे लोचन पाणावती..”

अनुप्रासांचा मंजुळ खेळ जर श्रुति सुखावण्यासाठी आहे तर रूपकांचा (metaphor) प्रभावी वापर चित्र अधिक स्पष्ट करण्यासाठी... शब्दचित्राचे रंग गडद आणि गहिरे करण्यासाठी. Sonnet 73 मध्ये वार्ध्यक्यासाठी हेमंती निष्पर्णतेचे रूपक शेक्सपिअर यांनी वापरले आहे. ते म्हणतात,

“That time of year thou mayst in me behold
When yellow leaves, or none, or few do hang”
अयोध्येच्या प्रजाजनांच्या नजरेतून आदर्श असा जो नृपती- राजा दशरथ याचे वर्णन करताना गदिमांनी कल्पतरूचे रूपक वापरले आहे. ते म्हणतात,
“कल्पतरूला फूल नसे कां ? वसंत सरला तरी”
रूपकाचे आणिक काही गदिमा स्पर्श-
जेव्हा भरत कैकयीला विचारतो, “शाखेसह तूं वृक्ष तोडिला, फळां इच्छिसी वाढ”.
वाल्मीकींचे शिष्य म्हणून लव-कुश, “ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल.. वसंत-वैभव गाते कोकिल”

’हॅम्लेट’च्या आधीचे शेक्सपिअर यांचे लिखाण काहिसे अलंकारीक, शब्दबंबाळ वाटते. तो त्यांच्या कारकीर्दीचा पूर्वार्ध आहे. उत्तरार्धात मात्र साध्या, सोप्या, गेयता नसलेल्या शब्दांचा वापर सढळ आहे. अगदी टोकाची भावना व्यक्त करताना सुद्धा.. जसे राग, त्वेष, संताप. ’किंग लिअर’ या नाटकात, किंग लिअर आपली मोठी मुलगी गोनरील हिला म्हणतो, (जिने त्याचे राज्य घेऊन, त्याला घराबाहेर काढले आहे)
“... but yet thou art my flesh, my blood, my daughter; or rather a disease that’s in my flesh, which I must needs call mine” (अंक २, प्रवेश ५)
आणि हेच तर नेमके आपल्या गदिमांचे वैशिष्ट्य आहे. कुठेही शब्दांचे अवडंबर नाही. नेमक्या, मोजक्या शब्दांचा सहजाविष्कार.. मग भावना कुठलीही असो. हेच पहा ना, ’माता न तूं, वैरिणी’ मधे भरत कैकयीस म्हणतो,
“श्रीरामांते वल्कल देतां कां नच जळले हात ?
उभी न राही पळभर येथें, काळें कर जा वनीं”

शेक्सपिअर यांचे लिखाण आणि गदिमांचे गीत रामायण, यांच्यात आणखी एक महत्वाचे साम्य आहे, ज्याला इंग्रजीत coining a phrase म्हणतात. अनेक वाक्‍प्रचारांच्या / idioms च्या रुपात या दोघांनी आपल्या पावलांचे ठसे, त्यांच्या त्यांच्या भाषेवर उमटवले आहेत. ज्यांच्या लिखाणाने मुळातून भाषाच अधिक संपन्‍न व्हावी एवढे कर्तुत्व या दोघांचे आहे. अशा वाक्प्रचारांची यादी खरं तर खूप मोठी आहे. वानगीदाखल काही सांगायचे झाले तर-
शेक्सपिअर-
१. “all that glitters is not gold” (The Merchant of Venice)
२. “high time” (Comedy of Errors)
३. “what’s done is done” (Macbeth)
गदिमा (गीत रामायणात)
१. “अभिषिक्‍तातें गुण वय नाहीं”
२. “अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात”
३. “दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट”

याच सूत्राचा आधार घेत शेवटी असं म्हणेन, आजचे माझे हे लिखाण हा... एका मिणमिणत्या ज्योतीने, शब्दशारदेच्या आकाशातील या दोन तेजांची आरती करण्याचा एक नम्र प्रयत्‍न आहे.


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS