Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS
Showing posts with label ललित. Show all posts
Showing posts with label ललित. Show all posts

पृथक्‌

मराठी पाऊल पडते पुढे

('पृथक्‌' या सदराखाली अधूनमधून काही लिहावं असा विचार आहे. अर्थातच एखाद्या मराठी गाण्यावर. पण हा ब्लॉग नसेल. टिप्पणी किंवा विश्लेषण. आजच्या भाषेत याला, गाण्याचं deconstruction असं म्हणता येईल. कदाचित यात काहीच नवीन नसेल, पण एकत्रितपणे मांडलेलं असेल. तळापर्यंत जायचं असल्याने बहुतेक वेळा पुष्टीकरण असेल आणि नसलं तर तुम्हालाच विचारेन.😊🙏)

सुरुवात 'मराठी पाऊल पडते पुढे' या, याच नावाच्या चित्रपटातील शांता शेळके लिखित गाण्याने करते.

'मराठी पाऊल पडते पुढे' या चारच शब्दांतून व्यक्त झालेल्या ओजस्वी भावनेने मराठी मनाचा गेले कैक वर्षे जबरदस्त ताबा घेतला आहे. घरगुती संभाषण ते भव्य-दिव्य सोहळा, अशा कुठल्याही प्रसंगी हे गाणं, या गाण्याचे शब्द सतत वापरले गेल्याने पाठ असतात.
नुकतीच या गाण्यासंबंधी अधिक उत्सुकता निर्माण झाली.

चित्रपटात चित्रित झालेला कडव्यांचा क्रम आणि रेडिओवर ऐकू येणारा क्रम वेगळा आहे, याची नोंद मी आधीच घेतली होती, तरी ते तेवढं महत्त्वाचं नव्हतं. महत्त्वाचं होतं ते हे की याचे सगळेच्या सगळे शब्द शांताबाईंचे नाहीत, हे मला सतत जाणवणं.
शोध घेता जे लक्षात आले ते -

गाण्याची सुरुवात ज्या ओळींनी होते-
खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाचि अनुष्ठीला
भला देखे

या ओळी ’ज्ञानेश्वरी’तून, काही किरकोळ फेरबदल करून आल्या आहेत. श्रीमद्भगवद्गीतेच्या ३र्‍या अध्यायाच्या ३५व्या श्लोकाचं विवेचन करताना ज्ञानेश्वरीत म्हंटले आहे-
अगा स्वधर्मु हा आपुला ।
जरी कां कठिणु जाहला ।
तरी हाचि अनुष्ठिला ।
भला देखैं ॥
ज्ञानेश्वरी (३.२१९) गीता (३.३५)

मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदू ऐसे ॥
हे संत तुकाराम म्हणतात.
तुकाराम गाथा (९८१)

या अभंगात तुकारामबुवा हे मऊपण किती, हे त्यांच्या खास भाषेत सांगताना म्हणतात,
मेले जित असों निजोनियां जागे ।
जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥
भले तरि देऊं गांडीची लंगोटी ।
नाठ्याळा चि गांठीं देऊं माथां ॥

स्वये शस्‍त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई
जय जय रघुवीर समर्थ
यातील शेवटच्या शब्द समूहामुळे, या ओळींचा मी समर्थ रामदासांच्या साहित्यात (असफल) शोध घेतला.
मग अरुणाताई ढेरे आणि धनश्री लेले यांनी सांगितले, या ओळींची रचना समर्थ रामदास यांनी केली असल्याचा सार्वत्रिक समज असला तरी शांताबाईंनी आयत्या वेळी लिहिलेला हा श्लोक आहे. अगदी रामदासांचाच वाटेल इतका सशक्त.
डॉ. माधव खालकर यांनी रामदासी भाषेची वैशिष्ट्ये सांगत, या ओळी रामदास स्वामींच्या कशा नाहीत, हे समजावून सांगितले.
याबद्दल तीनही मान्यवरांचे मन:पूर्वक आभार.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

प्रेरणा

आज लहानपणीची शाळा आठवायचं कारण म्हणजे अर्थातच आजचा शिक्षक दिन.

आमच्या नाशिकच्या शाळेची दगडी इमारत लवकरच १०० वर्षांची होईल. 'गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल' किंवा 'शासकीय कन्या शाळा असं अत्यंत रूक्ष नाव असण्यार्‍या या शाळेने, सांगून होणारे 'शिक्षण' तर दिलेच पण न सांगता होणारे संस्कार जास्त दिले.

पूर्वी एकदा मी शाळेनंतरच्या आयुष्यात, माझी शाळा घेणार्‍या, माझ्या अनुभवांविषयी लिहिलं होतं.
कारण आता 'अभ्यास' या शब्दाचा अर्थ अधिक स्पष्ट आणि नेमका समजायला लागला आहे. 'धडे' पाठ्यपुस्तकांतून निघून जीवनाचे झाले आहेत. 'शिस्त' शब्दाने मनाच्या नियमनाची वाट धरली आहे.
तरी या सगळ्याची पायाभरणी शाळेत सुरू झाली, हे तर नक्कीच.

आमच्या शाळेत प्रार्थनेचा तास घड्याळ लावून एक तासाचा असायचा. अगदी सविस्तर.
मग ४५ मिनिटांचे इतर विषयांचे ८ ते ९ तास.

विषयांच्या तासांनी पुढे जाऊन मूल्यार्जनाची दिशा ठरवली. पण प्रार्थनेच्या तासाने जीवनातल्या मूल्यांची नीव ठेवली.

प्रार्थनेच्या तासाची सुरूवात राष्ट्र्गीत मग लगेचच 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत....' अशी प्रतिज्ञा घेऊन व्हायची. पुढे त्यात बरंच काही होतं.

आमची त्या तासात दर शनिवारी गायच्या समरगीतांची चांगली शंभर पानी वही होती. समूहस्वरात ही पदं त्या बालवयात म्हंटल्याने येणारी राष्ट्रभावना फार खोलवर रुजली. 'बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते..', 'भास्वर तुज सम भास्वर..',... सारखी अनेक अनवट समरगीतं, प्रेरणागीतं अजूनही तोंडपाठ आहेत. यातली काही आम्हाला शिकवायला तर स्वत: वसंत देसाई आले होते. याच पदांनी 'आठवणीतली गाणी'चा स्फूर्तीगीतांचा विभाग समृद्ध केला.

साने गुरुजींची 'भारतीय संस्कृती' याच तासात भेटली. गीतेचा बारावा आणि पंधरावा अध्याय संपूर्ण शाळेने एकत्र म्हणताना गुरुकुल संस्कृतीतील मंत्र पठणाचा अनुभव घेतला. हे किंवा यासरखे काही ना काही प्रत्येकाच्याच शाळेत असते.

पण आमच्या शाळेत प्रार्थनेच्या तासाला एक अशी गोष्ट करण्यात यायची की जिच्या वेगळेपणाची आणि असामान्य असण्याची जाणीव तेव्हाही होती आणि आजही आहे.

पद्धत अशी होती की प्रार्थनास्थळास जाण्यासाठी वर्गातून निघताना जेव्हा एका रांगेत आम्ही सगळ्या मुली उभ्या राहायचो, तेव्हा आम्हाला प्रत्येकीला विचारण्यात यायचं की, तू डबा घेऊन आली आहेस का?
कधी कुणी डबा आणायचं विसरतं, किंवा डबा घेऊन न येऊ शकण्याचं दुसरं कुठलंही कारण असू शकेल..
हे विचारण्याची जबाबदारी रोज पटसंख्येप्रमाणे फिरती असायची. मग त्या मुलीने वर्गातल्या फळ्यावर उजव्या कोपर्‍यात लिहून ठेवायचे- वर्गाच्या पटावर किती, त्यापैकी आज हजर किती आणि त्यातील किती जणींनी डबा आणलेला नाही.

हे अशासाठी की, सगळ्या वर्गाच्या हे दिवसभर लक्षात रहावं, आज आपल्या किती वर्गमैत्रिणी उपाशी राहाण्याची शक्यता आहे.
जेवणाच्या सुट्टीला सगळा वर्ग मोठ्ठा गोल करून एकत्र जेवायला बसायचा. शाळेला तीन भली मोठ्ठी पटांगणे असल्याने ते शक्य होतं. त्यावेळेस सकाळची ती मुलगी, जितक्या मुलींकडे डबा नाही तितक्या ताटल्या घेऊन वर्गाच्या गोलात फिरणार. प्रत्येक मुलीने त्यात आपल्या डब्यातल्या फक्त एक घास, प्रत्येक थाळीत ठेवायचा. या नियमामुळे डबा आणलेल्या मुलींना फक्त दोन-तीन घास कमी मिळायचे पण न आणलेल्या मुलींसाठी ते पन्‍नास-साठ घास पोटभर असायचे.

'एक तीळ सात जणांनी वाटून खावा.' हे फळ्यावर लिहिण्याचं केवळ एक सुभाषित झालं.
पण (शब्दश:) वाटून खाण्याची प्रथा, हे संस्कार झाले.
हे संस्कार माझ्यासाठी आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर दिशादर्शक ठरले.
'आठवणीतली गाणी'ची काही अत्यंत मोजकी प्रेरणास्थाने आहेत त्यात आमच्या शाळेचे स्थान फार वरचे आहे.
शाळेतील सर्व शिक्षकांना आजच्या शिक्षकदिनी आदरपूर्वक वंदन.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

मी वाजवीन मुरली

यापूर्वी मी या घटनेचा उल्लेख केला आहे पण आज त्याच घटनेच्या तर्कसंगतीपर्यंत पोचणे आणि त्या पलीकडेही थोडं,.... असं काही घडल्याने, पुन्हा एकदा सुधीर मोघे.
आणि वसंत पवार.
आणि आता गदिमाही.

सुधीरजींशी ओळख झाली तेव्हाच केव्हातरी त्यांनी मला एका गाण्याच्या पहिल्या काही ओळी ऐकवल्या होत्या. गाणं खूप जुनं होतं. 'मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका…'

मी ते पहिल्यांदाच ऐकत होते. ते म्हणाले, " १९५३ सालच्या 'अबोली' चित्रपटात आहे. संगीतकार आहेत वसंत पवार. लक्ष देऊन ऐक. ह्या गाण्याची चाल हुबेहूब १९६० सालच्या 'अवघाचि संसार'मधील 'रूपास भाळलो मी…'ची आहे. दोन्ही चित्रपटांचे संगीत वसंत पवारांचेच असल्याने बाकी प्रश्न उद्भवत नाहीत. पण का एका संगीतकाराला आपलीच चाल अशी काही वर्षांनी परत वापरावी असं वाटलं असेल ?"

मला त्यांच्या कवितांविषयीचे त्यांचे मत माहीत होते. त्यांना वाटे, एका उर्मीतून जन्माला आलेली कविता अथवा गीतरचना, तशीच्या तशीच असू द्यावी. त्यात नंतर काही बदल करू नयेत. तसे बदल करायला त्यांचा विरोध असायचा. अगदी एखाद्या संगीतकाराने काही कारणाने त्यांना विनंती केली तरीही. एकदा निर्मिती झाली की तिला तिच्या नशिबावर सोडून कवीने पुढे जावं, असं त्यांना वाटे. त्यामुळे हे चाल परत वापरण्याचे त्यांना खूपच आश्चर्य वाटत होते.
मी म्हंटलं, "पवारांना, या चालीला म्हणावा तितका न्याय मिळाला नाही, असं वाटलं असेल. आणि 'रूपास भाळलो मी… 'चे रसिकांच्या मनातील स्थान पाहता, ही शक्यता अधिक वाटते."
"असेल कदाचित.", सुधीरजी म्हणाले.

या संभाषणामुळे "मी वाजवीन मुरली…'चे कुतुहल मात्र कायम जागृत राहिलं. पुढे त्याची संपूर्ण ध्वनीफित मिळाली आणि ते 'आठवणीतली गाणी'वर पोचलं.

गेल्या आठवड्यात 'अबोली' चित्रपटातील गीतांची चित्रफित यूट्यूबर बघायला मिळाली. त्याच चित्रपटात अजून एक गाणं  आहे. 'रिमझिम करी बरसात, मेघा" हे पं. सुरेश हळदणकर यांनी गायले आहे. त्यांचे सूर जणू या गाण्यात नुसते रिमझिम बरसत नाहीत तर कोसळून आपल्याला आनंदाने चिंब भिजवतात…. पण पडद्यावर चित्रपटाचा नायक मात्र बाथ टबमध्ये बसून शॉवरच्या धारांकडे बघून हे गाणं गाताना दिसतो. थोडक्यात गीताचे शब्द आणि चित्रिकरणाचा फारसा ताळमेळ नाही.
वसंत पवारांचे या चित्रपटाचं संगीत दुर्लक्षित राहिलं, असं परत एकदा वाटून गेलं.

यानिमित्ताने गेले काही वर्ष जितक्या वेळा 'मी वाजवीन…' ऐकलं, तितक्या वेळा या गीताच्या शेवटच्या कडव्यातील शब्दांनी माझं लक्ष न चुकता वेधून घेतलं. शब्द गदिमांचे आहेत.

गदिमा हे गीतकार आणि कवी यातली सीमारेषा पार मिटवून टाकतात. त्यांच्या गीतरचनांमधील काव्य, यावर पुष्कळ काही लिहिता येईल. तसंच त्यांनी लिहिलेलं एखादं चित्रपट गीत 'संतवाणी'ची उंची गाठतं.

राधाकृष्णाचे प्रेम, हा मध्यवर्ती विषय असलेले हे गीत, त्याच्या शेवटच्या कडव्यात वेगळं वळण घेते. हा चित्रपट सामाजिक असल्याने गीतातील 'राधा' आणि 'कृष्ण' ही अर्थातच रूपकं आहेत.

कृष्ण राधेला म्हणतो,
मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका
होऊनिया मुकी तू वाळूत काढ रेखा

या गीतरचनेत कृष्ण, त्यांच्या दोघांच्या प्रेमाला 'माया' असं म्हणतो.
खरं तर दोघं कालिंदीच्या तीरी आहेत. कदंब वृक्ष आहे. वाळूत काढलेलल्या रेघा आहे. ती दोघंच आहेत. तीसरं कुणीही नाही.  तरी तो राधेला म्हणतो,  'माया' तुझी नि माझी…
कालिंदीचा किनारा, ते शांत संथ पाणी
राधामुकुंद दोघे, तिसरे न तेथ कोणी
माया तुझी नि माझी सांगू नकोस लोकां !

पुढे जाऊन कृष्ण राधेला म्हणतो, जरी आपण आत्ता प्रेमिक असलो तरी-
मायेत याच दोघे, ये मायलेक होऊ
प्रीतीत याच राधे, होऊ बहीणभाऊ
प्रेमास बंध नाही, ही बंधने तरी का?

हे जे आपले प्रेम आहे राधे,…
आणि प्रेम म्हणजे जर एकमेकांत जीव अडकणे आहे….
तर जन्मांतरीच्या फेर्‍यात आपण कुठल्याही नात्याने समोर आलो, तरी ते तसंच राहील.
कधी माय-लेक असू, कधी बहिण-भाऊ, कधी प्रियकर-प्रेयसी…
कधी सखा-सखी तर कधी गुरू-शिष्य किंवा अजून काहीही.

राधा-कृष्ण यांच्या प्रचलित प्रेमसंबंधाच्या कल्पनेला, फक्त तीन ओळीत, पार उधळून लावत गदिमांनी त्याला खोल आणि व्यापक संदर्भ दिला आहे.

माया तीच आणि तेवढीच…. नात्याचं रूप काहीही असो !
प्रेमास बंध नाही, ही बंधने तरी का ?

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

दृष्टिकोन

काही लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या कलाकृतींबद्दल माझं ’जरा वेगळं मत आहे’, असं 'politically correct' म्हणू की ’त्या मला फारशा आवडत नाहीत’ इतकं सौम्य म्हणू की ’त्यांच्यामुळे माझी चिडचिड होते’ असं बेधडक म्हणू? - हा मोठा गहन प्रश्न मला पडला आहे. पण याकडे केवळ एक वैयक्तिक दृष्टीकोन म्हणून पहावे.
ज्या दोन गझलांचा मी उल्लेख करणार आहे, त्यांची ख्याती सर्वदूर आहे.

या उर्दू शेराने एका प्रसिद्ध गझलेची सुरुवात होते. गायक हा सरतेशेवटी गाण्याचा चेहरा होत असल्याने ही गझल श्री. जगजीत सींह यांची आहे.
शेर कसा गायला ह्या विषयी नाही तर त्याच्या विषयाशी मी असहमत असल्याने त्याचे रचियता ’इब्न-ए-इंशा’ या शायरचा मला उल्लेख करावा लागेल. त्यांचं नाव सहसा कुणाला माहिती नसावं.
कारण ’कल चौदहवीं की रात थी’ ही गझल जगजीतजींचीच.

कल चौदहवीं की रात थी शब भर रहा चर्चा तेरा ।
कुछ ने कहा ये चाँद है कुछ ने कहा चेहरा तेरा ।

आठ-दहा पुरुषांनी हातात ’साकी’ने भरलेला ’जाम’ घेऊन एका स्‍त्रीच्या शरीर सौंदर्याची चर्चा करत, मयखान्यात रात्र काढावी, हे मला फार भयानक वाटतं. त्या माणसांच्या रिकामटेकडेपणाची हद्द वाटते व त्या कुणा सौंदर्यवतीचे दुर्दैव. अलीकडच्या भाषेत ह्या वागण्याला ’sexist’ आहे असं म्हणतात किंवा हे 'objectification' आहे, असं म्हणतात. त्या कुणा सुंदरीला अशी चर्चा होणे नुसते आवडणारच नाही तर तिला तिचा हा सन्मान वाटेल, हा पुरुषी अहंकार या शेरात आहे. पुढे जाऊन जेव्हा..

हम भी वहीं मौजूद थे, हम से भी सब पूछा किए,
हम हँस दिए, हम चुप रहे....

यानंतर मी पूर्णत: disconnect होते.
मुळातून हे माझे इतके टोकाचे मत असताना, एखाद्या गाण्याच्या मैफलीत माझ्या आजूबाजूस बसलेले स्त्री-पुरुष, ही गझल सादर व्हायला लागली की, "वाह, वाह !" करायला लागतात. मग ही दाद त्या गायकाच्या गाण्याला आहे की या शेरात वर्णन केलेल्या वातावरणाला, हे मला कळत नाही आणि मी तिथून सरळ काढता पाय घेते.

दुसरी आहे ती ’अहमद फ़राज़” या गझलकाराची ’रंजिश ही सही”. मेहदी हसन साहेबांनी तिला अजरामर करून ठेवली आहे. त्यांचं भावपूर्ण सादरीकरण इतकं मनास भिडतं की (मला) गझलेचे शब्द अजिबात आवडत नसताना सुद्धा सूर मनात रुंजी घालत रहातात. दिवसभर पाठलाग करतात.

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ

कुछ तो मिरे पिंदार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रह-ए-दुनिया ही निभाने के लिए आ

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ

इक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिर्या से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझ को रुलाने के लिए आ

अब तक दिल-ए-ख़ुश-फ़हम को तुझ से हैं उम्मीदें
ये आख़िरी शमएँ भी बुझाने के लिए आ

ही पुन: एक स्वकेंद्रित रचना. स्वत:पुढे काहीच नाही. 'मला परत सोडून जाण्यासाठी ये.’, ’माझी समजूत काढायला ये.’, ’समाज-रीत पाळण्यासाठी ये.’, ’लोक काय म्हणतील म्हणून ये.’, ’मला परत एकदा रडवायला ये.’, पण ये....

ही प्रेयसी नुसती नाराज होऊन गेलेली नाही तर ती नाराज होऊन, सोडून गेली आहे. ही break-up situation आहे. त्यामुळे ही गझल फक्त कवितेच्याच मर्यादेत रहावी. प्रत्यक्षात असे मागे लागणे चीड आणू शकते. जिथे स्त्रियांच्या ’नाही’ म्हणण्याचा मान ठेवा, असे शिकवण्याची गरज आहे, तिथे हा हात धुवून मागे लागण्याचा सोहळा फार विरोधाभास निर्माण करतो.

पण या गझलेकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टीकोनापेक्षाही नुकतीच ती एका अशा अर्थाने माझ्यासमोर अचानकपणे आली की मी अक्षरश: स्तब्ध झाले. हातातले काम हातातच राहिले. हा नजरिया फार वेगळा होता. दूरचित्रवाणीवरील ’दोन स्पेशल’ कार्यक्रमात जितेंद्र जोशी मुलाखत घेत होते. समोर शुभांगी गोखले बसल्या होत्या. विषय त्यांचे दिवंगत पती मोहन गोखले यांचा चालला होता. तेव्हा शुभांगीताईंना अश्रू अनावर झाले आणि त्या म्हणाल्या,
"मोहन फार लवकर गेला. मला कधी कधी असं वाटतं की त्याला सांगावं, आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ, रंजिश ही सही ...."


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

विनवित मेघा तुला


आषाढ मासारंभ झाला की रसिकजनांचा 'आषाढ दर्द' जागा होतो.
हुरहुर, विरह, ओल्या सर्द हवेची न सोसणारी जडता, कवी शंकर रामाणींनी वर्णन केलेले डोळ्यांतले 'मूढ पाणी'.... आणि मेघदूत.
या आषाढ प्रतिपदेलाही अशीच कुणाचीतरी एक हळवी स्मृती जागी झाली आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या कुणी फारसं न ऐकलेल्या एका गाण्याने सोशल मिडिआचे जग व्यापून गेले.

'आठवणीतली गाणी'- ही आता केवळ 'एक संकेतस्थळ' म्हणण्याइतकी रूक्ष जागा राहिलेली नाहीये. असंख्य दर्दीजनांशी तिची भावनिक नाळ जोडली गेली असल्याने, माझ्याकडे या गाण्याची ध्वनिफीत लगेच पोचली. 'हे ऐक. वेगळं आणि चांगलं आहे. बाकी सगळं सोड आणि याच्या खोलात जा.' असं मला हक्काने सांगितलं गेलं.
आणि मग सुरू झालेला शोध....

आषाढाच्या पहिल्या दिवशी
अवचित दिसशी मला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

तप्तांचा तू असशी आश्रय
इंद्रसचिव तू, तू करुणामय
निरोप माझा घेउनी जाई अलकानगरीला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

प्रिया दूर मम, तिला भेटशी
मनी वाटते, नाही न म्हणशील
विफल विनवणी सुजनी बरवी, नको शठी सफला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

कुठला घ्यावा मार्ग प्रथम तो,
सांगुनी नंतर निरोप कथितो
दूत होवुनी पोचीव माझ्या दुःखी दयितेला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

या पदाचे गायक अभिषेकीबुवा असल्याने शौनकजींशी सगळ्यात पहिला संपर्क केला. ते फार तत्परतेने माहिती देतात. त्यांनी सांगितले, हे गीत 'गीत-मेघ' (अनुवादित 'मेघदूत') या दूरदर्शनवरील कार्यक्रमासाठी तयार केले गेले होते.

त्यांच्याशी संपर्क करत असताना एकीकडे माझा इंटरनेटवर शोध सुरू होताच.
फक्त एका लेखात या गीताचा संदर्भ मिळाला. लेख श्री. अरुण काकतकर यांनी २०१२ मधे लिहिला होता. लेखाचं नाव होतं 'पाऊसं पाऊसं, येता वाटतं हायसं'.
त्यांना फोन केला. ते म्हणाले, "दूरदर्शनवरील ह्या रूपकाचा प्रस्तुतकर्ता मीच होतो. यात एकूण सात गाणी होती. दोन बुवांची, दोन रामदास कामतांची, आणिक काही. निवेदन ज्योत्‍स्‍ना किरपेकर यांनी केले होते. दूरदर्शनकडे या कार्यक्रमाची चित्रफित आता नाही. पण माझ्याकडे ती सगळी गाणी आहेत. ती मी देईन."
न राहून शेवटी मी विचारलंच, "मला यातली एक ओळ अडली आहे. त्यातील शब्दांचे अर्थ मला माहिती आहेत. पण 'मेघदूत'चा माझा काही आभ्यास नाही. म्हणून संदर्भ लागत नाहीये."
त्यांनी लगेच सांगितले, मी हा प्रश्न डॉ. वसंतराव पटवर्धन (महाराष्ट्र बॅंकेचे माजी अध्यक्ष) यांना विचारावा. ते या पदाचे रचियता आहेत. आणि मेघदूताचे हे भाषांतरही त्यांनीच केले आहे. हा त्यांचा फोन नंबर.

आज सकाळी वसंतरावांशी बोलणे झाले. त्यांना विचारले,
"मी, 'विफल विनवणी सुजनी बरवी, नको शठी सफला' इथे अडले आहे. 'बरवी' म्हणजे चांगली. 'शठ' म्हणजे लुच्चा. पण संदर्भ लागत नाहीये."
ते म्हणाले, " 'मेघदूता'ची मराठीत सी. डी. देशमुखांसकट २६ जणांनी भाषांतरे केली आहेत. त्यातलं माझं- 'विनवित मेघा तुला' या नावाने आहे. हे पुस्तक आता उपलब्द्ध नाही. पण मी त्याची फोटोप्रत करून तुला देतो. ही ओळ ज्या संदर्भात येते, त्या मेघदूतातल्या ओळी अशा ..

(तेनार्थित्वं त्वयि विधिवशादूरबन्‍धुर्गतो हं)
याण्‍चा मोघा वरमधिगुणे नाधमे लब्ध्कामा ॥

(मी दुर्दैवाने माझ्या स्वजनांपासून दूर असल्याने तुलाच विनंती करतो. आणि कसं आहे,..)
एकवेळ सुजनांना केलेली विनंती 'विफल' झाली तरी चालेल, पण एका 'शठा'ला केलेली विनवणी 'सफल' होणे नको.
'विफल विनवणी सुजनी बरवी, नको शठी सफला'

ही अशी गाणी, त्यांबद्दलची सर्व माहिती देणारे असे हे सुहृद - मान्यवर, 'आठवणीतली गाणी'स अधिक श्रीमंत करतात.
ज्यांनी माझ्यापर्यंत हे गाणे पोचवले ते सर्व, श्री. शौनक अभिषेकी, श्री. अरुण काकतकर (वय वर्षे ७५) आणि डॉ. वसंतराव पटवर्धन (वय वर्षे ९२) यांच्या ऋणात मी व्यक्तीश: आहे.

टीप : हे पद ऐकण्यासाठी 'आठवणीतली गाणी'वर उपलब्द्ध आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

निमित्त आणि नेम


जरी निमित्त 'आठवणीतल्या गाणी'वर नुकत्याच समाविष्ट केलेल्या ३२ गाण्याचं आहे...
तरी असे विचार आणि असा आचार माझ्यासाठी नित्यनेमाचा..........

(संदर्भ- आठवणीतली गाणी / नवीन भर / १३ डिसें. २०१८)

• विदुषी प्रभाताई अत्रे यांनी संगीत दिलेले आणि गायलेले 'दारी उभी अशी मी..' हे गझलेच्या अंगाने जाणारे पद आहे. तब्बल १० मिनिटांची एक दर्दभरी शिकायत प्रभाताई आपल्या समोर मांडतात. ऐकताना वाटलं, हे आचंबित करणारे शब्द कोणाचे असावेत?...
सुरेश भटांची झलक दिसते आहे खरी. त्यांच्या ’मी एकटीच माझी असते कधी कधी..’च्या वळणानं जाणारी रचना.., पण.. नाही, ते नसावेत. भट गाठतात त्या भावनिक उत्कटतेच्या हे थोडं खाली आहे....
मग विंदा? त्यांनी पण एका कवितेत म्हंटलंय, 'स्वप्‍नास सत्य असते सामील जाहलेले.'.. नक्की कळत नाही.
अतींद्र सर्वाडिकर या प्रभाताईंच्या शिष्याकडे धाव घेतली आणि कळलं गीताचे शब्द अशोकजी परांजपे यांचे आहेत. अशोकजी परांजपे तसे दुर्लक्षितच राहिलेले!..........

• पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला श्री संत नामदेवांचा अभंग 'सगुण संपन्‍न पंढरीच्या राया’. शौनक अभिषेकींचा सहस्वर. अभंग भिन्‍न षड्‌ज रागात आहे. हा राग म्हंटला की उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ां साहेब यांच्या 'याद पिया की आए..' या ठुमरीच्या आठवणीची कळ तर उरी येणारच...............

• गदिमांचं अगदी साधं आणि निरागस गाणं- 'आवडला मज मनापसुनी गडी तो घोड्यावरचा..' यात एक ओळ आहे- 'बाजाराला जाता जमला शिनवे त्याचा आमचा..'
आता हे 'शिनवे' म्हणजे काय? जवळचे सगळे मराठी, संस्कृत शब्दकोश धुंडाळले. इंटरनेट खंगाळलं. व्यर्थ.
मग सुमित्र माडगूळकरला हाक. त्यानेही ताबडतोब योग्य व्यक्तींमार्फत भाषातज्ञ डॉ. सयाजीराव मोकाशी यांच्यापर्यंत पोचावं आणि काही मिनिटातच 'शिनं' या माणदेशी शब्दाचा संपूर्ण अर्थ उलगडणारं सयाजीरावांच्या आवाजातलं फोनवरील रेकॉर्डींग whatsapp करावं.
आपणही गदिमांनी वापरलेल्या हटके शब्दांच्या सुयोग्य वापराने स्तिमित होऊन जावं............

• 'भातुकली उधळली अचानक..' सुमनताई कल्याणपूर यांच्या आवाजातलं हे गाणं... त्यांनी पार्श्वगायन केलेल्या त्यांच्या पहिल्या मराठी सिनेमातलं. चित्रपट 'दिसतं तसं नसतं'. साल १९५६. बाईंच्या गाण्यातला दर्द खानदानी आहे. संयत आहे तरी खोल आहे. असाच दर्द त्यांनी 'बोलकी बाहुली' मधल्या 'आठवे अजुनी यमुनातीर..' मध्ये दाखवला आहे. या गाण्यातली 'सौख्य छळे मज......' ही ओळ लक्ष देऊन ऐकावी. गाण्यातून अभिनय केलाय सुमनताईंनी...............

• 'हे राष्ट्ररूपिणी गंगे! घेईं नमस्कार माझा.' या आनंदराव टेकाडेंच्या कवितेच्या शोधात मी गेली वर्षभर होते. दोन महिन्यांपूर्वी पुण्यात असताना, पुणे मराठी ग्रंथालयाला फोन केला. सांगितलं, माझ्याकडच्या आनंदरावांच्या 'आनंद गीते'च्या पहिल्या भागात ही कविता नाहीये. तर तुमच्याकडे भाग २, ३, ४ आहेत का? मला संदर्भासाठी चाळता येतील का? नारायण पेठ, लोखंडी तालीम या त्यांच्या पत्त्यावर पोचायच्या आधीच तिथल्या वाचन विभागात ही पुस्तके तयार होती. पान-पान पिवळं-जीर्ण झालेल्या त्या पुस्तकांतील भाग ३ मध्ये ही कविता मिळाली. ग्रंथालयाच्या परवानगीने त्या पानाचा फोटो काढला. वर त्यांनी हेही सांगितले, अशा संदर्भांकरिता कधीही भेट द्या.
आकाशवाणीवरून स्फूर्तीगीतांच्या कार्यक्रमात ही कविता अनेक वेळा सादर होते........

• 'प्रियकर:' हे संस्कृत गाणं, दोन वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या 'YZ' या मराठी सिनेमातलं आहे. केतकी माटेगावकरच्या स्पष्ट उच्चारांनी आणि नादमधूर गायनाने लक्ष वेधून घेतलेलं. पण हे संस्कृत श्लोक कुठून घेतले आहेत.... ते जसेच्या तसे घेतले गेलेत की त्यात काही बदल केलेत?..... शोधयात्रा संपल्यावर वाटलं, आपल्या जे समजलं आहे ते समस्तांस कळवण्याची तातडी करावी, हे बरं.
जसं, 'तोच चंद्रमा नभात..' हे शान्ताबाईंनी एका संस्कृत श्लोकावरून घेतलं आहे, असं सगळे म्हणतात. पण आपण शीला भट्टारिका यांचा तो श्लोक शोधून काढून 'आठवणीतली गाणी'वर उपलब्ध करून दिलाय, तसं......

• तीन महिन्यांपूर्वीचं बाबांचं जीवघेणं आजारपण... खरोखरीच त्यांचा जीव घेऊन गेलं. ICU च्या बाहेर १२-१३ दिवस बसून राहणे. अनिश्चितता. कासावीस. पण हातात केशवराव भोळ्यांचं त्यांचा सांगीतिक दृष्टीकोन विषद करणारं पुस्तक. का कुणास ठाऊक, त्याचा पण कोण आधार वाटला... त्यातूनच 'आठवणीतली गाणी' करता चार-पाच संदर्भ लेखही मिळाले.
म्हणता म्हणता संकेतस्थळावरील संदर्भ लेखांची संख्या शंभरच्या वर गेली की !....

• गेल्या महिन्यातली गोष्ट. फेसबूकने स्वत:च्या वागण्यात बरेच बदल केलेत. अरे देवा!
हे फेसबुकचं नेहमीचंच तरी आपल्याला आता धावपळ करून त्याचे वेबसाईटवर झालेले परिणाम निस्तारावे लागणार! वेबसाईटच्या प्रोग्रॅम कोड मध्ये काही बदल करावे लागतील आणि त्यासाठी इंटरनेटवर खूप सगळं संशोधन करावे लागेल. हं....!
त्यात या महिन्यात आपणच आपल्याशी केलेला एक व्यक्तीगत पातळीवरील वायदा. #Dubai30x30 fitness challenge, #DistanceRunning च्या अंतर्गत एका महिन्यात कमीत कमी शंभर कि.मी. पळण्याचे स्वीकारलेले आव्हान.... एक ती धावपळ आणि एक ही पळापळ.... दोन्हींनी तसा वेगवेगळ्या अर्थाने घाम काढला... पण पूर्ततेनंतरचे समाधान काही वेगळे.

सुधीर मोघे नेहमी म्हणायचे, "प्रश्न पडणं थांबवू नकोस. ते सतत पडावेत. उत्तरं कधी लगेच सापडतील तर कधी वेळ लागेल."
या अशा शोधयात्रांमध्ये मला पंढरीची वारी दिसते.
.. आणि अशी खोलात जायला लागले म्हणून अनेक गीतरत्‍नं मला सापडली आहेत,... सापडतील.
कबीर म्हणतात तसं,
जिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ।

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Outsourcing


नवर्‍याचा सगळा दिवस checklists, check boxes आणि reminders यांवर चालत असतो. आणि नेमक्या याच कारणामुळे तो आता एका परिस्थितीत सापडला आहे.
त्याचं झालंय असं......

मी नं माझ्या नवर्‍याची peripheral memory आहे. म्हणजे external hard disk म्हणा नं...

या व्यवस्थेने एक साध्य होतं की त्याला 'office' या विषयाच्या परिघाबाहेर मुद्दामहून फार कमी लक्षात ठेवावं लागतं.
जसं काही- येऊ घातलेले सणवार, लग्नं-मुंजी-वाढदिवस, येणारे पाहुणे, असलं काहीही.... फक्त गरज असेल तेव्हा मला विचारावं.
नेहमीच्या नसलेल्या कोणाकडेही जाताना, त्यांना असलेली मुलं-बाळं, त्यांच्या घरी जाण्याचा रस्ता या सर्व गोष्टींवर मी त्याला गाडीत बसल्याबसल्या अद्ययावत करत असते.
असली माहिती फार काळ retain करण्याची गरज नाही असं त्याला वाटतं. तीचा वापर झाला की तितक्याच तत्परतेने विसरून जावी.

( हे सगळं कसं त्या शेरलॉक होम्स्‌ सारखं आहे. तो नाही का त्या डॉ. वॉटसनला म्हणतो, "Now that I know the Earth revolves around the Sun, I will make an every effort to forget it." कारण त्याच्या Science of deduction मध्ये या माहितीचा काहीच उपयोग नव्हता. )

त्यामुळे एक तर मी, नाही तर त्याच्या त्या checklists, यांवरच त्याला अवलंबून रहावं लागतं.

या याद्या बनवणं हा सुद्धा एक मजेशीर प्रकार असतो.
उदाहरणार्थ, वाणसामानाची यादी. या यादीतील प्रत्येक पदार्थाचं रंग-रूप वर्णन करून सांगावं लागतं.
जसं काही,
'१ किलो पोहे आणायचे आहेत. पण पोहे दोन प्रकारचे असतात. जाड आणि पातळ. मला जाड हवे आहेत. समोर आहेत ते नेमके जाड आहेत की पातळ हे तुला कळणार नाही. तिथे काम करणार्‍या माणसाला त्यांच्याकडे असलेले सर्व प्रकारचे पोहे दाखवायला सांग. त्यातले जे तुला relatively जाड वाटतील ते आण.’
किंवा ’कोबीच्या गड्ड्याचा diameter ५ इंचांपेक्षा जास्त नको.’

या सगळ्यात दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेला प्रकार काही बसत नव्हता.

मी पुण्यात असतानाची गोष्ट आहे. त्याने दुबईहून फोन केला आणि सांगितलं, "I love you."
इतकी उत्‍स्‍फूर्तता, असं व्यक्त होणं, त्याच्या स्वभावाचा भाग नसल्याने भांबावून मी पण म्हंटलं, "बरं मग? त्याचं आत्ता काय? झाली की लग्नाला कितीतरी वर्ष."
तरी त्याचं आपलं तेच.. "Today I have to tell you, I love you."
काही दिवसांनी परत तसाच फोन.. मग परत पुन्हा.... (मी मनात... फार प्रवास झाला वाटतं आपला एवढ्यात.. ... तब्येत बरी आहे ना याची... / .... वगैरे.)

दुबईत परत आले तरी तेच. पण यावेळेस वाक्य थोडं बदललं होतं. Today is Tuesday and I love you....
आता हा मंगळवार कुठून आला ?

शेवटी समोर बसवलं आणि हा काय प्रकार समजावून सांगायला लावला.
म्हणतो कसा, "नाही. नाही. मंगळवार तसा incidental आहे. माझ्या असं लक्षात आलंय की मी तुला असं काही फारसं म्हणत नाही. But I should be saying such a thing to you regularly. म्हणून मी सरळ दर मंगळवारचं एक reminder फोनवर टाकलंय. To tell you- I love you."

माझा अर्थातच- dropped jaw.

मग मी पण काट्यानेच काटा काढायचा ठरवला. त्याचा फोन घेतला. ते reminder delete केलं.
आणि एक नवीन Location based reminder तयार करून टाकलं.
Repeat - Forever
Location - Our home
Reminder text- 'Google- Remind me to be nice to Alka when I am at home.'
आता या माणासाने बाहेरून येऊन कधीही घरात पाऊल टाकलं रे टाकलं की त्याचा फोन ’टण्ण’ वाजतो आणि नवर्‍याला एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून देतो.

माझ्या चेहर्‍यावर हलकिशी स्मितरेषा उमटते पण मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. 🤣😇
Love such idiosyncrasies in people. Life is beautiful !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सय


दूधाची पिशवी सकाळी घरी येणे- या अनुभवापासून मी अंदाजे २० वर्षे वंचित आहे.
दुबईला प्लॅस्टीकच्या कॅनमधले, सुपरमार्केटमधून आणलेले दूध असते. पुण्याला काही दिवसांसाठी आले की अमूलचे tetra pack वापरते.

साय-दही-ताक-लोणी-तूप-बेरी आणि तीवर पिठीसाखर घालून खाणे हा अनुभव, २-३ आठवड्यांच्या भारतातील नाचानाचीत पूर्णत्वास नेता येत नाही. पुण्यातल्या या मुक्कामात मात्र काही कारणाने दूधाची पिशवी आणली....
आणि दूध तापवताना उतू गेलं. अगदी गॅसचा नॉब पकडून उभं राहून सुद्धा नेमक्या क्षणी दुर्लक्ष झालं. दूधाला आलेला उमाळा त्याला.. खरं तर मला आवरता आला नाही. सायीचं एक टोक पातेल्यावरून ओघळलं.. त्याच्या नादाने दूधाचे काही मोजकेच थेंब.. पण टप टप करीत गॅसवर पडले. सगळं पातेलं मात्र सायीने- माखलं. 'माखलं' हे उगीच सकारात्मक बोलायचं म्हणून. पण खरं तर बरबटलं.

गोष्ट अगदी किरकोळ, घरोघरी, अगणित वेळा घडणारी. दूध उतू जाणे.
पण ते तसं घडलं आणि आईची आठवण आली.

लहानपणी नाशिकला घरी दूधाची पिशवी आली की, दूध आणि त्याची पिशवी, यांना त्यांच्या logical end पर्यंत नेण्याची तिने ठरवलेली अशी एक प्रणाली होती आणि ती आम्हा भावडांनी पाळणे बंधनकारक होते. दुधाने गच्च भरलेली पिशवी आधी पाण्याच्या नळाखाली धरायची. स्वच्छ धुवायची. स्टीलचे एक पातेले पाण्याने विसळून त्यात २ चमचे पाणी तसेच ठेवायचे. मग दूधाच्या पिशवीचे एक टोक कात्रीने कापायचे आणि दूध त्या पातेल्यात ओतायचे. नाशिकच्या त्यावेळच्या पहाटेच्या थंडीत ती पिशवी दूधातल्या मलईने आतून तशीच लडबडलेली राहायची. मग अर्धा वाटी पाणी उकळून घ्यावं. ते एका मागून एका सगळ्या पिशव्यांत फिरवावं आणि शेवटी दूधाच्या पातेल्यात ओतावं.

दूध किती तापवावं.. तर दूधाचं पोट तडस लागल्याइतकं फुगावं पण साय न मोडावी, इतकंच. पातेल्यावर बरबटीची एक रेघही न उमटावी. अशा सायीचं खास असं एक texture असतं. दुपारी फ्रीजमधून पातेलं काढलं की सूरीने पातेल्यापासून विलग केलेली साय एखाद्या थालीपिठासारखी उचलून दह्याच्या विरजणावर विराजीत करावी.

यात काही गडबड झाली तर आईला ते कळू न देण्याची आमची पण तितकीच ठोस तयारी होती. पण आम्हाला ती कितीही कडेकोट वाटली तरी आईच ती.. त्यातल्या फटी तिला बरोबर समजायच्या.
. दूध उतू गेलं की सगळ्यात पहिल्यांदा ते दुसर्‍या एका पातेल्यात काढावे.
. पातेले बदललेले आईला नक्की समजणार. म्हणून पहिले पातेले धुवून दूधास परत मूळ पातेली परत आणावे.
. या सगळ्यात सायीच्या त्या खास texture ची बरीच मोडतोड होणार. ती काही लपवता येणार नाही.
. त्यामुळे दुपारचा चहा करण्याची तत्परता दाखवावी, ज्या आड मोडलेली साय लपवण्याचा एक दुर्बळ प्रयत्‍न करावा. तत्परता प्रमाणातच असावी. अती करणे हेतूस मारक ठरते.
. आणि तरीही चहा पिऊन झाल्यावर 'आज दूध उतू गेलं वाटतं' हे आईचं वाक्य ऐकावं.
. संध्याकाळी, हे तिला कळलं कसं? याचा आणि पुढील सुधारणांचा विचार करत दोन बहिणी एका भावाने खलबतं करावी.... पुन्हा एकदा पकडलं जाण्यासाठी.

एक दूध उतू गेलं काय.. आणि तिच्या मायेची साय अशी अचानक आठवणींवर दाटून आली !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

जित्या गळ्याचा माणूस


( हा लेख सुप्रसिद्ध मराठी भावगीत गायक श्री. अरुण दाते यांच्या ‘शुक्रतारा’ या आत्मचरित्रात प्रसिद्ध झालेला आहे.
शब्दांकन - सुलभा तेरणीकर : मोरया प्रकाशन, पुणे : प्रथम आवृत्ती - ४ मे २०१६ )

थोर कलाकारांभोवती नेहमीच उत्सुकतेचे वलय असते. या कुतूहलाचे निवारण वेळोवेळी, त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर- त्याच्यांवरील लेखांमधून, त्यांच्या मुलाखतींमधून होत जातं. पण काही माणसं अशी असतात की त्यांना कितीही जाणून घेतलं तरी अजून काही जाणणं दशांगुळे उरतंच. ‘अरुण दाते’ या कलाकार आणि व्यक्तिमत्त्व, अशा दोन्ही अर्थाने टोलेजंग माणसाविषयी नेमकं हेच म्हणता येईल.

तब्बल सहा दशकांची सांगीतिक कारकीर्द, २६०० हून अधिक, फक्त स्वतः गायलेल्या गाण्यांचे जगभर केलेले कार्यक्रम.. यामुळे रसिकांचा प्रचंड आदर, प्रेम ‘याचि देही याचि डोळा’ बघण्याचे भाग्य अरुणजींना लाभले आहे. जी. एन्‌. जोशी, बबनराव नावडीकर, गजाननराव वाटवे यांनी घालून दिलेल्या पायावर मराठी भावगीत परंपरेची उत्तुंग इमारत अरुणजींनी उभारली. या इमारतीस जवळपास पाच पिढ्यांचे मजले आहेत. या मजल्यांमधून अरुणजींनी गायलेल्या गीतांचं प्रसन्‍न वारं झुळझुळत असतं. त्या वार्‍याला काळाचा शिळेपणा अजिबात शिवलेला नाही, शिवूच शकत नाही. कुणीही रसिकाने येथे आश्रयास यावं. या वार्‍याची एक लहर अंगावर घ्यावी आणि ताजंतवानं होऊन जावं.

अरुणजींनी ही भावगीते जनसामान्यांपर्यंत नेऊन पोचवली. ती रसिकांच्या मनांना भिडली, हृदयांवर राज्य करू लागली. आज देखील आकाशवाणीच्या ‘आपली आवड’ सारख्या कार्यक्रमात दाते साहेबांचं गाणं वाजलं नाही असा दिवस विरळाच असेल. बोजड नसलेले शब्द, वेधक चाली आणि त्यावरचा कळस असलेला अरुणजींचा मार्दवपूर्ण आवाज, शैली.. खानदानी शालीनतेचा साज ही गीते गेली ६० वर्षे मिरवीत आहेत.
याला समांतर आणि अरुणजींच्या समकालीन उदाहरण गझल गायक जगजीत सिंह यांचं देता येईल. जगजीतजींच्या आधी आणि त्याच वेळेस अनेक गायक उर्दू गझल गात असत. पण जगजीतजींनी गझलेला रसिकांच्या मनांत रुजवलं आणि गळ्यावर चढवलं.

१९६२ च्या सुमारास अरुणजी त्यांचं पहिलं मराठी भावगीत ‘शुक्रतारा मंदवारा’ गायले. शुक्र ग्रह अवकाशात कधी जन्माला आला माहित नाही पण पाडगांवकर-खळे-दाते या त्रयीच्या ‘शुक्रतारा’ने जन्म घेतला आणि तेव्हापासून ही ‘शुक्राची चांदणी’ मराठी भावसंगीताच्या अवकाशातलं आपलं अढळ स्थान राखून आहे. ‘भारलेल्या या स्वरांनी’ रसिकांचा जन्‍म भारला गेला तो कायमचाच.

‘हात तुझा हातातुन’, ‘पहिलीच भेट झाली’, ‘येशिल येशिल राणी’, ‘श्रीरंस सांवळा तू, मी गौरकाय राधा’, ‘मज सांग सखे तू सांग मला’ सारख्या गाण्यांनी प्रेमाची परिभाषा निर्माण केली. ‘सच्ची मुहब्बत’चे तरल स्वर- मृदू, संयत आवाजात रसिकांपर्यंत पोहोचू लागले.

पण हा आवाज फक्त प्रेमतरंगांवर लहरत राहिला, असं नाही. ‘भातुकलीच्या खेळा’मधली तडप, ‘वाळवंटातून भीषण वैराण’ मधला अंगावर येणारा एकटेपणा, ‘धुके दाटलेले’ मधले औदासिन्य, ‘या जन्मावर या जगण्यावर’ मधली जिंदादिली, ‘असेन मी नसेन मी’ मधली शाश्वतता, ‘सोबती’ चित्रपटतील ‘देवाघरच्या फुलातली’ असहय्यता, ‘डोळ्यांत सांजवेळी’ मधला समजूतदारपणा, ‘अखेरचे येतील माझ्या’ मधली फकिरी, ‘जपून चाल्‌ पोरी जपून चाल्‌’ मधलं लावण्य (पाडगांवकरांनी खास अरुणजींच्या विनंतीवरून त्यांच्यासाठी लिहिलेला हा ‘लावणा’).... हे सर्व अरुणजींनी आपल्यापर्यंत तितक्याच दृढतेने पोचवलं.

मराठी भावसंगीतावर त्यांनी उमटवलेला ठसा, इतका ठळक आणि खोल आहे की जणु ‘मराठी भावगीत’ आणि ‘अरुण दाते’ हे समानार्थी शब्द व्हावेत. मी हे धाडशी विधान करण्याचं कारणही तसंच आहे. त्याचं झालं असं, स्‍नेहासिस चॅटर्जी नावाचे माझे एक बंगाली मित्र आहेत. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्यावर त्यांनी खूप आभ्यास, लेखन केलं आहे. लताबाईंच्या मराठी गाण्यांसाठी त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. आमच्या अनेकवेळा चर्चा झाल्या. स्वाभाविकपणे दिदींच्या भावगीतांचा उल्लेख आला. तेव्हा स्‍नेहासिस म्हणाले होते.... "भावगीत तो वहीं होता हैं ना जो अरुण दातेजी गाते हैं।"

कवी सुधीर मोघे हे मला गुरुस्थानी. त्यांच्याकडे गेले की हा एक प्रश्न नेहमी चर्चेत असायचा. ‘गाणं नेमकं कोणाचं ? संगीतकाराचं की गायकाचं ?’ इथे ‘चर्चा’ किंवा ‘गप्पा’ म्हणणं खरं तर अवघड अशासाठी- की ते बोलायचे, खूप सांगायचे आणि मी ऐकायचे.
त्यांच्या मते गाणं- हे त्याच्या अंतीम टप्प्यात रसिकांचंच होतं. ते तसं व्हायलाच हवं. पण कवी आणि संगीतकार या दोघांच्या भुमिकांबद्द्लची तौलनिक मतं ते स्वत:च मांडायचे. कधी एकाच्या बाजूने पारडं जड तर कधी दुसर्‍याच्या. (खरं तर ते स्वत: कवी / गीतकार / संगीतकार. पण व्यक्तीश: त्यांच्यासाठी एकदा कविता कागदावर उतरली की ती तिच्या मार्गाने, तिच्या नशिबाने जाते आणि कवी त्याच्या.)

मी त्यांना एकदा म्हंटलेलं, ‘गायक’ हा त्या गाण्याचा प्रवक्ता किंवा चेहरा असतो. म्हणून जर गीताच्या शब्दरचनेविषयी किंवा चालीविषयी बोललं जात नसेल तर उरलेला पूर्णवेळ गाणं हे (लौकिक अर्थाने) गायकाचं असतं. याची पुष्टी म्हणून आज मला हे एक उदाहरण देता येईल. ‘संगदिल’ या हिंदी चित्रपटात ‘दिल में समा गयें सजन’ असं एक गाणं आहे. त्याच्या वजनावर, मराठीतल्या एका वेगळ्या छंदात, गंगाधर महाम्बरे यांनी एक गीत लिहिलं आणि त्याला हृदयनाथांनी चाल लावली. ‘संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा, चांद येई अंबरी..’ जेव्हा कधी या गाण्याच्या इतिसासात, खोलात जाण्याची वेळ येते तेव्हाच या तपशीलाचं महत्त्व. अन्यथा आपल्यासाठी ते फक्त अरुण दातेंचं गाणं असतं.
दाते साहेबांनी, त्यांनी गायलेल्या सर्व गाण्यांना असं सर्वाथाने आपलं करून घेतलं आहे.

जाताजाता अरुणजींच्या नावावर नसलेल्या तीन गाण्यांचा मला मुद्दामहून उल्लेख करायचा आहे. ’काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही’,’पाऊस कधीचा पडतो’ आणि ‘उष:क्काल होता होता’. ही गाणी अरुणजींच्याही आवाजात ऐकता येतात. त्या गाण्याचे प्रचलित गायक आणि अरुणजींसारख्या सिद्धहस्त गायकाने केलेला त्यांचा आविष्कार, हे दोन्ही पाठोपाठ ऐकण्याचा आनंद काही वेगळा आहे.

आणि त्यांच्या दोन युगुलगीतांच्या ध्वनीमुद्रीत स्वरुपाच्या शोधात मी बरेच वर्षे आहे. दोन्ही गीते शांताबाई शेळके यांची आहेत आणि सहगायिका आहेत कुंदा बोकिल. ‘हा मंद मंद वारा ही धुंद रातराणी, आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी’ आणि ‘जे सत्य मानले मी आभास तो ठरावा, दोघांतला कसा हा साहू अता दुरवा’. पूर्वी कधीतरी आकाशवाणीवर ऐकलेली ही गाणी. आज इतक्या वर्षांनी देखील त्यांचे शब्द नजरेसमोर आले तर स्वर मनात रुंजी घालू लागतात.

असा हा ‘जित्या गळ्याचा माणूस’. कविवर्य मंगेश पाडगांवकर उगीच त्याला गर्दीत आणि कोलाहलात शोधत होते. तो खरं तर त्यांना केव्हाच सापडला होता.. तो त्यांचीच गाणी गात गेली कित्येक वर्षे रसिकरंजन करतो आहे.

{ कोलाहलात सार्‍या माणूस शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी
..
काळ्या उभ्या तिजोऱ्या गाणे खरीदणाऱ्या
येथे जित्या गळ्याचा माणूस शोधतो मी
..
-मंगेश पाडगांवकर
}

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

'यमक'श्री गदिमा


"आनंद काव्य माझे, त्याच्या अनंत ओळी" असं सार्थ वर्णन गदिमांनी आपल्या काव्यरचनांचे केले आहे. 'आठवणीतली गाणी' या माझ्या संकेतस्थळावर आज मितीस उपलब्द्ध असलेल्या ३१४३ गाण्यांपैकी तब्बल ४३३ गाण्यांमधून हे आनंद काव्य स्‍त्रवत आहे- यावरून गदिमा-गीते आपल्या काव्यजाणिवेचा केवढा अवकाश व्यापतात हे ठळकपणे समोर येतं.

या 'अनंत ओळीं'चं रसग्रहण आत्तापर्यंत असंख्य वेळा झालं आहे आणि होत रहावं. प्रत्येक विश्‍लेषण एक वेगळा प्रकाशझोत या रचनांवर टाकतं आणि मूळ काव्य या विविधरंगी झोतांमध्ये अधिकच झळाळतं. गंगाधर महाम्‍बरे या व्यासंगी कवीने खूप अभ्यासपूर्ण आणि सखोल असा गदिमांच्या काव्यप्रतिभेचा आस्वाद रसिकांना पुस्तक स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. हे सगळं वाचल्यामुळे असेल कदाचित, नव्हे म्हणूनच, गदिमांची एखादी वेगळी खुबी नजरेस आली की त्यात बुडी मारण्याचा मोह अनावर होतो.

आज मी मला भावलेली गदिमांची 'यमक' हाताळणी, यावर काही म्हणावं असा विचार करते आहे. बघू कसं जमतंय ते..

व्याकरणाच्या दृष्टीने विचार केला तर 'यमक' हा एक शब्दालंकार आहे.. कवितेचं सौंदर्य वाढवण्याचं ते एक तंत्र आहे. पण गदिमा आपल्या प्रतिभेचा त्यावर मंत्र टाकतात. मग ती नुसती 'र' ला 'र' जोडण्याची यांत्रिकता किंवा अट्टहास राहत नाही तर ती अगदी सहज आणि ओघाने येणारी शब्दरचना होते. कधीकधी त्यात झालेली जुळणी आश्चर्याचा आणि आनंदाचा अनुभव एकाच वेळेस देते.
गीतकाराच्या अशा ज्या काही मर्यादा असतात.... कथेतील कुठला प्रसंग आहे, गाणारी व्यक्तीरेखा कशी आहे, या गीताने कथेच्या प्रवाहाचे कुठले वळण अपेक्षित आहे... गदिमांची सर्जशीलता या बंधनांना पार ओलांडून जाते.

याची उदाहरणे शोधताना 'गीतरामायण' जाणीवपूर्वक बाजूला ठेवू. कारण तो एक वेगळा विषय आहे. ('गीतरामायण- गदिमा आणि शेक्‍सपिअर' असं पूर्वी एकदा मी लिहिलं आहे.)
तसंच अगदी नेहमीचं 'त्या तिथे, पलीकडे... झाड एक वाकडे' किंवा 'घननिळा लडिवाळा' सारखं अनेक वेळा उद्‌धृत झालेलं पण बाजूला ठेवूया.
चला, काहीतरी वेगळं, त्यांच्या नेहमीच्या शे-सव्वाशे गाण्यांच्या पलीकडचं शोधू...

गदिमांनी यमक साधण्यासाठी केलेल्या शब्दांचा वापर आणि / किंवा ते ज्या पद्धतीने यमकावर land होतात (जसं पट्टीच्या गायकाने आधी लयीला हूल द्यावी मग नेमक्या समेवर उतरावं, तसं), दोन्हीही खूपच आकर्षक आहे. दोन्हीही बघू...

'प्रीत शिकवा मला' या चित्रपटात एक गाणं आहे. ती जी कुणी हे गाते तिला तिचं सगळं.. दिसणं, वागणं.. सगळंच, तिच्या प्रियकराच्या मनासरखं करायचं आहे. या एकाच विचाराने तिचं विश्व व्यापलं आहे. मग गदिमा लिहितात,
आवडसी तू, एक ध्यास तुझा घेतला
आवडतो तुजसी तसा वेष गडे घातला..
.. या गीतात 'ओतला' हा तसा साधा शब्द पण कसा येतो ते पहा..
आवडीच्या मुशीत तुझ्या मी स्वभाव ओतला..

'बैल' आणि 'सैल' हा तसा सरधोपट यमक पण जेव्हा तो 'सांगत्ये ऐका'तल्या 'झाली भली पहाट'मध्ये असा समोर येतो, तेव्हा केवळ दोन ओळीत गदिमांचा काव्यहंस आपल्यासमोर 'नादचित्र' रेखाटतो -
अंगे झिंझाडून सैल
उभे ठाकले रे बैल

याच चित्रपटात एक लावणी आहे. त्यात लावणीची अदा करणारीने साडी नेसली नाही तर अंगरखा घातला आहे. नेहमी साडी नेसणार्‍या स्‍त्रीने जर असा वेगळा वेष परिधान केला तर ती कशी अस्वस्थ होत याचे बारीक निरिक्षण करत गदिमा म्हणतात-
नसत्या पदराकडे धावतो हात गडे सारखा
दिलवरा दिल माझे ओळखा !

मापणे (मोजणे) या शब्दात जरा बदल करत, त्यावर कोकणी भाषेचे किंचित संस्कार गदिमा करतात आणि 'तिच्या घोवाला कोकण दाखव’ताना म्हणतात-
गोमू माहेरला जाते हो नाखवा
.. उंची माडांची जवळून मापवा

'झाली ग बरसात, फुलांची..' या गाण्यातली 'ती' खूप सुखात - आनंदात आहे. त्यामुळे तिला सर्वत्र सुगंधाने भारलेला वाटतो आहे. याचं वर्णन करताना ती म्हणते-
तळहातीच्या भाकित रेखा
जित्या जुईच्या झाल्या शाखा

वाम आणि डावा- असे दोन समानार्थी शब्द वापरत आणि ’व’चा अनुप्रास साधत, बन्सीधर कृष्णाचं चित्र गदिमा एखाद्या सिद्धहस्त चित्रकाराच्या शैलीत दोन स्ट्रोक्‍स मध्ये चितारतात -
वाम बाहुवर कपोल डावा
अधरि आडवा धरितो पावा
.. गोकुळीचा राजा माझा

होडीत एक गर्भार नार बसली आहे. त्यामुळे होडी कशी चालव हे नावाड्याला सांगताना तिच्या मैत्रिणी म्हणतात-
बेतात राहू दे नावेचा वेग
चालु दे नाव जसा श्रावण मेघ
.. निळा समिंदर निळीच नौका..

गदिमांनी गेयतेच्या परिमाणात न बसणार्‍या अनेक शब्दांचा वापर त्यांच्या गाण्यांमध्ये केला आहे. जसे,
सोलीव, सचिव, शाकारणी, हल्लरू, ओंडका, पानकळ्याची, कंगवा, अवेदा, आपसुख, पलटण, तोंडात बोटे घालणे, कोल्हाळ, अकिंचन, अप्पलपोट्या, पाणंद, वासक.. आणि चक्क यातील काही यमकाचे कार्य साधतात.

सचिव म्हणजे सेक्रेटरी. एका अतिशय निरागस युगुलगीतात -
डोळ्यापुढे दिसे गे मज चित्र ते सजीव
माझ्या घरातली तू गृहिणी, सखी, सचिव
.. याच गाण्यात 'सोलीव' शब्द पण फार चपखल बसला आहे.

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
.. केसावरती लहर उठविली फिरवुन हळू कंगवा
इथे 'कंगवा' शब्द आपल्या भोवतीचा किळसवाणा गुंतवळा झटकतो आणि गोड वाटायला लागतो. सुलोचनाबाई चव्हाण गाताना त्यात आणखी माधुर्य आणतात.

ती एक खूप छोटी मुलगी आहे. परीकथांचं तिचं विश्व आहे. तिच्या दादाची बायको कशी असावी, असं ती स्वप्‍नरंजन करते आहे. वहिनी स्वप्‍नातलीच असल्याने तिचं सगळंच दैवी आहे. वहिनी गोरीपान आहे, तिची गाडी हरणांची आहे, तिची अंधारासारखी काळीभोर साडी आहे.. त्या साडीवर चांदण्या चिकटवल्या आहेत आणि त्या साडीचा पदर.. चमचमणार्‍या बिजलीसारखा झळाळता...
चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण..
दादा, मला एक वहिनी आण
गोरी गोरीपान, फुलासारखी छान..
इथे 'वाण' हा शब्द 'वर्ण' या अर्थाने येतो. (पी. सावळारामांनी पण तो या अर्थाने एका गाण्यात वापरला आहे. 'गव्हाळी वाणाचा तो हसरा मुखडा... प्रीत माझी पाण्याला जाते..')

पु. ल. देशपांडेंनी एकदा म्हंटलं होतं-
"अणिमा, महिमा, गरिमा.... सारखीच 'गदिमा' ही एक सिद्धी आहे. तिला परकाया प्रवेश करता येतो."
त्यामुळेच गदिमांना नेमक्या शब्दांत नेमके भाव व्यक्त करता येत असावेत.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Territorial war


पुण्यातलं आमचं घर नदीच्याकाठी आहे.
नदी, पलीकडचा घाट.. अगदी थेट ‘पैल घंटा घुमे राउळी’ सारखा.. छान मोकळी जागा.... आणि त्यामुळे भरपूर पक्षी.
पाच वर्षांपूर्वी तिथे राहायला गेल्यावरच्या पहिल्या पावसाळ्यात खिडकीच्या गजांवर ओले पक्षी येऊन बसले आणि मी घरातल्या प्रत्येकाला बोलावून बालकवी वर्णन करतात ते ‘फडफड करुनी भिजले अपुले पंख पांखरें सांवरिती’ कसं असतं, ते उत्फुल्ल मनाने दाखवलं.

पण थोड्याच दिवसात त्या गजांवर गळलेली पिसं, त्या पक्ष्यांची शी, शू, वळचणीला घरटी, ती बांधण्यासाठी त्यांनी शोधून शोधून आणलेल्या काड्या, जुन्या वायरींचे तुकडे.. मग पिलांची अंडी, त्यातून पिल्लं बाहेर पडताना सुटलेला वास, अंड्याची टरफलं…. असं सुरू झालं आणि माझ्या पक्षीप्रेमाचा पार धुव्वा उडाला.
ती ‘बगळ्यांची माळ’ अंबरातच उडत आहे आणि ते ‘द्विजगण अवघे वृक्षीं’च आहेत, तोपर्यंतच ठीक. आता पारव्याचं घुमणं माझ्या छातीत एक वेगळीच धडधड वाढवतं.. आल्या का या कबुतरीणबाई बाळंतपणाला !!
उलटपक्षी माझं असं स्पष्ट मत झालं आहे- कुठल्याही कवीला, एका कबुतरणीचं एक जरी बाळंतपण निस्तरायची वेळ आली तर ते ‘कबूतर जा जा..’ फार वेगळ्या अर्थाने म्हणतील.

गेल्या माझ्या मुक्कमात मी एका कबुतरीणबाईंशी full on.. territorial war लढले.. त्याची ही कहाणी.

तिची territory कुठली? याचं किंचित वर्णन करायला लागेल. एका गच्चीला POPचं छत घालून त्याखाली एक छानसं जेवणाचं टेबल ठेवलं आहे. POP वर पाणी पडू नये म्हणून त्यावर जाड प्लॅस्टीकचं शीट आहे. POPचं छत आणि plastic-sheet, यात साधारण पाच इंचाची जागा आहे आणि नेमक्या याच जागेत एका कपोत युग्माने गेले दोन-तीन वर्षे मुक्काम ठोकलेला.

आम्ही या घरी काही कायमचे राहात नाही. वर्षाकाठी जेव्हा केव्हा मी इथे येते, तेव्हा बराच वेळ त्यांना आवर घालणं, हा एक मोठा उद्योग असतो. महिनाभरात परत गेले की पुन्हा त्यांचंच राज्य. पण इतक्या कमी उंचीच्या जागेतील त्यांच्या उच्छादाने काही इतर प्रश्‍न निर्माण झाले आणि यावेळेस त्यांना विस्थापित करणे, हा मुद्दा ऐरणीवर आणावा लागला.

एकदा वरती चढून तिथे काय परिस्थिती आहे ते पहावं तरी, म्हणून एक शिडी घेतली. त्यावर चढले. मग एक पाय शिडीवर, एक जवळच्या गजांवर, एका हाताने ड्रेनेजचा पाईप पकडून... असं सगळं करत जेमेतेम नजर पोचेल इतकी उंची गाठली. पाहते तर काय.. चांगली मोठ्ठी झालेली दोन पिल्लं माझ्यापासून आठ इंचांवर. त्यांच्या डोळ्यातले भाव पाहून मी ‘क्राइम पेट्रोल’ मधली मुलं पळवून नेणारी बाई आहे की काय, असं वाटलं. ते मला घाबरले- तितकंच मी त्यांना घाबरून खाली उतरले. आता ती उडून जाईपर्यंत थांबणं आलं.. तीन-चार दिवसांनी ती उडून गेली.
चला.... हीच ती वेळ, हाच तो क्षण.......

आमची कामवाली बाई रेखा म्हणाली, कबूतरं काळ्या रंगाला घाबरतात. तू तिथं एक काळं कापड बांध. मग एक जुनी काळी साडी शोधली.. तिचे तीन चार तुकडे केले.. वेगेवेगळ्या उंचीच्या काठ्यांना ते बांधले आणि निषेधाचं, बंडांचं पहिलं काळं निशाण रोवलं.

माझं असं म्हणणं होतं... प्लॅस्टीक शीटवरचं सगळं आभाळ तिचं- कबुतरणीचं..... आणि पीओपी छताखालचं घर माझं...
मधली पाच इंचांची जागा no man’s land तर होतीच, तशीच ती no bird’s land ही असायला हवी. पण कबुतरीणबाईंना ते साफ अमान्य होतं. ’कसेल त्याची जमीन, राहिल त्याचं घर’ हा कुळ-कायदा माझ्यापुढे फडकवत, तिथं दोन वर्षे मुक्काम असल्याचा हक्क सांगितला. मी रोवलेल्या निषेधाच्या निषाणांची पायमल्ली केली. आपल्या पंखांनी सगळे झेंडे उधळले व जागेवरचा ताबा सोडायला स्पष्ट नकार दिला.

पुढील घरगुती उपाय म्हणून तिथे डांबराच्या गोळ्या टाकल्या, हीट मारलं, जे म्हणून काही उग्र वासाचं सापडलं त्यांचा वर चढून मारा केला. पण छे ! ह्या बयेचं माझ्या डोक्यावर नाचणं, शब्दश: आणि लाक्षणिक, दोन्ही अर्थाने थांबेचना मेलं. तिच्या पावलांचा आवाज ऐकला रे ऐकला की मी हाताशी ठेवलेली काठी घेऊन पळायचं आणि खालून टकटक करून तिला हाकलायचं..
पण कृतनिश्वयी सौ. कबूतर, श्रीमद्‌ भगवद्‌ गीतेच्या ३र्‍या अध्यायाची- कर्मयोगाची- जन्मल्यापासून रोज पारायणे करत असल्यासारख्या ध्येय आणि कर्म दोन्ही सोडायला तयार नव्हत्या.
नानाच्या (पाटेकर) मते ‘एक मच्छर...’ तुमची वाट लावतो इथे तर हे एक अख्खं कबूतर होतं.

हे काही खरं नाही. आता आपण Google नावाच्या Oracle कडे हा प्रश्‍न घेऊन जावा. त्याच्याकडे सर्व उत्तरं असतात..
त्याने दोन उपाय सुचवले. एक म्हणजे फळीला खिळे ठोकायचे आणि ती उलटी करून कबूतरं बसतात त्या ठिकाणी ठेवायची. छे छे !! हे असलं अघोरी काम होणं नाय... दुसरं म्हणजे CDs उलट्या ठेवायच्या. चमकणारा भाग वरच्या दिशेने. त्यात कबुतरांना त्यांचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं की ते घाबरतात... इति गूगल.

भराभरा घरात सापडलेल्या जुन्या CDs घेतल्या. त्यांची वेगवेगळे कोन करून रचना केली. त्या पडू नये म्हणून फेविकॉलचा ठिपका देऊन चिकटवल्या. वरची वळचणीची जागा आणि त्या भोवतीची भाग, महाराणी पद्मिनीच्या आरसे महालाला लाजवेल असा करून मी आणि रेखा वाट पाहू लागलो. एक दिवस शांतता. दुसर्‍या दिवशी सकाळपासून ही शंभी महाराणीच्याच तोर्‍यात त्या विवक्षित जागेत प्रवेश करती झाली.

मग मात्र मी अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष महामहीम श्री. ट्रंप यांच्याकडून प्रेरणा घेतली. एका POPचं काम करणार्‍या माणसाला बोलावलं. त्याने काही तास काम करून एक भिंत बांधून अनधिकृत घुसखोरीचा मार्ग कायमचा बंद केला.
कबुतरीणबाईंनी दोन दिवस माझ्याकडे खूप रागाने बघितलं. मान गरागरा फिरवली. वेगवेगळे भीतीदायक आवाज काढले.. त्या भिंतीवर चार-पाच धडकाही देऊन पाहिल्या.
एकीकडे मी मात्र दुबईला परतण्याच्या तयारीला लागले.

विमानतळाकडे निघताना शेवटचं, सगळं नीट बंद केलंय नं, असं तपासत फिरत होते तो काय.. दुसर्‍या गच्चीतल्या inverter वर बसून ही गंगी शांतपणे सर्वेक्षण करत होती.

टॅक्सीत बसल्याबसल्या कबुतरीणबाईंऐवजी मीच श्री. ट्रंप यांना tweet केलं.... "भिंत बांधून अनधिकृत घुसखोरी थांबवता येत नाही. पुरावा आहे."
... आणि पुढच्यावेळचं theatre of war काय असेल याचा विचार करू लागले.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कान तुटका


तसे घरात पाणी पिण्यासाठी काचेचे अनेक ग्लास होते. एकसारखे, संचातले. पण त्यामुळे फार गोंधळ उडायचा. कुणाचा कुठला? हा प्रश्न सतत चर्चेत राहायचा. त्यावर एक साधा-सरळ उपाय म्हणजे ग्लास विसळून ठेवणे. त्याने एका नवीन वादाला तोंड फुटायचे. विसळण्याची जबाबदारी कुणाची? खरं तर पाणी पिऊन झाल्यावर प्रत्येकाने विसळून ठेवायला हवा, पण..... तसे झाले नसेल तर ? ..... confusion, अविश्वास....
साधारण चार साडेचार वर्षांपूर्वी यावर मी एक उपाय सुचवला. घरातील प्रत्येकाने आपल्या व्यक्तीमत्त्वाला साजेसे असे दर डोई तीन mugs आणायचे. त्यांचा वापर पाणी-चहा-कॉफी अशा सामान्य, दैनंदिन आणि वैयक्तिक पेयपानासाठी करायचा. अर्थातच त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी ज्याच्या-त्याच्या डोक्यावर.
तसे मी जाऊन सगळ्यांसाठी विकत आणू शकले असते... "ह्या रंगाचे हे तुझे तीन", वगैरे. पण आपल्या 'व्यक्तिमत्त्वाला साजेसे' असा एक catch टाकून 'mugs' हा प्रश्न मी अस्मितेचा आणि तत्त्वाचा केला आणि गुपचूप त्या जबाबदारीतून सुटका मिळवली.

नवर्‍याने एका दिवसात एकसारखे आणि संपूर्णत: काळ्या रंगाचे mugs आणले आणि 'Black is beautiful, simple.' असं म्हणत फार मूलभूत निवड केल्याचा आव आणला.
लेकाने बाजारात mugs या प्रकारात जितके म्हणून चित्र-विचित्र रंग-आकार शोधता येतील तेवढे शोधले, त्यासाठी तब्बल तीन आठवडे घेतले आणि तीन भन्नाट mugs माझ्यासमोर आणून ठेवले.
मी मात्र फार विचार केला नाही. कारण 'व्यक्तीमत्व' वगैरे gimmick, हे निव्वळ माझ्या कमी काम करण्याच्या सोयीचे, म्हणून होते. मध्यम मार्ग स्वीकारत त्या दोघांच्याही निवडकक्षेत नसतील असे, पण जरा बरे वाटणारे, जवळच्याच सुपर मार्केटमधून उचलले.

आणल्याच्या तीसर्‍याच दिवशी माझ्या एका mugला छोटासा अपघात झाला आणि त्याचा कान तुटला. "टाकून दे ग, कशाला ठेवतेस ?" दोघांचं टुमणं. इतक्या लगेच, केवळ कान तुटला म्हणून, त्याला कचर्‍याची टोपली दाखवणे मला संपूर्णत: अमान्य होते. कारण बाकी त्यावर ओरखडासुद्धा नव्हता.

जशी मी त्याला वापरत राहिले तसे त्याचे 'कान तुटका' हे संबोधन प्रचलित होत गेले. मी ते फारसे मनावर घेतले नाही, त्याने घेण्याचा प्रश्नच नव्हता.
असे काही महिने गेले. मग वाटले, त्याच्या तुटक्या कानाचे कंगोरे फारच बेढब दिसतात. मग एक छानशी कानस आणली. stone grinding करतात तसे पाणी वापरून, कानसने घासतघासत ते कंगोरे नाहीसे केले.
या घटनेला चारहून अधिक वर्षे झाली. त्याच्याबरोबर आणलेल्या आठ जणांनी एकेक करून आमची साथ सोडली. 'कान तुटका' मात्र आहे तस्साच आहे.

दरम्यान 'तुटका कान' हे त्याचे व्यंग न राहता ती त्याची identity झाली आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

विलक्षण ’पु.ल. क्षण' : काळजी


सुरभी नीमाची सून आणि नीमा जुनी मैत्रीण, असं सांगितलं तर वाटतं..... तितका काही हा 'बादरायणी' संबंध नव्हता.
त्यामुळे नवीन लग्‍न करून सुरभी दुबईला रहायला आली, तेव्हापासून ती, मला माझीच जबाबदारी वाटत होती. तसं नीमाला मी म्हंटलं देखील.. "नको ग काळजी करूस. तू आणि मी काही वेगळ्या नाही. मी बघते त्या दोघांचं अडलं-नडलं."

आणि असे अडल्या-नडल्याचे प्रसंग आलेही चिक्कार. नवीन संसार, नवा देश, नव्या नोकर्‍या...
नवी नवरी ते पहिल्यांदा येणारे आईपण असा सुरभीचा दोन वर्षांचा प्रवास मी नुसता काठावर बसून नाही बघितला. अनेकवेळा धावून गेले. प्रसंगानुरूप कधी घरीही घेऊन आले. कधी एखादी रेसिपी, इतकं साधं तर कधी पाच महिन्यांची गरोदर असताना गेलेला तोल, इतकं कठीण. काही महिन्यांपूर्वी सुरभी तिच्या बाळंतपणासाठी माहेरी गेली.

जानेवारीत भारतात गेले तेव्हा सुरभीला-बाळाला भेटावसं वाटलं म्हणून नीमाकडून तिच्या आईचा फोन नंबर घेतला, दिवस-वेळ ठरवली...
सुरभीच्या आईने दार उघडले. त्यांच्या छोटेखानी, दुमजली बंगल्याच्या वरच्या मजल्यावर ती दोघं आहेत आणि लवकरच खाली येतील, बसा.. असं म्हणाल्या.

दरम्यान आम्ही बेल वाजवल्यापासून दोन्ही मजल्यांच्या मधल्या जिन्यात बांधलेलं त्यांचं ’पाळीव’ श्वान, त्याच्या असलेल्या किंवा नसलेल्या बेंबीच्या देठापासून ओरडत होतं... म्हणून त्या बाईंनी aplomb bearing घेऊन ’मॅक्स’ला शांत करायला सुरुवात केली. तेवढ्यात फोन वाजला.

त्या प्रचंड गोंधळात फोनवरचं, एका बाजूचं जे संभाषण ऐकू आलं ते असं.. "हो आलेत... नाही, तो ठीक आहे. खायला दिलंय आधीच... नको.. बाहेर नको.. बाहेर ऊन आहे." वगैरे.

फोन बंद झाल्यावर त्या वळल्या आणि म्हणाल्या, "ह्यांचा ऑफिसमधून फोन होता. तुम्ही येणार माहित होतं नं, म्हणून चौकशी करत होते.... तशी यांना मॅक्सची खूपच काळजी असते.............!!!"

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

’पेट’ स्‍नो


समोरच्या फ्लॅटमध्ये जेमिमा राहते. गेली काही दिवस ती, तिच्या गावी इंग्लंडला सुट्टीसाठी गेली होती. त्यामुळे तिचा अडीच वर्षांचा मुलगा जेम्स आणि त्याने पाळलेली कुत्र्याची दोन पिल्लं, यांचा दंगा नव्हता आणि ती शांतता आम्हाला आवडत नव्हती.
काल रात्रीपासून परत कल्ला सुरू झालेला. आली असावी. तिच्याशी थोडं बोलावं म्हणून दार उघडलं.

"कशी गेली सुट्टी ?"
"मस्त. छान बर्फ होता ह्यावेळेस. आणि जेम्सने पहिल्यांदाच बर्फ बघितला."
"मग ? आवडला का त्याला.. white winter ?"
"खूपच. पण त्यामुळे आमच्यावर एक प्रसंग ओढवलेला.
जेम्सला नं बर्फ ...... 'pet' म्हणून पाळायचा होता."

"अरे बापरे! तू कसं सांगितलंस त्याला.... हे शक्य नाही म्हणून."

"नाही नाही. मी तसं का करू?
उलट तो आणि मी, आम्ही दोघं रोज बाहेर जायचो. थोडा बर्फ गोळा करून आणायचो आणि घरात वेगवेगळ्या जागी ठेवायचो."

माझी उत्सुकता शिगेला.
"कधी त्याच्यासाठी एखादी बास्केट तयार करून तिच्यात किंवा टॉवेलची गादी करून त्यावर....
पण कुठेही ठेवलं तरी बर्फच तो, वितळून जायचा.
मग जेम्सला कळलं. बर्फाला घरात आणलं की त्याला खूप रडू येतं.
इतकं.. की तो संपून जातो.
सात-आठ दिवसांनी हा प्रकार बंद झाला.

आता जेम्सला स्वत:ला कधीही रडू आलं की एक-दोन मिनिटातच सावरतो आणि म्हणतो,
I won't cry so much. Otherwise, I will be over too."

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें


संत तुकारामांचा अभंग आहे, ’वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें’

अलीकडे पर्यावरण हा विषय निघाला की या ओळीचा वापर हमखास होतो.
रस्त्याच्या कडेने पाट्या असतात, ’झाडे लावा झाडे वाचवा’ आणि लगेच ’वृक्षवल्ली आम्हां ..’

पण या रचनेचा विषय ’पर्यावरण’ हा नाही.

या अभंगाचा गाभा काही वेगळाच आहे .. जो त्याच्या शेवटच्या दोन ओळींमधे व्यक्त होतो.
त्या अशा आहेत .............

तुका म्हणे होय, मनासी संवाद
आपुलाचि वाद आपणांसी

तुकोबा जेंव्हा विजनवासात .. एकांतात असतात .. तेंव्हा काय होतं ?

सभोवतीची झाडं-वेली-प्राणीमात्र त्यांना सगे-सोयरे वाटायला लागतात. आकाश डोईचे छप्पर होते आणि पृथ्वी बसायचे आसन.. जाडीभरडी वस्त्रे आणि एक कमंडलु एवढेच काय ते, देहाचे म्हणून जे उपचार त्यासाठी पुरेसे होते. अशा वातावरणात कुठलेही अमंगळ भाव तुकोबांच्या मनात येत नाहीत.....

सगळ्यात महत्वाचे म्हणजे या minimalistic वातावरणात तुकोबा म्हणतात, माझा.. माझ्याशी उहापोह चालू होतो.

वाद-संवाद जेव्हां दुसर्‍याशी होतो तेंव्हा त्यात चढाओढ, ईर्ष्या येते ... पण इथे मंडनही आपलंच आणि खंडनही आपलंच.

आपुलाचि वाद आपणांसी ... म्हणजे, स्वत:शी भांडण उभे करणे नव्हे ......
तर एक विषय घेतला की त्याची सर्वांगीण चर्चा .. आपणच आपल्याशी करायची.

तुका म्हणे होय...... मनासी संवाद !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

झिणिझिणि वाजे बीन


झिणिझिणि वाजे बीन
सख्या रे, अनुदिन चीज नवीन

बा. भ. बोरकरांची काय सुंदर कल्पना आहे पहा.
कविता संपूर्णत: अध्यात्मिक वळणाने जाते.
ते म्हणतात ..

हे जे माझे, अव्यंग शरीर-मन आहे, ते बीन म्हणजे.. एखाद्या पुंगी-वाद्यासारखे आहे.
कवितेत ते या शब्दांत येतं .........
' सौभाग्ये या सुरांत तारा '

आणि त्यातून हा जो प्राणवायू आत-बाहेर करतोय त्यामुळे, हरघडी.. हरक्षणी एक वेगळीच सुरावट, अनोखी लयकारी बाहेर पडते.
ती कधी शांत-प्रसन्न मंत्रघोषासारखी असते .. तर कधी उगीच वायफळ .. अर्थहीन तराण्यासारखी .. तर कधी फारच कठीण .. जीवाचा लचका तोडणार्‍या अवघड तानेसारखी.

आणि हे वाजवणारा ..
या शरीररूपी वाद्यातून .... प्राणवायू फुंकून .... ही सुरावट काढणारा ... आहे तरी कोण ? ......
अर्थात ... साक्षात परमेश्वर.......
तो तर काय .. अलख निरंजन...... सहजपणात प्रवीण .....

जसा पारा हातात पकडायचा प्रयत्‍न केला तरी हाती लागत नाही.. तसा ह्या शरीररूपी वाद्याच्या तारा छेडणारा परमेश्वर आपल्या हाती येत नाही.
त्याचे अस्तित्व तर जाणवते... हे आपल्याकडून कुणीतरी सर्व करून घेत आहे, याची जाणीवही असते... पण ’तो’ मात्र आकलनाच्या पलीकडेच रहातो.

सख्या रे, झिणिझिणि वाजे बीन ..

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कवी सुधीर


कवी सुधीर मोघे यांच्यावरचे हे माझे खरं तर दुसरे लिखाण. या आधीचे आणि हे, दोन्हीत एक समान सूत्र आहे आणि काही असमान धागे.
समान असे की या दोन्हीत त्यांची 'जीवनी' अशी नाही. किती पुस्तके लिहिली? कोणते पुरस्कार मिळाले? यात ते अडकलेलं नाही. पण,
पहिलं त्यांच्या निधनाच्या दुसर्‍याच दिवशी लिहिलेलं. त्यामुळे उत्‍स्‍फूर्त आणि काहिसं अचानक आलेल्या पोरकेपणाने बावरून गेल्यासारखं. तरी त्यांना वाहिलेली ती आदरांजली असल्याने त्याचे महत्त्व वेगळे.
दुसरे आजचे.. त्यांच्या निधनानंतर सहा महिन्यांनी लिहिलेलं. भावनेच्या पगड्याच्या थोडं बाहेर येत.

त्यांच्या कविता-गाण्यांचे अवलोकन करण्याची किंवा त्यांची साहित्यिक मीमांसा करण्याची माझी योग्यता नाही. 'आठवणीतली गाणी' या माझ्या उपक्रमामुळे त्यांच्या गीतलेखनात दिसलेले सुधीरजी आणि आमच्या सात-आठ वर्षांच्या ओळखीतून दिसलेले काव्याबाहेरचे सुधीरजी.. यांच्याशी झालेल्या चर्चांतून माझे काव्यानुभव समृद्ध झाले आणि मराठी भाषेच्या ज्ञानाची कक्षा रुंदावत गेली.

अलीकडचे प्रसिद्ध कवी वैभव जोशी त्यांच्या एका कवितेत म्हणतात,
'रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते.. '

पण जर कुणाला अशी 'एखादी'च नाही, तर अशा अनेक 'कविता पानोपानी' सुचल्या असतील तर.. त्यांना काय म्हणावे? कविवर्य, कविश्रेष्ठ? आणि त्याही पुढे जाऊन, ते जर फक्त शब्दचित्रेच नाही तर रंगचित्रे, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय सादरीकरण, पटकथालेखन.. असंही बरंच काही करत असतील तर?

सुधीर मोघे यांना मात्र त्यांची 'कवी सुधीर' अशी सुटसुटीत ओळख करून दिलेली अधिक आवडायची. 'Poet Sudheer' अशी झोकदार इंग्रजी सही ते करायचे. कारण कवितेव्यतिरिक्‍त इतर कुठल्याही माध्यामातून व्यक्त होणं, हे त्यांच्या 'कवी' असण्याशी निगडीत आहे, असं त्यांना वाटायचं. त्यांच्याच शब्दांत सागायचं तर, "माझ्या प्रत्येक असण्याला माझ्या कवी / poet असण्याचा base आहे, संदर्भ आहे." आमच्या चर्चेत हे त्यांचं कवी असणं भरून असायचं.

टेरिकॉटची पॅंट, ढगळसा झब्बा. अशी अनौपचारिक वेषभूषा. 'पद्मा फूड्स' हा अनौपचारिक गप्पांचा तितकाच अनौपचारिक अड्डा. जवळपास पन्‍नास वर्षांची कारर्किर्द. सांगण्यासारखे प्रचंड काही आणि ते सांगतासांगता समोरच्याला जाणून घेण्याची खुबी..

त्यांची कविता शब्दबंबाळ नाही. शैली मिताक्षरी. थोडक्यात आणि मार्मिक. बुद्धीवादी, तर्कनिष्ठ आणि त्याचवेळी तरल. scientific temperची झलक असणारी. परमेश्वराच्या सगूण आणि निर्गूण, दोन्ही रूपांचं एकाच तन्मयतेने वर्णन करणारी..

शब्दांवर प्रेम करताना त्यांच्या आहारी न जाता.. त्यांच्याकडे केवळ माध्यम म्हणून पाहताना, शब्दांविषयी ते म्हंटतात..

शब्दांच्या नकळत येती.. शब्दांच्या ओठी गाणी..
शब्दांच्या नकळत येते.. शब्दांच्या डोळा पाणी..

शब्दांना नसते दु:ख.. शब्दांना सुखही नसते..
ते वाहतात जे ओझे.. ते तुमचे माझे असते..

सुधीरजी एकदा म्हणाले होते, "मुकुंद (फणसळकर) म्हणतो, माझ्या प्रत्येक कवितेत-गाण्यात माझी सही असते. तुला वाटतं तसं?" त्यांचं काव्य-गीत लेखन जवळजवळ मुखोद्गत असल्याने मी लगेचव रुकार दिला. म्हंटलं, "हो. हो. नक्कीच.
'सांज ये गोकुळी' मध्ये .. 'पर्वतांची दिसे दूर रांग .. काजळाची जणू दाट रेघ',
'सूर कुठूनसे आले अवचित' मध्ये .. 'रूप स्वरांचे तरल.. अपार्थिव',
'सांज ये गोकुळी' मध्ये .. 'सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या',
.. या तुमच्या सह्याच तर आहेत."

'मन' या विषयावर सुधीरजींना खरं तर Ph.D. मिळायला हवी होती. एका कवितेत ते म्हणतात .. 'मन मनास उमगत नाही .. आधार कसा शोधावा ! .. चेहरा-मोहरा ह्याचा कुणि कधी पाहिला नाही .. धनि अस्तित्वाचा तरिही ह्याच्याविण दुसरा नाही.' आणि असंही .. 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' याच कवितेत 'मन'च कसं आपल्या भावविश्वावर नियंत्रण ठेवतं हे सांगताना, 'तुझ्यामधे सामावला वारा, काळोख, प्रकाश'. एका ठिकाणी .. 'मनाचिया घावांवरी मनाची फुंकर ..' आणि 'मन' ते 'कविता' असा प्रवास ...

एकांत, लेखणी, कागद- वाया सारे
मन कागदाहुनी निरिच्छ अणि कोरे
गिरविता अहेतुक रेषांचे गुंडाळे
बोटांवर अवचित मन ओठंगुन आले.

सुरेश भट, शांता शेळके, कुसुमाग्रज यांच्यावर 'झी मराठी' या दूरचित्र वाहिनीने केलेल्या 'नक्षत्रांचे देणे' कार्यक्रमांचे लेखन सुधीरजींनी केले आहे. एकदा त्यावर बोलत असताना, समोर बसल्याबसल्या त्यांनी संवादिनी घेतली. ती त्यांच्या खोलीत असायचीच. आणि चक्क सुरेश भटांचं 'रंगुनी रंगात सार्‍या रंग माझात वेगळा' गायला लागले आणि म्हणाले, "देवकी (पंडीत) अंदाजे सतरा वर्षांची असताना मी तिला हे गाणं शिकवलं ते असं. तेव्हा कोवळ्या वयामुळे तिला गीताचा संपूर्ण अर्थ उमगलाच होता, असं म्हणता येणार नाही. ती, मी शिकवलेली चाल या लयीत म्हणायची. आता थोडी ठायमधे असते. पण हा 'तिचा' व्यक्त होण्याचा भाव आहे."

'लय' वरून आठवलं ..

लय एक हुंगिली खोल खोल श्वासात,
ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात,
लहडला वेल... तो पहा निघाला गगनी,
देठांना फुटल्या - कविता पानोपानी

सुधीरजी म्हणायचे, "एकदा कविता लिहिली की तिचे नशिब माझ्या हातात नसते. ती तिच्या मार्गाने जाते .. मी माझ्या .."
एक कवी आपल्या कवितेकडे इतक्या निर्ममपणे तेव्हाच पाहू शकतो जेव्हा कुठल्यातरी पातळीवर कवितालेखन हे त्याच्यासाठी ध्यानसाधनेसारखं असतं.

मी ओंजळ माझी रितीच घेऊन आलो
जाताना- ओंजळ रितीच ठेवून गेलो
ओंजळीत आल्यागेल्या श्रेयांवरती;
पण पुसट.. कोवळे नाव ठेवुनी गेलो.

ह्या नि:शब्दांच्या आड कुजिते कसली?
पानांच्या रेषांतुनी भाकिते कुठली ?
होशील एकटा तू देहाच्या पैल
सोबतीस तेथे कविता फक्त असेल

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

The caucus race


कालच्या Dubai Women's Run ( ‪#‎DHWomensRun‬ ) मध्ये ६२.०५ मिनिटांत १० किलोमीटर्स पळाले. छान वाटलं.
ते नखशिखांत घामात निथळणं.... that sudden rush of energy....
हे ते 'किक' की काय म्हणतात नं.. तसं असतं.

पण गेल्या वेळेपेक्षा तब्बल साडेपाच मिनिटं जास्त लागली. लागू देत.
तो दिवस वेगळा होता. आजचा वेगळा.
अंतिम रेषा पार केली आणि स्वत:लाच सांगून टाकलं... येस्स, मी जिंकले !!
कारण व्यक्तीश: हे माझ्यासाठी हे लांब पल्ल्याचं पळणं, रोजचा दिवस आणि आयुष्यच एकंदरीत, 'कॉकस रेस' सारखं आहे.

पण हा दृष्टिकोन माझा नाही. लेकाने पहिलीत असताना त्याच्याही नकळत शिकवलेला.
शाळेतून घरी आल्यावर त्याने सांगितलं, "उद्या पळण्याची शर्यत आहे."
त्या वयातही पुस्तकांतच नितांत रमणारं माझं हे लेकरू फार काही पळेल अशी अपेक्षा नव्हती. तरी उगीच उत्सुकता म्हणून दुसर्‍या दिवशी विचारलं तर म्हणाला, "मी पहिला आलो."
"कसं शक्य आहे आशय? तुला कोणी सांगितलं?"
"असं कोणी कोणाला सांगत नाही. ॲलिसच्या गोष्टीत नाही का ती 'कॉकस रेस' सगळेच जिंकतात.. तसं आपणच ठरवायचं असतं."

The caucus race.
Alice's Adventures in Wonderland ह्या पुस्तकात Lewis Carroll यांनी एका छोटेखानी परिच्छेदात वर्णन केलेली.

वरवर लहान मुलांसाठी वाटणार्‍या या पुस्तकात, तशा nonsensical वाटणार्‍या अनेक घटना satire पद्धतीने मोठ्यांसाठी एवढं काही सांगून जातात.
ॲलिसच्या अश्रूंच्या तलावात तिच्यासकट अनेक प्राणी बुडून ओले झालेत. कोरडे होण्यासाठी डोडो सगळ्यांना पळण्याची शर्यत सुचवतो. ह्या शर्यतीला जशी सुरुवात नाही तसा शेवटही नाही. ती एका वर्तुळात होते... म्हणजे सगळे एका गोलात फिरतात.. कोणी मधूनच सामील होतं तर कोणी मधूनच सोडूनही जातं. आणि तरी सगळे जिंकलेले असतात.

थोडक्यात,
कोणी कुठुनही निघत नाही आणि तसंच कुठेही पोचत नाही.
या गोलगोल फिरण्याच्या शर्यतीत जन्माला येणारा प्रत्येक जीव कुठेतरी सामील होतो.
एखादा मधूनच, अचानक बाहेर पडतो आणि आपल्या पारलौकिक प्रवासास निघून जातो.
आणि दोन बिंदूंमधील अंतर पळताना तो स्वत:ला विजयी ठरवतो. नव्हे, तो असतोच.
कारण रोजच्यारोज त्याने, त्याच्या स्वत:च्या, अत्यंत व्यक्तीगत, फक्त त्यालाच जिचं संपूर्ण आकलन आहे अशा.. परिस्थितिवर मात करण्याचा प्रयत्‍न केलेला असतो.

कालच्या पळण्यास जास्त वेळ लागल्याचं रत्तीभरही दु:ख न होण्याचं, विजयी समजण्याचं, हेच कारण होतं.
नुकतेच झालेले मानेतील bulging disc चं निदान. त्यामुळे दुखरा उजवा खांदा आणि हात.
माझ्या नेहमीच्या दिनक्रमात कुठलाही बदल होऊ नये यासाठी pain management शिकवणारे माझे अतिशय प्रेमळ मित्र डॉ. सुरेंद्रन आणि समिरा..
साडेपाच मिनिटं काहीच जास्त नाही.

दोन वर्षांच्या पिल्लाला stroller मध्ये घेऊन पळणारी एक आई, Dubai maids services चा group........ अशा आम्ही मिळून सार्‍या अंदाजे ५००० जणी, एका स्वयंस्फूर्तीच्या आणि परिपूर्णतेच्या जाणीवेने सामाधानी होतो.


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

जीना


वसंत बापट...... काल जन्मदिन.
स्वातंत्र्य सैनिक, प्राध्यापक, ’साधना’ साप्ताहिकाचे संपादक, राष्ट्र सेवा दलाच्या पथनाट्यांतून लोककलांची जोपासना करणारे वसंत बापट.

गीतकार बापट.... विषयांचे इंद्रधनुष्य पेलणारे.
‘गगन सदन तेजोमय’ अशी प्रार्थना करणारे बापट.
‘या पाण्याची ओढ भयानक’ हे आत्मघाती मार्गावरचे मनोगत सांगणारे बापट.
‘सदैव सैनिका पुढेच जायचे’ ही स्फूर्ती देणारे बापट.
‘येशिल येशिल राणी, पहाटे पहाटे येशील’ असं अत्यंत लाडिक्पणे विचारणारे बापट.
‘छडी लागे छम छम’ चा बालवयीन खोडकरपणा जपणारे बापट.
‘लाल बत्‍ती हिरवी झाली, आली कोकण गाडी’ हे थेट आगगाडीच्या ठेक्यात लिहिणारे बापट.
‘अजून त्या झुडुपांच्या मागे’…. ‘देह मंदिर चित्‍त मंदिर’ .... ‘या बकुळीच्या झाडाखाली’ ....

आणि कवी वसंत बापट.


जीना....

कळले आता घराघरांतुन
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेवुनी
हळूच जवळी ओढायाला

जिना असावा अरुंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडपड

मूक असाव्या सर्व पायऱ्या
कठडाही सोशीक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा

वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहुनी
चुकचुकणारी पाल असावी

जिना असावा असाच अंधा
कधि न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधि न करावी चहाडखोरी

मी तर म्हणतों- स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पृथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

शाळा


कितीतरी कित्‍ते शाळेत गिरवले असतील.
कितीतरी धडे शिकवले गेले असतील.
कित्‍ते गिरवण्याने अक्षराला वळण लागलं, हे खरं.
काही धडे फक्‍त समजले.. उमजले कधीच नाहीत.
पण ती शाळा होती आणि अभ्यास हा शब्द, 'पाठांतर' या शब्दाला समांतर जात होता.
लेखी, तोंडी परीक्षा करत शाळा संपली.

म्हणजे, फक्त तसं वाटलं.
शाळेतल्या बाईंची जागा अनुभवांनी घेतली आणि शाळा चालूच राहिली.
त्यातील काही धडे आपणहून, आवड म्हणून शिकले.
काही शिकवले गेले, शिकावेच लागले.
काही मात्र कितीवेळा शिकवले गेले तरी डोक्यात शिरतच नाहीत.
जसा २९ चा पाढा.

शाळेनंतरच्या प्रवासात मला वळण लावणार्‍या,
माझी सतत ’शाळा’ घेणार्‍या माझ्या अनुभवांचे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी खास आभार.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS