Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS
Showing posts with label अनुभव. Show all posts
Showing posts with label अनुभव. Show all posts

प्रेरणा

आज लहानपणीची शाळा आठवायचं कारण म्हणजे अर्थातच आजचा शिक्षक दिन.

आमच्या नाशिकच्या शाळेची दगडी इमारत लवकरच १०० वर्षांची होईल. 'गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल' किंवा 'शासकीय कन्या शाळा असं अत्यंत रूक्ष नाव असण्यार्‍या या शाळेने, सांगून होणारे 'शिक्षण' तर दिलेच पण न सांगता होणारे संस्कार जास्त दिले.

पूर्वी एकदा मी शाळेनंतरच्या आयुष्यात, माझी शाळा घेणार्‍या, माझ्या अनुभवांविषयी लिहिलं होतं.
कारण आता 'अभ्यास' या शब्दाचा अर्थ अधिक स्पष्ट आणि नेमका समजायला लागला आहे. 'धडे' पाठ्यपुस्तकांतून निघून जीवनाचे झाले आहेत. 'शिस्त' शब्दाने मनाच्या नियमनाची वाट धरली आहे.
तरी या सगळ्याची पायाभरणी शाळेत सुरू झाली, हे तर नक्कीच.

आमच्या शाळेत प्रार्थनेचा तास घड्याळ लावून एक तासाचा असायचा. अगदी सविस्तर.
मग ४५ मिनिटांचे इतर विषयांचे ८ ते ९ तास.

विषयांच्या तासांनी पुढे जाऊन मूल्यार्जनाची दिशा ठरवली. पण प्रार्थनेच्या तासाने जीवनातल्या मूल्यांची नीव ठेवली.

प्रार्थनेच्या तासाची सुरूवात राष्ट्र्गीत मग लगेचच 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत....' अशी प्रतिज्ञा घेऊन व्हायची. पुढे त्यात बरंच काही होतं.

आमची त्या तासात दर शनिवारी गायच्या समरगीतांची चांगली शंभर पानी वही होती. समूहस्वरात ही पदं त्या बालवयात म्हंटल्याने येणारी राष्ट्रभावना फार खोलवर रुजली. 'बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते..', 'भास्वर तुज सम भास्वर..',... सारखी अनेक अनवट समरगीतं, प्रेरणागीतं अजूनही तोंडपाठ आहेत. यातली काही आम्हाला शिकवायला तर स्वत: वसंत देसाई आले होते. याच पदांनी 'आठवणीतली गाणी'चा स्फूर्तीगीतांचा विभाग समृद्ध केला.

साने गुरुजींची 'भारतीय संस्कृती' याच तासात भेटली. गीतेचा बारावा आणि पंधरावा अध्याय संपूर्ण शाळेने एकत्र म्हणताना गुरुकुल संस्कृतीतील मंत्र पठणाचा अनुभव घेतला. हे किंवा यासरखे काही ना काही प्रत्येकाच्याच शाळेत असते.

पण आमच्या शाळेत प्रार्थनेच्या तासाला एक अशी गोष्ट करण्यात यायची की जिच्या वेगळेपणाची आणि असामान्य असण्याची जाणीव तेव्हाही होती आणि आजही आहे.

पद्धत अशी होती की प्रार्थनास्थळास जाण्यासाठी वर्गातून निघताना जेव्हा एका रांगेत आम्ही सगळ्या मुली उभ्या राहायचो, तेव्हा आम्हाला प्रत्येकीला विचारण्यात यायचं की, तू डबा घेऊन आली आहेस का?
कधी कुणी डबा आणायचं विसरतं, किंवा डबा घेऊन न येऊ शकण्याचं दुसरं कुठलंही कारण असू शकेल..
हे विचारण्याची जबाबदारी रोज पटसंख्येप्रमाणे फिरती असायची. मग त्या मुलीने वर्गातल्या फळ्यावर उजव्या कोपर्‍यात लिहून ठेवायचे- वर्गाच्या पटावर किती, त्यापैकी आज हजर किती आणि त्यातील किती जणींनी डबा आणलेला नाही.

हे अशासाठी की, सगळ्या वर्गाच्या हे दिवसभर लक्षात रहावं, आज आपल्या किती वर्गमैत्रिणी उपाशी राहाण्याची शक्यता आहे.
जेवणाच्या सुट्टीला सगळा वर्ग मोठ्ठा गोल करून एकत्र जेवायला बसायचा. शाळेला तीन भली मोठ्ठी पटांगणे असल्याने ते शक्य होतं. त्यावेळेस सकाळची ती मुलगी, जितक्या मुलींकडे डबा नाही तितक्या ताटल्या घेऊन वर्गाच्या गोलात फिरणार. प्रत्येक मुलीने त्यात आपल्या डब्यातल्या फक्त एक घास, प्रत्येक थाळीत ठेवायचा. या नियमामुळे डबा आणलेल्या मुलींना फक्त दोन-तीन घास कमी मिळायचे पण न आणलेल्या मुलींसाठी ते पन्‍नास-साठ घास पोटभर असायचे.

'एक तीळ सात जणांनी वाटून खावा.' हे फळ्यावर लिहिण्याचं केवळ एक सुभाषित झालं.
पण (शब्दश:) वाटून खाण्याची प्रथा, हे संस्कार झाले.
हे संस्कार माझ्यासाठी आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर दिशादर्शक ठरले.
'आठवणीतली गाणी'ची काही अत्यंत मोजकी प्रेरणास्थाने आहेत त्यात आमच्या शाळेचे स्थान फार वरचे आहे.
शाळेतील सर्व शिक्षकांना आजच्या शिक्षकदिनी आदरपूर्वक वंदन.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

दृष्टिकोन

काही लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या कलाकृतींबद्दल माझं ’जरा वेगळं मत आहे’, असं 'politically correct' म्हणू की ’त्या मला फारशा आवडत नाहीत’ इतकं सौम्य म्हणू की ’त्यांच्यामुळे माझी चिडचिड होते’ असं बेधडक म्हणू? - हा मोठा गहन प्रश्न मला पडला आहे. पण याकडे केवळ एक वैयक्तिक दृष्टीकोन म्हणून पहावे.
ज्या दोन गझलांचा मी उल्लेख करणार आहे, त्यांची ख्याती सर्वदूर आहे.

या उर्दू शेराने एका प्रसिद्ध गझलेची सुरुवात होते. गायक हा सरतेशेवटी गाण्याचा चेहरा होत असल्याने ही गझल श्री. जगजीत सींह यांची आहे.
शेर कसा गायला ह्या विषयी नाही तर त्याच्या विषयाशी मी असहमत असल्याने त्याचे रचियता ’इब्न-ए-इंशा’ या शायरचा मला उल्लेख करावा लागेल. त्यांचं नाव सहसा कुणाला माहिती नसावं.
कारण ’कल चौदहवीं की रात थी’ ही गझल जगजीतजींचीच.

कल चौदहवीं की रात थी शब भर रहा चर्चा तेरा ।
कुछ ने कहा ये चाँद है कुछ ने कहा चेहरा तेरा ।

आठ-दहा पुरुषांनी हातात ’साकी’ने भरलेला ’जाम’ घेऊन एका स्‍त्रीच्या शरीर सौंदर्याची चर्चा करत, मयखान्यात रात्र काढावी, हे मला फार भयानक वाटतं. त्या माणसांच्या रिकामटेकडेपणाची हद्द वाटते व त्या कुणा सौंदर्यवतीचे दुर्दैव. अलीकडच्या भाषेत ह्या वागण्याला ’sexist’ आहे असं म्हणतात किंवा हे 'objectification' आहे, असं म्हणतात. त्या कुणा सुंदरीला अशी चर्चा होणे नुसते आवडणारच नाही तर तिला तिचा हा सन्मान वाटेल, हा पुरुषी अहंकार या शेरात आहे. पुढे जाऊन जेव्हा..

हम भी वहीं मौजूद थे, हम से भी सब पूछा किए,
हम हँस दिए, हम चुप रहे....

यानंतर मी पूर्णत: disconnect होते.
मुळातून हे माझे इतके टोकाचे मत असताना, एखाद्या गाण्याच्या मैफलीत माझ्या आजूबाजूस बसलेले स्त्री-पुरुष, ही गझल सादर व्हायला लागली की, "वाह, वाह !" करायला लागतात. मग ही दाद त्या गायकाच्या गाण्याला आहे की या शेरात वर्णन केलेल्या वातावरणाला, हे मला कळत नाही आणि मी तिथून सरळ काढता पाय घेते.

दुसरी आहे ती ’अहमद फ़राज़” या गझलकाराची ’रंजिश ही सही”. मेहदी हसन साहेबांनी तिला अजरामर करून ठेवली आहे. त्यांचं भावपूर्ण सादरीकरण इतकं मनास भिडतं की (मला) गझलेचे शब्द अजिबात आवडत नसताना सुद्धा सूर मनात रुंजी घालत रहातात. दिवसभर पाठलाग करतात.

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ

कुछ तो मिरे पिंदार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रह-ए-दुनिया ही निभाने के लिए आ

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ

इक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिर्या से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझ को रुलाने के लिए आ

अब तक दिल-ए-ख़ुश-फ़हम को तुझ से हैं उम्मीदें
ये आख़िरी शमएँ भी बुझाने के लिए आ

ही पुन: एक स्वकेंद्रित रचना. स्वत:पुढे काहीच नाही. 'मला परत सोडून जाण्यासाठी ये.’, ’माझी समजूत काढायला ये.’, ’समाज-रीत पाळण्यासाठी ये.’, ’लोक काय म्हणतील म्हणून ये.’, ’मला परत एकदा रडवायला ये.’, पण ये....

ही प्रेयसी नुसती नाराज होऊन गेलेली नाही तर ती नाराज होऊन, सोडून गेली आहे. ही break-up situation आहे. त्यामुळे ही गझल फक्त कवितेच्याच मर्यादेत रहावी. प्रत्यक्षात असे मागे लागणे चीड आणू शकते. जिथे स्त्रियांच्या ’नाही’ म्हणण्याचा मान ठेवा, असे शिकवण्याची गरज आहे, तिथे हा हात धुवून मागे लागण्याचा सोहळा फार विरोधाभास निर्माण करतो.

पण या गझलेकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टीकोनापेक्षाही नुकतीच ती एका अशा अर्थाने माझ्यासमोर अचानकपणे आली की मी अक्षरश: स्तब्ध झाले. हातातले काम हातातच राहिले. हा नजरिया फार वेगळा होता. दूरचित्रवाणीवरील ’दोन स्पेशल’ कार्यक्रमात जितेंद्र जोशी मुलाखत घेत होते. समोर शुभांगी गोखले बसल्या होत्या. विषय त्यांचे दिवंगत पती मोहन गोखले यांचा चालला होता. तेव्हा शुभांगीताईंना अश्रू अनावर झाले आणि त्या म्हणाल्या,
"मोहन फार लवकर गेला. मला कधी कधी असं वाटतं की त्याला सांगावं, आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ, रंजिश ही सही ...."


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

विनवित मेघा तुला


आषाढ मासारंभ झाला की रसिकजनांचा 'आषाढ दर्द' जागा होतो.
हुरहुर, विरह, ओल्या सर्द हवेची न सोसणारी जडता, कवी शंकर रामाणींनी वर्णन केलेले डोळ्यांतले 'मूढ पाणी'.... आणि मेघदूत.
या आषाढ प्रतिपदेलाही अशीच कुणाचीतरी एक हळवी स्मृती जागी झाली आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या कुणी फारसं न ऐकलेल्या एका गाण्याने सोशल मिडिआचे जग व्यापून गेले.

'आठवणीतली गाणी'- ही आता केवळ 'एक संकेतस्थळ' म्हणण्याइतकी रूक्ष जागा राहिलेली नाहीये. असंख्य दर्दीजनांशी तिची भावनिक नाळ जोडली गेली असल्याने, माझ्याकडे या गाण्याची ध्वनिफीत लगेच पोचली. 'हे ऐक. वेगळं आणि चांगलं आहे. बाकी सगळं सोड आणि याच्या खोलात जा.' असं मला हक्काने सांगितलं गेलं.
आणि मग सुरू झालेला शोध....

आषाढाच्या पहिल्या दिवशी
अवचित दिसशी मला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

तप्तांचा तू असशी आश्रय
इंद्रसचिव तू, तू करुणामय
निरोप माझा घेउनी जाई अलकानगरीला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

प्रिया दूर मम, तिला भेटशी
मनी वाटते, नाही न म्हणशील
विफल विनवणी सुजनी बरवी, नको शठी सफला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

कुठला घ्यावा मार्ग प्रथम तो,
सांगुनी नंतर निरोप कथितो
दूत होवुनी पोचीव माझ्या दुःखी दयितेला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

या पदाचे गायक अभिषेकीबुवा असल्याने शौनकजींशी सगळ्यात पहिला संपर्क केला. ते फार तत्परतेने माहिती देतात. त्यांनी सांगितले, हे गीत 'गीत-मेघ' (अनुवादित 'मेघदूत') या दूरदर्शनवरील कार्यक्रमासाठी तयार केले गेले होते.

त्यांच्याशी संपर्क करत असताना एकीकडे माझा इंटरनेटवर शोध सुरू होताच.
फक्त एका लेखात या गीताचा संदर्भ मिळाला. लेख श्री. अरुण काकतकर यांनी २०१२ मधे लिहिला होता. लेखाचं नाव होतं 'पाऊसं पाऊसं, येता वाटतं हायसं'.
त्यांना फोन केला. ते म्हणाले, "दूरदर्शनवरील ह्या रूपकाचा प्रस्तुतकर्ता मीच होतो. यात एकूण सात गाणी होती. दोन बुवांची, दोन रामदास कामतांची, आणिक काही. निवेदन ज्योत्‍स्‍ना किरपेकर यांनी केले होते. दूरदर्शनकडे या कार्यक्रमाची चित्रफित आता नाही. पण माझ्याकडे ती सगळी गाणी आहेत. ती मी देईन."
न राहून शेवटी मी विचारलंच, "मला यातली एक ओळ अडली आहे. त्यातील शब्दांचे अर्थ मला माहिती आहेत. पण 'मेघदूत'चा माझा काही आभ्यास नाही. म्हणून संदर्भ लागत नाहीये."
त्यांनी लगेच सांगितले, मी हा प्रश्न डॉ. वसंतराव पटवर्धन (महाराष्ट्र बॅंकेचे माजी अध्यक्ष) यांना विचारावा. ते या पदाचे रचियता आहेत. आणि मेघदूताचे हे भाषांतरही त्यांनीच केले आहे. हा त्यांचा फोन नंबर.

आज सकाळी वसंतरावांशी बोलणे झाले. त्यांना विचारले,
"मी, 'विफल विनवणी सुजनी बरवी, नको शठी सफला' इथे अडले आहे. 'बरवी' म्हणजे चांगली. 'शठ' म्हणजे लुच्चा. पण संदर्भ लागत नाहीये."
ते म्हणाले, " 'मेघदूता'ची मराठीत सी. डी. देशमुखांसकट २६ जणांनी भाषांतरे केली आहेत. त्यातलं माझं- 'विनवित मेघा तुला' या नावाने आहे. हे पुस्तक आता उपलब्द्ध नाही. पण मी त्याची फोटोप्रत करून तुला देतो. ही ओळ ज्या संदर्भात येते, त्या मेघदूतातल्या ओळी अशा ..

(तेनार्थित्वं त्वयि विधिवशादूरबन्‍धुर्गतो हं)
याण्‍चा मोघा वरमधिगुणे नाधमे लब्ध्कामा ॥

(मी दुर्दैवाने माझ्या स्वजनांपासून दूर असल्याने तुलाच विनंती करतो. आणि कसं आहे,..)
एकवेळ सुजनांना केलेली विनंती 'विफल' झाली तरी चालेल, पण एका 'शठा'ला केलेली विनवणी 'सफल' होणे नको.
'विफल विनवणी सुजनी बरवी, नको शठी सफला'

ही अशी गाणी, त्यांबद्दलची सर्व माहिती देणारे असे हे सुहृद - मान्यवर, 'आठवणीतली गाणी'स अधिक श्रीमंत करतात.
ज्यांनी माझ्यापर्यंत हे गाणे पोचवले ते सर्व, श्री. शौनक अभिषेकी, श्री. अरुण काकतकर (वय वर्षे ७५) आणि डॉ. वसंतराव पटवर्धन (वय वर्षे ९२) यांच्या ऋणात मी व्यक्तीश: आहे.

टीप : हे पद ऐकण्यासाठी 'आठवणीतली गाणी'वर उपलब्द्ध आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Kilimanjaro Summit


रात्र गुरुपौर्णिमेची होती.
रात्र तेजस्वी चंद्राची होती,
दुर्बिणीतून खास निरिक्षण करावे अशा खग्रास चंद्रग्रहणाचीही होती....
रात्र समुद्रसपाटीपासून पंधरा हजार फुटांवरील आमच्या बेस कॅम्पवरून, नुसत्या डोळ्यांना स्पष्ट दिसणार्‍या लखलखीत आकाशगंगेची होती,
रात्र सुंदर होती......

रात्र वैर्‍याची नव्हतीच मुळी....
पण प्रचंड थंडीची होती. तापमापकातील अती वेगाने खाली घसणार्‍या पार्‍याच्या पातळीची होती.
हातापायांची बोटं गोठवणार्‍या बोचर्‍या वार्‍याची होती.
इतक्या उंचीवर असल्यामुळे हवेतल्या आणि त्यामुळे आमच्या रक्तात कमी झालेल्या प्राणवायूची होती.
पुढील १० तास शांतपणे, दृढतेने वर वर चढत जाण्याची तर होतीच होती....
रात्र summit climb ची होती......

रात्र उत्‍सुकतेची होती.
सखोल आणि जय्यत तयारीची होती..
मोजून ४ दिवसांपूर्वीच भेटलेल्या १५ जणांनी, एकमेकांना सांभाळत, सावरत, एकसंघ वागण्याची होती.

आम्ही आमच्या टोळीचं नाव 'Kili Ninjas' असं अगदी नुकतंच,
म्हणजे कालच्या सरावाच्यावेळी ठेवलं होतं. यातला 'Ninja' हा शब्द आमच्यातील लढाऊ वृत्तीशी, कृतनिश्चयी असण्याशी निगडीत असावा.

बडबडी, बिनधास्त, मलेशीयाची जॅकी, जपानची चिझा, पंजाबची रुपिंदर, काश्मिरचा अजय आणि त्याची २६ वर्षांची मुलगी अहिल्या आणि १६ वर्षांचा मुलगा अहान, मलेशीन असून तामिळ ब्राह्मण भारतीयाशी लग्न करून दोन मुलांची आई असलेली कॅरी, उत्तर भारतीय अरूण - या सगळ्यांचं वास्तव्य सिंगापूरला.... ते सगळे तिथून आलेले.
मी आणि आशय दुबईहून. जस्टीन अमेरिकेहून. केरळची मीरा सध्या इंडोनेशियात वास्तव्य असल्याने कौला लंपूरहून. डॉ. संजीव दिल्लीहून आले होते तर प्रेरणा आणि जयेश मुंबईहून.

अशा सगळ्यांची ही मोट,
पण एकाच उद्देशाने एकत्र आल्याने लवकरच बांधली गेली.
त्यात कालच्या सरावाच्या वेळी आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलेलं- एका ओळीत, लागून लागून चालावे. पुढच्या माणसाच्या पावलांकडे लक्ष द्यावे. डावा पाय - उजवा पाय हा ठेका सगळ्या ग्रुपचा सारखा असावा. आधी ट्रेकिंग पोल पुढे टेकवावा आणि मग पाय उचलावा, वगैरे सगळं तर होतंच..
..... आणि बरंच काही होतं.

चार दिवसात केलेली साडेदहा हजार फुटांची चढण होती...
त्यासाठी रोज केलेली दहा तासांची तंगडतोड होती..
एकमेकांबरोबर वाटून खालेला चॉकलेट, बदाम, खाखरा सारखा खाऊ होता.
एव्हाना tree-line, shrub-line मागे पडलेली होती. त्यांचा आडोसा होता तोपर्यंत ठीक होतं. पण आता फक्त वर एक आभाळ आणि खाली धरती, एवढंच काय ते उरलेलं. मग कोणी एकीने ओरडून सांगितलेलं "all guys look on the other side. we girls need a loo break." हेही होतं.

'किबो हट' बेस कॅम्‍पला दुपारी १ वाजता पोचलो असू. पाच तास चालणं आधीच झालं होतं. जेवण झाल्यावर आम्हाला आमच्या तंबूत विश्रांतीसाठी, तसंच रात्रीच्या तयारीसाठी पाठवण्यात आलं.
सगळे summit climbs रात्रीच सुरू होतात. आमचा मुहूर्त मध्यरात्री १२.३० चा, असा आदेश होता. 'रात्रीचं' जेवण 'संध्याकाळी' सहा वाजता मिळणार होतं. जेवण झालं की रात्रीची तयारी म्हणून अंगावर सगळे कपड्यांचे थर घालायचे आणि sleeping bag मध्ये चक्क झोपायचं ते साडे बाराचं बोलावणं येईपर्यंत.

(sleeping bag -३०°C तापमानासाठी योग्य असली तरी एवढ्याशा त्या तंबूतल्या सुळसुळीत तीच्यात झोपणं, खरं तर झोपण्याचा प्रयत्‍न करणं, तंबूतून आत बाहेर करणे.. याचं वर्णन हा एका वेगळ्या स्वतंत्र blog चा विषय असू शकतो.)

रात्रीची तयारी म्हणजे काय? हे नीट समजाऊन घेऊ. अशासाठी की या सगळ्यानंतर काही खाणं किंवा फोटो काढणं यातली निर्थकता लक्षात येईल-
​• तळपाय - blister proof socks एकावर एक. सर्वात शेवटी woolen जाड, असे तीन थर
​• पाय - base layer, fleece pants, trekking pants, shell pants
​• धड - base layer, t-shirt, fleece jacket, light down jacket, shell jacket​
​• डोकं - bandana, woolen cap, hood of down or shell jacket
• तळहात - liner gloves, fleece gloves, shell gloves
​• 2 trekking poles
​• headlamp
​• backpack मध्ये water bladder, energy bars.. बर्फावर चालण्यासाठी घालावयाचे, शूजवर लावायचे cleats..
अशी सगळी तयारी पूर्ण झाली.

"OK guys.. time to move" अशी साडे बारा वाजता हाळी आली आणि Kilimanjaro नावाच्या महाकाय पर्वताच्या शेवटच्या चढणीची सुरुवात झाली. हा सगळा चढ थेट, अंगावर येणारा आहे. सर्वाधिक काळ तो जमिनीशी ३० अंशाचा कोन करतो तर काही भागात तो ४५ अंशांपर्यंत जातो. असा चड चढण्याचं एक तंत्र असतं. टान्झानियाच्या स्वाहिली भाषेत त्याला 'पोले पोले' असं म्हणतात. आपण त्याला हळू-हळू किंवा पाऊल-पाऊल म्हणू शकतो. म्हणजे आपल्या स्वत:च्या पाउलाच्या लांबी इतक्याच अंतराची प्रत्येक स्‍टेप घ्यायची. असं करण्याने श्वास कधीही तोकडा पडत नाही. शांत, सावकाश पण ठाम असं चढायचं.
जोजेफ- आमचा सिस्‍टम गाईड पेस सेटर होता. सगळे त्याच्या मागे.


Kilimanjaro हा ज्वालामुखी पर्वत आहे. वर चढत त्याच्या मुखाशी पोचलं की पहिल्यांदा लागतो तो Gilman's point. इथपर्यंत पोचलं की तुम्ही Kilimajaro पर्वत चढला असं म्हणू शकता. त्या अर्थाचं प्रमाणपत्रं तुम्हाला मिळू शकतं. मग त्या crater च्या कडेकडेने चालायला लागलो की या पर्वताच्या सर्वाधिक उंचीच्या दिशेने जाऊ लागतो. इथे बर्फावर चालण्यासाठी cleats घालावे लागले. नंतर येतो तो Stella point. सगळ्यात उंचावर Uhuru peak. तिथे पोचायला सकाळचे १० वाजले. Gilman's point ते Uhuru peak हा प्रवास दोन तासांचा आहे. एव्हाना एकमेकांमधील अंतर प्रत्येकाच्या दमणूकीच्या प्रमाणात वाढत गेलेलं. पण १५ पैकी १४ जण थोडं पुढे-मागे का होईना Uhuru peak पोचलो. एक मात्र Gilman's point हून परत गेली.


Uhuru peak ला एक गंमत झाली. Kilimanjaro च्या इतिहासात घडली नसेल अशी गोष्ट घडली. रुपिंदरने माझ्याकडे तिची बॅकपॅक देत त्यातून लिपस्टिक काढली. एक छोटासा आरसा काढून त्यात डोकावत रीतसर ओठांवर लावली. डोक्यावरचा सगळा uniteresting पसारा काढून टाकला. एक छानशी हॅट घातली. एक रंगबेरंगी ओढणीही गळ्याभोवती घेतली. मग सुंदर pose देत स्वत:चे फोटो काढून घेतले.
खरं तर तिला bikini घालायची होती किंवा साडी नेसायची होती. तिचा हा बेत आम्ही आदल्या दिवशीच हाणून पाडला होता. -२० अंश तापमानात असलं काही आत्मघातकी ठरू शकलं असतं. पण या काही गोष्टी ती घेऊन आलीच.
व्यवसायाने wardrobe stylist असलेल्या रुपिंदरने हाही अनुभव खूप 'स्टाईल’ मध्ये घेतला.

Uhuru peak ची समुद्रसपाटीपासूनची उंची १९,३४१ फूट आहे. इतक्या उंचीवर हवेतील प्राणवायूचे प्रमाण कमी असते. त्याची आपल्या शरीराला सवय नसते. म्हणून इथे १५ मिनिटांपेक्षा अधिक कुणीच थांबू नये.
पण प्रत्येकाच्या येण्याच्या वेगवेगळ्या वेळा आणि मग फोटो यात आमची तब्बल ४५ मिनिटे गेली. ही अर्थातच मोठी चूक होती. त्यामुळे आमच्यापैकी चार-पाच जणांना altitude sickness चा त्रास झाला. एकाला तर oxygen देत खाली आणावे लागले.

डोंगर चढणे अवघड पण उतरणे सोपे.. अशी जर कुणाची समजूत तर ते बरोबर नाही. हे खरं की उतरण्यास वेळ कमी लागतो. पण loose, मुरमाड, तीव्र उतार असलेल्या जमिनीवरून उतरतानाची कसरत फार अवघड. दोन्ही ट्रेकिंग पोल्सचा आधार घेउनही उतरण्याच्या वेगावर आणि घसरण्यावर फार काही ताबा ठेवता आला नाही. बरेच वेळा आपटी खालली. सुरुवातीला 'किती वेळा' ते मोजायचा प्रयत्‍न केला. पण मग संख्या इतकी वाढली की मोजण्यात फारसा अर्थ उरला नाही. त्यात तासभर झालेली बर्फवृष्टी. अगदी मनापासून सांगायचं झालं तर ते पडणं आणि तो बर्फ हा माझ्यासाठी या ट्रेकचा high point होता.

बेस कॅम्पला परतायला दुपारचे दोन वाजले.. तिथे जेवण.
तिथली साडेपंधरा हजार फुटांची पातळी देखील राहण्यास योग्य नसल्याने पुढील पाच तासात बारा हजार फुटांवर उतरून रात्रीचा मुक्काम तिथे.


Kilimanjaro पर्वत चढण्याचा प्रयत्‍न करण्यार्‍यांपैकी फक्त ३५% Uhuru peak पर्यंत पोचतात, हे पाहिलं तर आम्ही आमचं Kili Ninjas हे नाव सिद्ध केलं, असं म्हणता येईल.

अशी ही summit climb च्या रात्रीची,
किंवा रात्रीची आणि नंतरच्या दिवसाची,
नव्हे एका रात्रीपासून दुसर्‍या रात्रीपर्यंतची कहाणी....

सुफळ आणि संपूर्ण.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Outsourcing


नवर्‍याचा सगळा दिवस checklists, check boxes आणि reminders यांवर चालत असतो. आणि नेमक्या याच कारणामुळे तो आता एका परिस्थितीत सापडला आहे.
त्याचं झालंय असं......

मी नं माझ्या नवर्‍याची peripheral memory आहे. म्हणजे external hard disk म्हणा नं...

या व्यवस्थेने एक साध्य होतं की त्याला 'office' या विषयाच्या परिघाबाहेर मुद्दामहून फार कमी लक्षात ठेवावं लागतं.
जसं काही- येऊ घातलेले सणवार, लग्नं-मुंजी-वाढदिवस, येणारे पाहुणे, असलं काहीही.... फक्त गरज असेल तेव्हा मला विचारावं.
नेहमीच्या नसलेल्या कोणाकडेही जाताना, त्यांना असलेली मुलं-बाळं, त्यांच्या घरी जाण्याचा रस्ता या सर्व गोष्टींवर मी त्याला गाडीत बसल्याबसल्या अद्ययावत करत असते.
असली माहिती फार काळ retain करण्याची गरज नाही असं त्याला वाटतं. तीचा वापर झाला की तितक्याच तत्परतेने विसरून जावी.

( हे सगळं कसं त्या शेरलॉक होम्स्‌ सारखं आहे. तो नाही का त्या डॉ. वॉटसनला म्हणतो, "Now that I know the Earth revolves around the Sun, I will make an every effort to forget it." कारण त्याच्या Science of deduction मध्ये या माहितीचा काहीच उपयोग नव्हता. )

त्यामुळे एक तर मी, नाही तर त्याच्या त्या checklists, यांवरच त्याला अवलंबून रहावं लागतं.

या याद्या बनवणं हा सुद्धा एक मजेशीर प्रकार असतो.
उदाहरणार्थ, वाणसामानाची यादी. या यादीतील प्रत्येक पदार्थाचं रंग-रूप वर्णन करून सांगावं लागतं.
जसं काही,
'१ किलो पोहे आणायचे आहेत. पण पोहे दोन प्रकारचे असतात. जाड आणि पातळ. मला जाड हवे आहेत. समोर आहेत ते नेमके जाड आहेत की पातळ हे तुला कळणार नाही. तिथे काम करणार्‍या माणसाला त्यांच्याकडे असलेले सर्व प्रकारचे पोहे दाखवायला सांग. त्यातले जे तुला relatively जाड वाटतील ते आण.’
किंवा ’कोबीच्या गड्ड्याचा diameter ५ इंचांपेक्षा जास्त नको.’

या सगळ्यात दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेला प्रकार काही बसत नव्हता.

मी पुण्यात असतानाची गोष्ट आहे. त्याने दुबईहून फोन केला आणि सांगितलं, "I love you."
इतकी उत्‍स्‍फूर्तता, असं व्यक्त होणं, त्याच्या स्वभावाचा भाग नसल्याने भांबावून मी पण म्हंटलं, "बरं मग? त्याचं आत्ता काय? झाली की लग्नाला कितीतरी वर्ष."
तरी त्याचं आपलं तेच.. "Today I have to tell you, I love you."
काही दिवसांनी परत तसाच फोन.. मग परत पुन्हा.... (मी मनात... फार प्रवास झाला वाटतं आपला एवढ्यात.. ... तब्येत बरी आहे ना याची... / .... वगैरे.)

दुबईत परत आले तरी तेच. पण यावेळेस वाक्य थोडं बदललं होतं. Today is Tuesday and I love you....
आता हा मंगळवार कुठून आला ?

शेवटी समोर बसवलं आणि हा काय प्रकार समजावून सांगायला लावला.
म्हणतो कसा, "नाही. नाही. मंगळवार तसा incidental आहे. माझ्या असं लक्षात आलंय की मी तुला असं काही फारसं म्हणत नाही. But I should be saying such a thing to you regularly. म्हणून मी सरळ दर मंगळवारचं एक reminder फोनवर टाकलंय. To tell you- I love you."

माझा अर्थातच- dropped jaw.

मग मी पण काट्यानेच काटा काढायचा ठरवला. त्याचा फोन घेतला. ते reminder delete केलं.
आणि एक नवीन Location based reminder तयार करून टाकलं.
Repeat - Forever
Location - Our home
Reminder text- 'Google- Remind me to be nice to Alka when I am at home.'
आता या माणासाने बाहेरून येऊन कधीही घरात पाऊल टाकलं रे टाकलं की त्याचा फोन ’टण्ण’ वाजतो आणि नवर्‍याला एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून देतो.

माझ्या चेहर्‍यावर हलकिशी स्मितरेषा उमटते पण मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. 🤣😇
Love such idiosyncrasies in people. Life is beautiful !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सय


दूधाची पिशवी सकाळी घरी येणे- या अनुभवापासून मी अंदाजे २० वर्षे वंचित आहे.
दुबईला प्लॅस्टीकच्या कॅनमधले, सुपरमार्केटमधून आणलेले दूध असते. पुण्याला काही दिवसांसाठी आले की अमूलचे tetra pack वापरते.

साय-दही-ताक-लोणी-तूप-बेरी आणि तीवर पिठीसाखर घालून खाणे हा अनुभव, २-३ आठवड्यांच्या भारतातील नाचानाचीत पूर्णत्वास नेता येत नाही. पुण्यातल्या या मुक्कामात मात्र काही कारणाने दूधाची पिशवी आणली....
आणि दूध तापवताना उतू गेलं. अगदी गॅसचा नॉब पकडून उभं राहून सुद्धा नेमक्या क्षणी दुर्लक्ष झालं. दूधाला आलेला उमाळा त्याला.. खरं तर मला आवरता आला नाही. सायीचं एक टोक पातेल्यावरून ओघळलं.. त्याच्या नादाने दूधाचे काही मोजकेच थेंब.. पण टप टप करीत गॅसवर पडले. सगळं पातेलं मात्र सायीने- माखलं. 'माखलं' हे उगीच सकारात्मक बोलायचं म्हणून. पण खरं तर बरबटलं.

गोष्ट अगदी किरकोळ, घरोघरी, अगणित वेळा घडणारी. दूध उतू जाणे.
पण ते तसं घडलं आणि आईची आठवण आली.

लहानपणी नाशिकला घरी दूधाची पिशवी आली की, दूध आणि त्याची पिशवी, यांना त्यांच्या logical end पर्यंत नेण्याची तिने ठरवलेली अशी एक प्रणाली होती आणि ती आम्हा भावडांनी पाळणे बंधनकारक होते. दुधाने गच्च भरलेली पिशवी आधी पाण्याच्या नळाखाली धरायची. स्वच्छ धुवायची. स्टीलचे एक पातेले पाण्याने विसळून त्यात २ चमचे पाणी तसेच ठेवायचे. मग दूधाच्या पिशवीचे एक टोक कात्रीने कापायचे आणि दूध त्या पातेल्यात ओतायचे. नाशिकच्या त्यावेळच्या पहाटेच्या थंडीत ती पिशवी दूधातल्या मलईने आतून तशीच लडबडलेली राहायची. मग अर्धा वाटी पाणी उकळून घ्यावं. ते एका मागून एका सगळ्या पिशव्यांत फिरवावं आणि शेवटी दूधाच्या पातेल्यात ओतावं.

दूध किती तापवावं.. तर दूधाचं पोट तडस लागल्याइतकं फुगावं पण साय न मोडावी, इतकंच. पातेल्यावर बरबटीची एक रेघही न उमटावी. अशा सायीचं खास असं एक texture असतं. दुपारी फ्रीजमधून पातेलं काढलं की सूरीने पातेल्यापासून विलग केलेली साय एखाद्या थालीपिठासारखी उचलून दह्याच्या विरजणावर विराजीत करावी.

यात काही गडबड झाली तर आईला ते कळू न देण्याची आमची पण तितकीच ठोस तयारी होती. पण आम्हाला ती कितीही कडेकोट वाटली तरी आईच ती.. त्यातल्या फटी तिला बरोबर समजायच्या.
. दूध उतू गेलं की सगळ्यात पहिल्यांदा ते दुसर्‍या एका पातेल्यात काढावे.
. पातेले बदललेले आईला नक्की समजणार. म्हणून पहिले पातेले धुवून दूधास परत मूळ पातेली परत आणावे.
. या सगळ्यात सायीच्या त्या खास texture ची बरीच मोडतोड होणार. ती काही लपवता येणार नाही.
. त्यामुळे दुपारचा चहा करण्याची तत्परता दाखवावी, ज्या आड मोडलेली साय लपवण्याचा एक दुर्बळ प्रयत्‍न करावा. तत्परता प्रमाणातच असावी. अती करणे हेतूस मारक ठरते.
. आणि तरीही चहा पिऊन झाल्यावर 'आज दूध उतू गेलं वाटतं' हे आईचं वाक्य ऐकावं.
. संध्याकाळी, हे तिला कळलं कसं? याचा आणि पुढील सुधारणांचा विचार करत दोन बहिणी एका भावाने खलबतं करावी.... पुन्हा एकदा पकडलं जाण्यासाठी.

एक दूध उतू गेलं काय.. आणि तिच्या मायेची साय अशी अचानक आठवणींवर दाटून आली !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Territorial war


पुण्यातलं आमचं घर नदीच्याकाठी आहे.
नदी, पलीकडचा घाट.. अगदी थेट ‘पैल घंटा घुमे राउळी’ सारखा.. छान मोकळी जागा.... आणि त्यामुळे भरपूर पक्षी.
पाच वर्षांपूर्वी तिथे राहायला गेल्यावरच्या पहिल्या पावसाळ्यात खिडकीच्या गजांवर ओले पक्षी येऊन बसले आणि मी घरातल्या प्रत्येकाला बोलावून बालकवी वर्णन करतात ते ‘फडफड करुनी भिजले अपुले पंख पांखरें सांवरिती’ कसं असतं, ते उत्फुल्ल मनाने दाखवलं.

पण थोड्याच दिवसात त्या गजांवर गळलेली पिसं, त्या पक्ष्यांची शी, शू, वळचणीला घरटी, ती बांधण्यासाठी त्यांनी शोधून शोधून आणलेल्या काड्या, जुन्या वायरींचे तुकडे.. मग पिलांची अंडी, त्यातून पिल्लं बाहेर पडताना सुटलेला वास, अंड्याची टरफलं…. असं सुरू झालं आणि माझ्या पक्षीप्रेमाचा पार धुव्वा उडाला.
ती ‘बगळ्यांची माळ’ अंबरातच उडत आहे आणि ते ‘द्विजगण अवघे वृक्षीं’च आहेत, तोपर्यंतच ठीक. आता पारव्याचं घुमणं माझ्या छातीत एक वेगळीच धडधड वाढवतं.. आल्या का या कबुतरीणबाई बाळंतपणाला !!
उलटपक्षी माझं असं स्पष्ट मत झालं आहे- कुठल्याही कवीला, एका कबुतरणीचं एक जरी बाळंतपण निस्तरायची वेळ आली तर ते ‘कबूतर जा जा..’ फार वेगळ्या अर्थाने म्हणतील.

गेल्या माझ्या मुक्कमात मी एका कबुतरीणबाईंशी full on.. territorial war लढले.. त्याची ही कहाणी.

तिची territory कुठली? याचं किंचित वर्णन करायला लागेल. एका गच्चीला POPचं छत घालून त्याखाली एक छानसं जेवणाचं टेबल ठेवलं आहे. POP वर पाणी पडू नये म्हणून त्यावर जाड प्लॅस्टीकचं शीट आहे. POPचं छत आणि plastic-sheet, यात साधारण पाच इंचाची जागा आहे आणि नेमक्या याच जागेत एका कपोत युग्माने गेले दोन-तीन वर्षे मुक्काम ठोकलेला.

आम्ही या घरी काही कायमचे राहात नाही. वर्षाकाठी जेव्हा केव्हा मी इथे येते, तेव्हा बराच वेळ त्यांना आवर घालणं, हा एक मोठा उद्योग असतो. महिनाभरात परत गेले की पुन्हा त्यांचंच राज्य. पण इतक्या कमी उंचीच्या जागेतील त्यांच्या उच्छादाने काही इतर प्रश्‍न निर्माण झाले आणि यावेळेस त्यांना विस्थापित करणे, हा मुद्दा ऐरणीवर आणावा लागला.

एकदा वरती चढून तिथे काय परिस्थिती आहे ते पहावं तरी, म्हणून एक शिडी घेतली. त्यावर चढले. मग एक पाय शिडीवर, एक जवळच्या गजांवर, एका हाताने ड्रेनेजचा पाईप पकडून... असं सगळं करत जेमेतेम नजर पोचेल इतकी उंची गाठली. पाहते तर काय.. चांगली मोठ्ठी झालेली दोन पिल्लं माझ्यापासून आठ इंचांवर. त्यांच्या डोळ्यातले भाव पाहून मी ‘क्राइम पेट्रोल’ मधली मुलं पळवून नेणारी बाई आहे की काय, असं वाटलं. ते मला घाबरले- तितकंच मी त्यांना घाबरून खाली उतरले. आता ती उडून जाईपर्यंत थांबणं आलं.. तीन-चार दिवसांनी ती उडून गेली.
चला.... हीच ती वेळ, हाच तो क्षण.......

आमची कामवाली बाई रेखा म्हणाली, कबूतरं काळ्या रंगाला घाबरतात. तू तिथं एक काळं कापड बांध. मग एक जुनी काळी साडी शोधली.. तिचे तीन चार तुकडे केले.. वेगेवेगळ्या उंचीच्या काठ्यांना ते बांधले आणि निषेधाचं, बंडांचं पहिलं काळं निशाण रोवलं.

माझं असं म्हणणं होतं... प्लॅस्टीक शीटवरचं सगळं आभाळ तिचं- कबुतरणीचं..... आणि पीओपी छताखालचं घर माझं...
मधली पाच इंचांची जागा no man’s land तर होतीच, तशीच ती no bird’s land ही असायला हवी. पण कबुतरीणबाईंना ते साफ अमान्य होतं. ’कसेल त्याची जमीन, राहिल त्याचं घर’ हा कुळ-कायदा माझ्यापुढे फडकवत, तिथं दोन वर्षे मुक्काम असल्याचा हक्क सांगितला. मी रोवलेल्या निषेधाच्या निषाणांची पायमल्ली केली. आपल्या पंखांनी सगळे झेंडे उधळले व जागेवरचा ताबा सोडायला स्पष्ट नकार दिला.

पुढील घरगुती उपाय म्हणून तिथे डांबराच्या गोळ्या टाकल्या, हीट मारलं, जे म्हणून काही उग्र वासाचं सापडलं त्यांचा वर चढून मारा केला. पण छे ! ह्या बयेचं माझ्या डोक्यावर नाचणं, शब्दश: आणि लाक्षणिक, दोन्ही अर्थाने थांबेचना मेलं. तिच्या पावलांचा आवाज ऐकला रे ऐकला की मी हाताशी ठेवलेली काठी घेऊन पळायचं आणि खालून टकटक करून तिला हाकलायचं..
पण कृतनिश्वयी सौ. कबूतर, श्रीमद्‌ भगवद्‌ गीतेच्या ३र्‍या अध्यायाची- कर्मयोगाची- जन्मल्यापासून रोज पारायणे करत असल्यासारख्या ध्येय आणि कर्म दोन्ही सोडायला तयार नव्हत्या.
नानाच्या (पाटेकर) मते ‘एक मच्छर...’ तुमची वाट लावतो इथे तर हे एक अख्खं कबूतर होतं.

हे काही खरं नाही. आता आपण Google नावाच्या Oracle कडे हा प्रश्‍न घेऊन जावा. त्याच्याकडे सर्व उत्तरं असतात..
त्याने दोन उपाय सुचवले. एक म्हणजे फळीला खिळे ठोकायचे आणि ती उलटी करून कबूतरं बसतात त्या ठिकाणी ठेवायची. छे छे !! हे असलं अघोरी काम होणं नाय... दुसरं म्हणजे CDs उलट्या ठेवायच्या. चमकणारा भाग वरच्या दिशेने. त्यात कबुतरांना त्यांचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं की ते घाबरतात... इति गूगल.

भराभरा घरात सापडलेल्या जुन्या CDs घेतल्या. त्यांची वेगवेगळे कोन करून रचना केली. त्या पडू नये म्हणून फेविकॉलचा ठिपका देऊन चिकटवल्या. वरची वळचणीची जागा आणि त्या भोवतीची भाग, महाराणी पद्मिनीच्या आरसे महालाला लाजवेल असा करून मी आणि रेखा वाट पाहू लागलो. एक दिवस शांतता. दुसर्‍या दिवशी सकाळपासून ही शंभी महाराणीच्याच तोर्‍यात त्या विवक्षित जागेत प्रवेश करती झाली.

मग मात्र मी अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष महामहीम श्री. ट्रंप यांच्याकडून प्रेरणा घेतली. एका POPचं काम करणार्‍या माणसाला बोलावलं. त्याने काही तास काम करून एक भिंत बांधून अनधिकृत घुसखोरीचा मार्ग कायमचा बंद केला.
कबुतरीणबाईंनी दोन दिवस माझ्याकडे खूप रागाने बघितलं. मान गरागरा फिरवली. वेगवेगळे भीतीदायक आवाज काढले.. त्या भिंतीवर चार-पाच धडकाही देऊन पाहिल्या.
एकीकडे मी मात्र दुबईला परतण्याच्या तयारीला लागले.

विमानतळाकडे निघताना शेवटचं, सगळं नीट बंद केलंय नं, असं तपासत फिरत होते तो काय.. दुसर्‍या गच्चीतल्या inverter वर बसून ही गंगी शांतपणे सर्वेक्षण करत होती.

टॅक्सीत बसल्याबसल्या कबुतरीणबाईंऐवजी मीच श्री. ट्रंप यांना tweet केलं.... "भिंत बांधून अनधिकृत घुसखोरी थांबवता येत नाही. पुरावा आहे."
... आणि पुढच्यावेळचं theatre of war काय असेल याचा विचार करू लागले.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

पाऊस


तो तसा सर्द-चिंब पावसाळा, ते वय आणि ते शहर मागे टाकल्यानंतर कधीच भेटला नाही.

आईचं घर, लहानपण, ’अद्वैत’ नावाची ती नावाला जागणारी कॉलनी, त्या कॉलनीत असलेलं आमच्या घराचं विशिष्ट असं भौगोलिक स्थान, नाशिक .... आणि कोसळून-कोसळून चराचरांत मुरलेला बेबंद पाऊस.. ह्या सगळ्यांचे जमून आलेलं ते रसायन होतं.

आता घर असलं तरी आई नाही. मनात मूलपण जपलं असलं तरी वय लहान नाही. नाशिकला देखील ’तसा’ पाऊस पडतो, असं वाटत नाही....पण अंदाजे साडेतीन दशकांपूर्वीच्या पावसाळ्यांनी सोडलेल्या त्या पाऊसखुणा, पुसट काही झाल्या नाहीत. आजच्या पावसाने काही मागे ठेवलंय का? हे भिंग घेऊन शोधत फिरताना उलट त्या अधिकच ठळक होतात.

माझ्या जन्माच्या सुमारास बांधलेलं आमचं घर काही जंगलात नव्हतं. शहराच्या मध्यवर्ती भागातल्या कॉलनीतच... पण तिच्या सगळ्यात आतल्या टोकाला होतं. कॅनडा कॉर्नरहून आत शिरलं की एक डावं-एक उजवं-एक डावं अशी वळणं घेत तिथं पोचायचं... सगळी वर्दळ, गजबज मागे पडलेली असायची.

घराच्या मागच्या दोन बाजुंना लांबच्या लांब पसरलेली काळीभोर शेत जमीन. हे शेत पायी ओलांडायचं म्हंटलं तर तब्बल पंधरा मिनिटे लागायची... घराच्या मागे पडकी विहीर... उंचच्या उंच गवत... हे सगळं पार करून पुढे गेलं की पुन्हा घरं, दुकानं, गिरणीवाल्या बाईंची पीठाची गिरणी, इस्‍त्रीवाला, सायकलवाला, शाळा, कॉलेज असं सगळं....
जसं काही शहराने वाढतावाढता दम लागून एक श्वास घेण्यासाठी थांबलं असावं, तसं...

या सगळ्यामुळे पहिला पाऊस, मातीचा वास, वळीव.. हे काही फक्त कवितेत भेटलं नाही. गरमागरम तापलेली काळ्याभोर मातीची ढेकळं. त्यावर आकाशातून पडलेला पाण्याचा थेंब.. वाफाळलेला सुगंध... अशा वातावरणात आम्हा भावंडांवर पावसात भिजण्यावर नाही, तर न भिजण्यावर बंदी होती.

’ये ग ये ग सरी, माझे मडके भरी’ अशी सुरुवात केलेला पाऊस, पुढच्या चार महिन्यात आपली वेगवेगळी रुपे दाखवत ’पाऊस कधीचा पडतो...’ असा प्रवास करायचा. मातीच्या ढेकळांचा हळूहळू गच्च चिखल व्हायचा. त्यावरही संततधार पडत राहिली की सगळीकडे पाणीच पाणी.. शेतातलं पाणी कंपाउंडच्या भिंतीवरून बागेत यायचं. घराची तिसरी पायरी बुडली की रेनकोट घालून, कुदळ-फावडे घेऊन बाहेर शेतात जायचे. मधेमधे छेद देऊन पाणी मोकळे करायचे. त्या मोकळ्या झालेल्या, खळाळत धावणार्‍या पाण्याचा आवाज.... त्या पाण्याबरोबर वाहत येऊन पोटर्‍यांना अडलेले लव्हाळे... आणि ई.. शी.. करत त्याला भराभरा बाजूला काढणं.....

दहा-दहा दिवस, उभ्या सरळ रेषेत पडणार्‍या पावसाबरोबर अनेक पाहुणेमंडळी घरी यायची. शेतातली त्यांची घरं पाण्यात पार बुडून गेलेली असायची. चिक्कट आणि फिक्कट गुलाबी रंगाचं गांडूळ फारसं कुणालाच आवडायचं नाही. रात्रभर प्रेमसंवाद करणारे श्रीयुत आणि श्रीमती बेडुक... शेतात पाणी जितकं खोल, गच्च आणि जुनं, तितका या बेडकांचा अंदाज रुमानी.... आम्ही मुलं तर त्यांच्या ’डराव’च्या स्टाईल वरून त्यांना नावं द्यायचो आणि कोण कोणाच्या मागे लागलंय... कोणाचं कोणाशी जमलंय याचा अंदाज लावायचो.
काडी लावली की गोल वेटोळे करून बसणारा लाल-तपकिरी रंगाचा आणि शंभर पायांचा पैसा... मखमली लाल रंगाचा, तूतीची पानं खाऊन वाढणारा किडा. रिकाम्या काड्यापेटीला भोकं पाडून, त्यात खाली गवत अंथरून त्यावर याला ठेवायचं. तीव्र-उंच-चिरक्या आवाजांचे रातकिडे... पण हे सगळे तसे निरुपद्रवी.

काही भीतीदायक पाहुण्यांचे स्वागत मात्र व्हायचे नाही. आताच्या निसर्गमित्रांना हे फारसे आवडणार नाही. पण कॉलनीतल्या छोट्या मुलांची संख्या बघता हे स्वाभाविकच होते. विंचू दिसला की चपलेने मारलाच जायचा. ४-५ फुट लांबीची सापाने टाकलेली कात बागेत सहज मिळायची. ती दिसायची सुंदर पण तिची भीती वाटायची. एकदा बागेतल्या कारंजाच्या नळाच्या खोबणीत पाय सोडून बसलेल्या भावाच्या पायाला लागूनच एक पिवळा जर्द साप गोल करून बसलेला होता. अशा प्रसंगांना घाबरूनच साप-नाग-धामण-मण्यार दिसले की जोरात ओरडायचे. मग शेजारचे सगळे काका-दादा काठ्यालाठ्या घेऊन धावत यायचे. मारल्या गेलेल्या नागदेवतेने त्रास देऊ नये म्हणून रीतसर पूजा करून, दुधाचा नैवेद्य दाखवून त्याला अग्‍नी दिला जायचा. अनेकवेळा या साप-नागांची बोटभर लांबीची पिल्लं घरात सापडायची. ती पिटुकली पिल्लं सुद्धा काय सुंदर फणा काढायची !

एकदा एक गंमत झाली. तुडुंब पावसाळा आणि शेतात भरलेलं गुडघाभर पाणी.... मध्यरात्री झाली की कुणी स्‍त्री कण्हल्यासारखा आवाज यायचा. १०-१२ दिवस भरपूर पाऊस झालेला होता. त्यामुळे आधी वर्णन केलेले अनेक निर्वासित प्राणीमात्र बाहेर पाण्यावर तरंगत फिरत होते. रात्रीच्या मध्य प्रहरी बाहेर जायची कोणाचीच हिमंत होईना. चार दिवसांनी बाबा बॅटरी घेऊन गेलेच. तेव्हा लक्षात आलं कंपाउंडचा खिळखिळा झालेला एक खांब आणि त्याला बांधलेली काटेरी तार, वारं एका विशिष्ट दिशेने आले की एकमेकांना घासले जात होते आणि त्याचा तो आवाज होता.

घरची बाग या काळात फळा-फुलांनी भरून गेलेली असायची. काय नव्हतं तिथं? मोगरा, जाई-जुई-सायली, पाच रंगाच्या जास्वंदी, हिरव्या रंगाची अबोली, गुलाब (आणि त्यावर कलम करायला येणारे म्हातारे काका), द्राक्षाचे वेल, ऑगस्ट मध्ये पिकणारा हापूस, मलगोवा-पायरी अंबा, गुलमोहर, चिकू, पेरू, लिंबू, नारळ, मघई पान .....

आईचं घर आणि पाऊस यांचा आणखी एक ऋणानुबंध आहे.
ती गेली तेव्हाही आभाळ गच्च भरलेलं होतं आणि पाऊस खरोखरीच रिमझिम निनादत होता... आसमंत जसा दु:खाच्या मंद स्वराने भारलेला !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कान तुटका


तसे घरात पाणी पिण्यासाठी काचेचे अनेक ग्लास होते. एकसारखे, संचातले. पण त्यामुळे फार गोंधळ उडायचा. कुणाचा कुठला? हा प्रश्न सतत चर्चेत राहायचा. त्यावर एक साधा-सरळ उपाय म्हणजे ग्लास विसळून ठेवणे. त्याने एका नवीन वादाला तोंड फुटायचे. विसळण्याची जबाबदारी कुणाची? खरं तर पाणी पिऊन झाल्यावर प्रत्येकाने विसळून ठेवायला हवा, पण..... तसे झाले नसेल तर ? ..... confusion, अविश्वास....
साधारण चार साडेचार वर्षांपूर्वी यावर मी एक उपाय सुचवला. घरातील प्रत्येकाने आपल्या व्यक्तीमत्त्वाला साजेसे असे दर डोई तीन mugs आणायचे. त्यांचा वापर पाणी-चहा-कॉफी अशा सामान्य, दैनंदिन आणि वैयक्तिक पेयपानासाठी करायचा. अर्थातच त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी ज्याच्या-त्याच्या डोक्यावर.
तसे मी जाऊन सगळ्यांसाठी विकत आणू शकले असते... "ह्या रंगाचे हे तुझे तीन", वगैरे. पण आपल्या 'व्यक्तिमत्त्वाला साजेसे' असा एक catch टाकून 'mugs' हा प्रश्न मी अस्मितेचा आणि तत्त्वाचा केला आणि गुपचूप त्या जबाबदारीतून सुटका मिळवली.

नवर्‍याने एका दिवसात एकसारखे आणि संपूर्णत: काळ्या रंगाचे mugs आणले आणि 'Black is beautiful, simple.' असं म्हणत फार मूलभूत निवड केल्याचा आव आणला.
लेकाने बाजारात mugs या प्रकारात जितके म्हणून चित्र-विचित्र रंग-आकार शोधता येतील तेवढे शोधले, त्यासाठी तब्बल तीन आठवडे घेतले आणि तीन भन्नाट mugs माझ्यासमोर आणून ठेवले.
मी मात्र फार विचार केला नाही. कारण 'व्यक्तीमत्व' वगैरे gimmick, हे निव्वळ माझ्या कमी काम करण्याच्या सोयीचे, म्हणून होते. मध्यम मार्ग स्वीकारत त्या दोघांच्याही निवडकक्षेत नसतील असे, पण जरा बरे वाटणारे, जवळच्याच सुपर मार्केटमधून उचलले.

आणल्याच्या तीसर्‍याच दिवशी माझ्या एका mugला छोटासा अपघात झाला आणि त्याचा कान तुटला. "टाकून दे ग, कशाला ठेवतेस ?" दोघांचं टुमणं. इतक्या लगेच, केवळ कान तुटला म्हणून, त्याला कचर्‍याची टोपली दाखवणे मला संपूर्णत: अमान्य होते. कारण बाकी त्यावर ओरखडासुद्धा नव्हता.

जशी मी त्याला वापरत राहिले तसे त्याचे 'कान तुटका' हे संबोधन प्रचलित होत गेले. मी ते फारसे मनावर घेतले नाही, त्याने घेण्याचा प्रश्नच नव्हता.
असे काही महिने गेले. मग वाटले, त्याच्या तुटक्या कानाचे कंगोरे फारच बेढब दिसतात. मग एक छानशी कानस आणली. stone grinding करतात तसे पाणी वापरून, कानसने घासतघासत ते कंगोरे नाहीसे केले.
या घटनेला चारहून अधिक वर्षे झाली. त्याच्याबरोबर आणलेल्या आठ जणांनी एकेक करून आमची साथ सोडली. 'कान तुटका' मात्र आहे तस्साच आहे.

दरम्यान 'तुटका कान' हे त्याचे व्यंग न राहता ती त्याची identity झाली आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

विलक्षण ’पु.ल. क्षण' : काळजी


सुरभी नीमाची सून आणि नीमा जुनी मैत्रीण, असं सांगितलं तर वाटतं..... तितका काही हा 'बादरायणी' संबंध नव्हता.
त्यामुळे नवीन लग्‍न करून सुरभी दुबईला रहायला आली, तेव्हापासून ती, मला माझीच जबाबदारी वाटत होती. तसं नीमाला मी म्हंटलं देखील.. "नको ग काळजी करूस. तू आणि मी काही वेगळ्या नाही. मी बघते त्या दोघांचं अडलं-नडलं."

आणि असे अडल्या-नडल्याचे प्रसंग आलेही चिक्कार. नवीन संसार, नवा देश, नव्या नोकर्‍या...
नवी नवरी ते पहिल्यांदा येणारे आईपण असा सुरभीचा दोन वर्षांचा प्रवास मी नुसता काठावर बसून नाही बघितला. अनेकवेळा धावून गेले. प्रसंगानुरूप कधी घरीही घेऊन आले. कधी एखादी रेसिपी, इतकं साधं तर कधी पाच महिन्यांची गरोदर असताना गेलेला तोल, इतकं कठीण. काही महिन्यांपूर्वी सुरभी तिच्या बाळंतपणासाठी माहेरी गेली.

जानेवारीत भारतात गेले तेव्हा सुरभीला-बाळाला भेटावसं वाटलं म्हणून नीमाकडून तिच्या आईचा फोन नंबर घेतला, दिवस-वेळ ठरवली...
सुरभीच्या आईने दार उघडले. त्यांच्या छोटेखानी, दुमजली बंगल्याच्या वरच्या मजल्यावर ती दोघं आहेत आणि लवकरच खाली येतील, बसा.. असं म्हणाल्या.

दरम्यान आम्ही बेल वाजवल्यापासून दोन्ही मजल्यांच्या मधल्या जिन्यात बांधलेलं त्यांचं ’पाळीव’ श्वान, त्याच्या असलेल्या किंवा नसलेल्या बेंबीच्या देठापासून ओरडत होतं... म्हणून त्या बाईंनी aplomb bearing घेऊन ’मॅक्स’ला शांत करायला सुरुवात केली. तेवढ्यात फोन वाजला.

त्या प्रचंड गोंधळात फोनवरचं, एका बाजूचं जे संभाषण ऐकू आलं ते असं.. "हो आलेत... नाही, तो ठीक आहे. खायला दिलंय आधीच... नको.. बाहेर नको.. बाहेर ऊन आहे." वगैरे.

फोन बंद झाल्यावर त्या वळल्या आणि म्हणाल्या, "ह्यांचा ऑफिसमधून फोन होता. तुम्ही येणार माहित होतं नं, म्हणून चौकशी करत होते.... तशी यांना मॅक्सची खूपच काळजी असते.............!!!"

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

’पेट’ स्‍नो


समोरच्या फ्लॅटमध्ये जेमिमा राहते. गेली काही दिवस ती, तिच्या गावी इंग्लंडला सुट्टीसाठी गेली होती. त्यामुळे तिचा अडीच वर्षांचा मुलगा जेम्स आणि त्याने पाळलेली कुत्र्याची दोन पिल्लं, यांचा दंगा नव्हता आणि ती शांतता आम्हाला आवडत नव्हती.
काल रात्रीपासून परत कल्ला सुरू झालेला. आली असावी. तिच्याशी थोडं बोलावं म्हणून दार उघडलं.

"कशी गेली सुट्टी ?"
"मस्त. छान बर्फ होता ह्यावेळेस. आणि जेम्सने पहिल्यांदाच बर्फ बघितला."
"मग ? आवडला का त्याला.. white winter ?"
"खूपच. पण त्यामुळे आमच्यावर एक प्रसंग ओढवलेला.
जेम्सला नं बर्फ ...... 'pet' म्हणून पाळायचा होता."

"अरे बापरे! तू कसं सांगितलंस त्याला.... हे शक्य नाही म्हणून."

"नाही नाही. मी तसं का करू?
उलट तो आणि मी, आम्ही दोघं रोज बाहेर जायचो. थोडा बर्फ गोळा करून आणायचो आणि घरात वेगवेगळ्या जागी ठेवायचो."

माझी उत्सुकता शिगेला.
"कधी त्याच्यासाठी एखादी बास्केट तयार करून तिच्यात किंवा टॉवेलची गादी करून त्यावर....
पण कुठेही ठेवलं तरी बर्फच तो, वितळून जायचा.
मग जेम्सला कळलं. बर्फाला घरात आणलं की त्याला खूप रडू येतं.
इतकं.. की तो संपून जातो.
सात-आठ दिवसांनी हा प्रकार बंद झाला.

आता जेम्सला स्वत:ला कधीही रडू आलं की एक-दोन मिनिटातच सावरतो आणि म्हणतो,
I won't cry so much. Otherwise, I will be over too."

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सुधीरजी..


शनिवारी दुपारी ’आठवणीतली गाणी’चा एक आधार तुटला.
कधीही, कुठेही, काहीही अडलं की तुमच्याकडे धाव घ्यायची.. ईमेल / फोन / प्रत्यक्ष.. असा जमेल तसा संपर्क साधायचा.. तुमच्या भोज्याला हात लावायचा आणि आत्मविश्वासाने पुढे जायचे अशी एक सवयच लागली होती.

आपला शेवटचा संपर्क आणि चर्चा ८ जानेवारीची.
विषय होता, ’आठवणीतली गाणी’वर अप्रचलित शब्दांचे अर्थ देण्याची केलेली सुरुवात आणि ’साद देती हिमशिखरे’ मधिल ’ध्वजा कौपिनाची’वर माझे अडकणे. कौपिनेश्वर म्हणजे शंकर, ’कौपिनं’ या संस्कृत शब्दाचे वेगवेगळे अर्थ..
तेंव्हा तुम्ही केलेल्या ईमेलचा काही भाग जसाच्या तसा..
".... मात्र ह्या विशष्ट गाण्याच्या संदर्भात हे इतर व्याकरणसिद्ध अर्थ उपयोगी नाहीत असं मला वाटतं. वसंत कानेटकर ह्यांचं हे पद त्यांच्या मत्स्यगंधा नाटकातील आहे, हा संदर्भ तुला ठाउक आहेच. पण तो प्रसंग ध्यानी घेतला तर त्या शब्दाचा मी जो लावला आहे तो अर्थ अधिक संयुक्तिक वाटेल असं मला वाटतं. मत्स्यगंधेच्या मोहात काही काल गुरफटलेला पराशर भानावर येउन तिचा निरोप घेतो आहे आणि त्याचं ह्या प्रवासाचं मूळ उद्दिष्ट तो तिला सांगतो आहे.
’साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची...’ पुढच्या ओळी ह्या दृष्टीने अधिक बोलक्या आहेत.
कैलासाचा कळस ध्वजा कौपिनाची.. अढळ त्या ध्रुवावरती दृष्टी यात्रिकाची.. मला नाही उरली आता ओढ प्रपंचाची ....हे रूपक ध्यानी घेतले तर देवळाचा कळस आणि त्यावरचा (संन्यस्त वृत्तीचा निदर्शक भगवा ध्वज हाच अर्थ कवीच्या मनांत असावा असं वाटतं......"

अशी अनेकवेळा तुमच्याकडे घेतलेली धाव.... आणि काही वेगळं, चांगलं घडण्यास आणि घडवणार्‍यास प्रोत्साहन देण्याच्या आपल्या वृत्तीने आपण वेळोवेळी केलेले मार्गदर्शन..
वानगी दाखल सांगायचे झाले तर..

सुरेश भट यांच्या ’रंगुनी रंगात सार्‍या’ या आपण संगीत दिलेल्या गझलेतील एक अंतरा ’भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो.. अन्‌ कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्याच्या कळा’ हा त्या गझलेच्या पुस्तकीय आवृत्तीत कसा नाही?
आणि ’कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे.. मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा’ हे त्याच्या ऐवजी आलं की कसं?

’ते मीनकेतनाचे ग मोडिले धनु मी ! त्या चित्त-चोरट्याला का आपुले म्हणू मी ?’
’मीनकेतन’ या शब्दाची व्युत्पत्ती कशी असेल? ’मीनकेतन’ म्हणजे मदन. पण ’मीन’ म्हणजे मासा आणि ’केतन’ म्हणजे ध्वज. मग मदनाचा असा काही ध्वज असून त्यावर मासा, असं आहे का?

’मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका’ आणि ’रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला’ या दोन्ही गाण्यांना वसंत पवारांनी दिलेली एकच चाल.. का वाटलं असेल एका संगीतकाराला काही वर्षांच्या अवधीनंतर तीच चाल पुन्हा वापरावी?

’आला आला वारा’तल्या आपल्याला अभिप्रेत असलेल्या, सासरी निघालेल्या सया कोण? असं बरंच काही....

सुधीरजी..
तुम्हाला ’सर’ म्हंटलेलं आवडायचं नाही म्हणून तुमचं वय, ज्ञान, अनुभव यामुळे आपसूक येणार्‍या ’सर’ला आवर घालत ’सुधीरजी’ म्हणायला शिकले होते....

तुमच्या ’मुक्तछंद’ बंगल्याच्या वरच्या खोलीच्या दोन भिंती, तुम्ही काढलेल्या चित्रांनी नटलेल्या असायच्या. त्या खोलीतून बाहेर पडताना तिथे थबकायचे.. मनभरून ती चित्र पहायची..
मग तुम्ही सांगायचे, "तुला माहित आहे नं, यातील कुठलीही आणि कितीही चित्र तू कधीही घेऊन जाऊ शकतेस.."
आणि मी म्हणायचे, "हा वर मी राखून ठेवत आहे." असा आपला एक रिवाज होता.
पण खरं तर असं कधीही वाटलं नाही की त्या सुंदर मांडणीतल्या एका कुणाला उचलून वेगळं करावं आणि ’एकलकोंडं’ असं आपल्या घरात लावावं..
जितकी नैसर्गिक त्या चित्रांची ती जागा होती तितकंच माझं तिथे दर वेळेस थबकणंही..

’मुक्तछंद’ या आपल्या बंगल्याच्या ठिकाणी आता फ्लॅट सिस्टिम होणार हे सांगितलंत तेंव्हा मी म्हंटलेलं.. ’मुक्तछंद’ आता साचेबद्ध होणार.....
तर म्हणाला होतात, "वास्तू साचेबद्ध होतीये खरी.... आतला माणूस सदैव मुक्तच होता आणि राहील................ !!"

(हा फोटो.. ताजा-ताजा, गरमागरम, फोटोग्राफरकडून घेऊन आलोय... ’आठवणीतली गाणी’साठी... म्हणून दिला होतात)



  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

लडाख calling


जुले (Juley)……. लडाखी भाषेत- नमस्ते !!
La म्हणजे Pass (खिंड). Dakh म्हणजे land.
लडाख म्हणजे Land of Passes.

अर्थातच निसर्ग या संपूर्ण भागावर अधिराज्य गाजवतो. हिवाळ्यात -४० अंशांपर्यंत जाणारे तापमान आणि तब्बल २०,००० फुटांहून अधिक उंच जाणारे पहाड, वाळवंटी जमीन, loose rocks.. यामुळे हे स्वाभाविकच आहे.
पण खरा सलाम आहे तो ही सगळी आव्हानं तितक्याच निधड्या छातीने झेलीत, त्यांच्याशी सामना करणार्‍या दोन संस्थांना..
एक ’सीमा सडक संघटन’- Border Road Organisation आणि दुसरी भारतीय लष्कर.
या दुर्गम भागातील रस्ते सतत वाहते ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सातत्याने होणार्‍या avalanches, दरड कोसळणे, यामुळे त्यांच्या कामात खंड तो नाहीच.

NH1 लेह - श्रीनगर महामार्ग, ही या विभागाची धमणी आहे. १९६५, १९७२ आणि १९९९ या तिन्ही युद्धांमध्ये सीमेपलिकडून, ह्याच्या काही भागावर कब्जा मिळवायचा, जेणेकरून लष्कराची रसद तोडली जाईल, असा प्रयत्‍न प्रामुख्याने केला गेला होता.
हे रस्ते बांधताना आणि त्यांना वाहतुकीस योग्य ठेवताना सैन्याचे अनेक जवान आणि BRO चे इंजिनियर्सनी देह ठेवला. त्यांच्या स्मरणार्थ रस्त्याच्याकडेने लावलेले दगड हे मैलांच्या दगडांसारखेच विखुरलेले आहेत.

कारगील शहरातील war memorial हे फक्त लष्करासाठी खुले आहे, सर्वांसाठी नाही. पण आम्ही दोघं केवळ तेवढ्यासाठी कारगीलपर्यंत गेल्याने तिथल्या station chief ने आम्हाला आत जाण्याची खास परवानगी दिली. त्यांना मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला डोळ्यांना सहज दिसणार्‍या, समोरासमोरील टेकड्यांवरच्या, भारत आणि पाकिस्तान.. अशा दोन्ही निरिक्षण चौक्या दाखवल्या. पूर्वी न ऐकलेली या युद्धांविषयीची माहिती सांगितली.. आणि ‘युद्धस्य कथा रम्या !’.. ¬एवढाच काय तो आपला युद्धांशी संबंध.. अशी तीव्र कळ नंतरच्या प्रवासात तिथल्या थंडीपेक्षा जास्त बोचत राहिली. तिथल्या तिरंग्यापुढे नतमस्तक होताना नेमके काय वाटले ते शब्दात सांगणे अवघड. छायाचित्रणास परवानगी नसल्याने ते करता आले नाही.

येथे एक विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, जिथे कॅप्टन विक्रम बात्रांचा फोटो.. त्यांची शौर्यगाथा लिहिली आहे, त्याखाली एक जापानी म्हण लिहिली आहे..
’Death is lighter than a feather, duty is heavier than a mountain.’

लेहचे war memorial मात्र सगळ्यांसाठी खुलं आहे. तिथे छायाचित्रण करता येते. इथे १९९९ मधील युद्धात सीमेपलिकडील लोकांची ताब्यात घेतलेली शस्त्रास्त्रे, war log, वैयक्तीक नोंदवही.. असं बरंच काही इथे संग्रहीत आहे.

Pangong lake-
नितळ, आदिम, प्रशांत, निळंशार, समाधीस्त..
युगानुयुगे तपश्चर्या करणार्‍या एखाद्या ध्यानमग्न ऋषीसारखं. आपल्या अंगी विनम्रता आपसूक जागवणारं..
त्याच्याकडे नुसतं बघत रहावं.. आपलं असणं त्याच्या खिजगणतीतही नसावं.. त्याच्या शांततेवर एकही तरंग उठणार नाही याची काळजी घेत, हलकेच, परत फिरावं..
समुद्रसपाटीपासून १४,२७० फुटांवरील हे एकमेव खारं पाण्याचं सरोवर. याचा ७०% भाग चीनमधे आहे.

Khardung-La-
ऑक्टोबर.. लडाख मधील हिवाळ्याची सुरुवात आणि प्रवासी मौसमाची समाप्ती. त्याचा फायदा असा की १८,३८० फुटांवरील या रस्त्यावर आत्ता बर्फ आहे. ऐन उन्हाळ्यात असतोच असं नाही. Khardung-La हे दोन हजार वर्ष जुन्या चीन ते इस्तंबूल या silk route वर येते.
Commercial aircrafts उडतात त्याच्या अर्ध्याहून अधीक उंचीवर आपण असतो आणि हसावे की रडावे हे कळत नाही.. इथेही हलदीरामची आणि लेहर कुर्कुरेची रिकामी पाकिटे पडलेली होती.

Buddhist monasteries हा येथील नागरी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अकराव्या शतकातील दोन monasteries पाहिल्या..
सुंदर कॉमेंट्रीसह चाललेली क्रिकेटची मॅच पाहिली..
आमची स्थानिक व्यवस्था पाहणारा... मनय, याच्या मुळे लडाखी वेषात चाललेलं एक लग्न पहाता आलं..
लडाखी स्त्रीया खूपच स्वयंपूर्ण आणि आत्मविश्वासू आहेत हे पाहून मनस्वी आनंद झाला..
लष्कर आणि नागरिकांमध्ये येथे असलेला मैत्रीभाव जाणवला..

लडाख सध्या हिवाळ्याच्या तयारीला लागलंय. यात लष्करही आलं. त्यात महत्वाचे म्हणजे इंधन साठा. छोट्या पाड्यांवरील घरोघरी शेणगोळे साठवणे चालू आहे आणि लष्करासाठी २५-२५ पेट्रोल टॅंकर्सचे अनेक ताफे चाललेत. २५ ऑक्टोबर नंतर लेहमध्ये स्थानिकांव्यतिरिक्त बाहेरचं फारसं कोणी नसेल.

महत्वाचे-
येथे प्रवास करताना काही काळजी घेणे आवश्यक आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रवास सुरू करण्याच्या आधी एक दिवस Diamox ही गोळी सुरू करावी. अती उंचावरील हवेचा कमी दाब व त्यामुळे मिळणारा कमी प्राणवायू (acute mountain sickness) यासाठी हे आवश्यक आहे.
पहिल्या दिवशी trekking अजिबात करू नये. नंतर दर दिवशी थोडे-थोडे करून अंतर वाढवत जावे.

* Photos by Aashay
* All photos


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

शाळा


कितीतरी कित्‍ते शाळेत गिरवले असतील.
कितीतरी धडे शिकवले गेले असतील.
कित्‍ते गिरवण्याने अक्षराला वळण लागलं, हे खरं.
काही धडे फक्‍त समजले.. उमजले कधीच नाहीत.
पण ती शाळा होती आणि अभ्यास हा शब्द, 'पाठांतर' या शब्दाला समांतर जात होता.
लेखी, तोंडी परीक्षा करत शाळा संपली.

म्हणजे, फक्त तसं वाटलं.
शाळेतल्या बाईंची जागा अनुभवांनी घेतली आणि शाळा चालूच राहिली.
त्यातील काही धडे आपणहून, आवड म्हणून शिकले.
काही शिकवले गेले, शिकावेच लागले.
काही मात्र कितीवेळा शिकवले गेले तरी डोक्यात शिरतच नाहीत.
जसा २९ चा पाढा.

शाळेनंतरच्या प्रवासात मला वळण लावणार्‍या,
माझी सतत ’शाळा’ घेणार्‍या माझ्या अनुभवांचे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी खास आभार.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

छटा


डोक्यात जाते ती हवा .. शरिरात होतो तो वात ..
अंगावरून जाते ती झुळूक .. हळूवार घातलेली ती फुंकर ..
घेतलेला तो श्वास .. सोडलेला तो नि:श्वास ..
घोंघावते ते वादळ .. सोसाट्याचा तो वारा .. मंद मंद समीर ..
मनाचे ते उधाण .. विचारांचे ते थैमान ..
सभोवतीचे ते वातावरण ..
आणि प्राणांसाठी तो वायू ..

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Housewife


मध्यंतरी एका कार्यक्रमासाठी बोलावले होते. विषय होता- ’वेगळ्या वाटेने चालताना’.
’आठवणीतली गाणी’ या संकेतस्थळाच्या १० वर्षांच्या प्रवासावर बोलायचे.
खूप उत्सुक श्रोते असल्याने संकल्पना सुचणे, विस्तार, घडत गेलेले बदल, असे अनेक मुद्दे येत गेले.

सर्वसाधारणे अशी समजूत असते की back-end ला एखादा ग्रूप किंवा कमीत कमी एक ’पुरुष’ असेल.
इथे मी एकटी स्त्री असल्याने तर अधीकच कुतूहल.

स्वाभाविकच माझे पूर्वी वेगवेगळ्या महाविद्यालयांमधे गणित, संख्याशास्त्र या विषयांचे प्राध्यापक असणे....  नंतर पुण्यात असताना शिकवलेले Oracle 8i आणि त्यातच कुठेतरी असलेले ’आठवणीतली गाणी’च्या संरचनेचे मूळ....  असे बरेच काही येत गेले.

संकेतस्थळाचा सगळा डौलारा सांभाळताना, सतत बदलत्या internet technology शी कसे जुळवावे लागते अशा तांत्रिक गोष्टींपासून ते संकेतस्थळाचा जो विषय....  गाणी निवडणे....  ती मिळवणे....  त्यांची इतर माहिती गोळा करणे....  करावा लागणारा वेगवेगळ्या स्तरांवरील जनसंपर्क....  त्यावर दुबईतील वास्तव्याचा परिणाम होतो का? तेथील जीवनशैलीमुळे काय आव्हाने येतात?.... वगैरे, वगैरे.

साधारणत: दीड तासांच्या या कार्यक्रमात औपचारिक मुलाखती बरोबर अनौपचारिक गप्पा असल्याने छान मजा आली. कार्यक्रम संपल्यावर एक गृहस्थ भेटायला आले.

"छान वाटलं सगळं ऐकून..  पण बाकी काय करता आपण?"
प्रश्नाचा रोख काहीच न समजल्याने माझे नुसतेच, "म्हणजे ?"
"नाही, म्हणजे काही job करता..   की Housewife ?"
!!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

अबोध काहीसे


खिडकीच्या काचेवर टकटक.... कसं शक्य आहे? आत्ता पर्यंत असं कधीच झालं नाही आणि होणं अवघडही.... इतक्या उंचावर कोण येणार?
चक्क चिमणी.

आता भारतातून दिसेनाशी होऊ लागलेली चिऊताई.... इथे दिसते क्वचित कधी.... पण आमच्या घराच्या खिडकीच्या बाहेर प्रथमच.... आमच्या दोघींमध्ये जाड काचेची भिंत.

एवढासा जीव.... काचा उघडूच शकत नाही अशा खिडकीच्या बाहेर, तितक्याच पिटुकल्या आधाराला टेकलेला.... कृष अंगकाठी.... ही आजकालच्या फॅशनला धरून जाणीवपूर्वक की कुपोषीत? पाणी हवंय का हिला? द्यावं तरी कसं? माझं इतकं जवळ जाणं तिला घाबरवत कसं नाही? एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे बघताना मधूनच चोचीने काचेवर केलेली टकटक आणि मधल्या काचेमुळे muted वाटणारी चिवचिव....

काही सांगायचंय का हिला? पण चिमण्या कुठे बोलतात? म्हणजे विचार तरी करू शकतात का? जवळ-जवळ १० मिनिटे चाललेली ही interaction संपूर्णत: निरुद्देष्य कशी असेल?
आमचं घर ३० व्या मजल्यावर, म्हणून मला काही आकाश तितकंसं जवळ नाही.... माझ्या भोवती माझ्या घराच्या भिंती.... तिचं अभाळही तितकं मोकळं नव्हतं का?
हा ’या हृदयीचे- त्या हृदयी’ असा संवाद की.... कल्पनेच्या विलासाला लागलेले चिमणीचे पंख?

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कोमेजली कवळी पानं


programming / coding चे चाललेले काही नवे प्रयोग... त्यासाठी करावी लागणारी internet वरची सखोल शोधाशोध... एकाग्रता...
अचानक गळून पडलेल्या झाडाच्या पानाच्या आवाजाने त्या वातावरणाला छेद दिला.

घरात पंचवीस एक ’हिरवी’ चिल्ली-पिल्ली वाढत आहेत. ह्या thermostat controlled 22oc वातावरणात ही कोणी नाराजी दाखवली?
सात-साडे सात फूट ताडमाड वाढलेल्या एका झाडाचे, काहीसे नवीनच, पान खाली पडले होते. मातीची आर्द्रता, बाहेरचे तापमान अशी जुजबी पाहणी केली आणि असं होतं कधीकधी, मनात म्हणत माघारी वळले.

पण गेल्या तीन दिवसात अशी पाच पानं? माझ्या अस्वस्थतेचा कडेलोट.. त्या झाडाचे जवळ-जवळ प्रत्येक पान मागून-पुढून तपासून पाहिलं. काही अनोळखी खुणा... काही वेगळी स्पंदनं... यांचा शोध घेतला. चक्क एक छानसं भिंग घेऊन सुद्धा.

हे सर्व चालू असताना एक वेगळाच विचार मनात आला..
असे गळून पडलेल्या भावनांचे आवाज पण ऐकू आले असते तर? आणि ते ऐकू येण्यासाठी शांतता हवी की संवेदनशीलता?


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Husbands


Parking lot full. अत्यंत सवकाश गाडी चालवत शोध घेणे चालू होते. तेवढ्यात अगदी अनपेक्षीत, एका गाडीने बाहेर निघण्यासाठी reverse घेतला आणि गाडीला गाडी टेकली... दोन्ही गाड्या खूपच slow असल्याने जे घडलं त्याला accident म्हणणं अवघड होतं. भारतात अशा वेळेस, दोन-चार अपशब्दांची देवाण-घेवाण होऊन दोघेही मार्गस्थ झाले असते.

ह्या देशातील नियमांप्रमाने पोलीस रिपोर्ट घेणे आवश्यक होते. आता चांगला अर्धा-पाऊण तास वाया जाणार तर... गाड्या as-it-is स्थितीत ठेवून दुसऱ्या गाडीतील जो कोणी असेल, तो driver खाली उतरेल आणि पोलीसांना फोन करेल, अशी वाट पहायला लागले. म्हणजे इथे तशा police instructions आहेत. कितीही मोठी ठोकाठोकी असली तरी, involved महिलेने गाडीतून खाली उतरायचे नाही. पण दुसऱ्या गाडीतून सुद्धा कोणी उतरेना. अच्छा, म्हणजे हा आम्हां दोन बायकांचा पराक्रम होता तर.

पोलीसांना फोन केला का, हे विचारायला दुसऱ्या गाडीपाशी गेले. ती जरा अस्वस्थ वाटली. कदाचित नवशिकी असावी. तिची गाडी reverse घेताना धडकली म्हणजे तिला papers मिळतील म्हणून घाबरली असावी. म्हंटलं, "Its OK. Don't worry."

चेहऱ्यावरचा गॉगल खाली करत म्हणाली, "पता नहीं अब घर जा के क्या क्या होगा । बडी मुश्कील से इतने सालों बाद driving सिखी हूँ । आप शायद समझ सकोगी । वैसे इंडिया के हो या पाकिस्तान के, husbands तो 'husbands' हि होते हैं !!

नेमके कसे react करावे हे न कळल्याने मी चेहऱ्यावर गॉगल चढवला आणि पोलिसांना फोन लावला.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

किती तरी दिवसात


"आजकाल कसं झालंय माहिती आहे का... जिस गली में internet ना हो बालमा, उस गली से हमें तो गुजरना नहीं ।"
असं ऐटीत कुणाला तरी म्हंटलं खरं...

पण बदलती जीवनशैली कशी अंगात भिनली आहे, तिच्या चक्रात नकळत कसे गुरफटलो आहोत, याची खाडकन जाणीव झाली.

शाळेत शिकलेली मर्ढेकरांची कविता, तेव्हा जेवढी समजली नाही त्याच्या कैक पटीने आज समजली.


किती तरी दिवसात नाही चांदण्यात गेलो;
किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी जुनीच;
आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच

केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय;
गावाकाठच्या नदीत होईन मी जलमय

आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी

बरा म्हणून हा इथे, दिवा पारवा पाऱ्याचा;
बरी तोतऱ्या नळाची शिरी धार, मुखी ऋचा !

- बा. सी. मर्ढेकर

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS