Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS

दृष्टिकोन

काही लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या कलाकृतींबद्दल माझं ’जरा वेगळं मत आहे’, असं 'politically correct' म्हणू की ’त्या मला फारशा आवडत नाहीत’ इतकं सौम्य म्हणू की ’त्यांच्यामुळे माझी चिडचिड होते’ असं बेधडक म्हणू? - हा मोठा गहन प्रश्न मला पडला आहे. पण याकडे केवळ एक वैयक्तिक दृष्टीकोन म्हणून पहावे.
ज्या दोन गझलांचा मी उल्लेख करणार आहे, त्यांची ख्याती सर्वदूर आहे.

या उर्दू शेराने एका प्रसिद्ध गझलेची सुरुवात होते. गायक हा सरतेशेवटी गाण्याचा चेहरा होत असल्याने ही गझल श्री. जगजीत सींह यांची आहे.
शेर कसा गायला ह्या विषयी नाही तर त्याच्या विषयाशी मी असहमत असल्याने त्याचे रचियता ’इब्न-ए-इंशा’ या शायरचा मला उल्लेख करावा लागेल. त्यांचं नाव सहसा कुणाला माहिती नसावं.
कारण ’कल चौदहवीं की रात थी’ ही गझल जगजीतजींचीच.

कल चौदहवीं की रात थी शब भर रहा चर्चा तेरा ।
कुछ ने कहा ये चाँद है कुछ ने कहा चेहरा तेरा ।

आठ-दहा पुरुषांनी हातात ’साकी’ने भरलेला ’जाम’ घेऊन एका स्‍त्रीच्या शरीर सौंदर्याची चर्चा करत, मयखान्यात रात्र काढावी, हे मला फार भयानक वाटतं. त्या माणसांच्या रिकामटेकडेपणाची हद्द वाटते व त्या कुणा सौंदर्यवतीचे दुर्दैव. अलीकडच्या भाषेत ह्या वागण्याला ’sexist’ आहे असं म्हणतात किंवा हे 'objectification' आहे, असं म्हणतात. त्या कुणा सुंदरीला अशी चर्चा होणे नुसते आवडणारच नाही तर तिला तिचा हा सन्मान वाटेल, हा पुरुषी अहंकार या शेरात आहे. पुढे जाऊन जेव्हा..

हम भी वहीं मौजूद थे, हम से भी सब पूछा किए,
हम हँस दिए, हम चुप रहे....

यानंतर मी पूर्णत: disconnect होते.
मुळातून हे माझे इतके टोकाचे मत असताना, एखाद्या गाण्याच्या मैफलीत माझ्या आजूबाजूस बसलेले स्त्री-पुरुष, ही गझल सादर व्हायला लागली की, "वाह, वाह !" करायला लागतात. मग ही दाद त्या गायकाच्या गाण्याला आहे की या शेरात वर्णन केलेल्या वातावरणाला, हे मला कळत नाही आणि मी तिथून सरळ काढता पाय घेते.

दुसरी आहे ती ’अहमद फ़राज़” या गझलकाराची ’रंजिश ही सही”. मेहदी हसन साहेबांनी तिला अजरामर करून ठेवली आहे. त्यांचं भावपूर्ण सादरीकरण इतकं मनास भिडतं की (मला) गझलेचे शब्द अजिबात आवडत नसताना सुद्धा सूर मनात रुंजी घालत रहातात. दिवसभर पाठलाग करतात.

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ

कुछ तो मिरे पिंदार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रह-ए-दुनिया ही निभाने के लिए आ

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ

इक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिर्या से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझ को रुलाने के लिए आ

अब तक दिल-ए-ख़ुश-फ़हम को तुझ से हैं उम्मीदें
ये आख़िरी शमएँ भी बुझाने के लिए आ

ही पुन: एक स्वकेंद्रित रचना. स्वत:पुढे काहीच नाही. 'मला परत सोडून जाण्यासाठी ये.’, ’माझी समजूत काढायला ये.’, ’समाज-रीत पाळण्यासाठी ये.’, ’लोक काय म्हणतील म्हणून ये.’, ’मला परत एकदा रडवायला ये.’, पण ये....

ही प्रेयसी नुसती नाराज होऊन गेलेली नाही तर ती नाराज होऊन, सोडून गेली आहे. ही break-up situation आहे. त्यामुळे ही गझल फक्त कवितेच्याच मर्यादेत रहावी. प्रत्यक्षात असे मागे लागणे चीड आणू शकते. जिथे स्त्रियांच्या ’नाही’ म्हणण्याचा मान ठेवा, असे शिकवण्याची गरज आहे, तिथे हा हात धुवून मागे लागण्याचा सोहळा फार विरोधाभास निर्माण करतो.

पण या गझलेकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टीकोनापेक्षाही नुकतीच ती एका अशा अर्थाने माझ्यासमोर अचानकपणे आली की मी अक्षरश: स्तब्ध झाले. हातातले काम हातातच राहिले. हा नजरिया फार वेगळा होता. दूरचित्रवाणीवरील ’दोन स्पेशल’ कार्यक्रमात जितेंद्र जोशी मुलाखत घेत होते. समोर शुभांगी गोखले बसल्या होत्या. विषय त्यांचे दिवंगत पती मोहन गोखले यांचा चालला होता. तेव्हा शुभांगीताईंना अश्रू अनावर झाले आणि त्या म्हणाल्या,
"मोहन फार लवकर गेला. मला कधी कधी असं वाटतं की त्याला सांगावं, आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ, रंजिश ही सही ...."


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS