Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS
Showing posts with label सहजच. Show all posts
Showing posts with label सहजच. Show all posts

पृथक्‌

मराठी पाऊल पडते पुढे

('पृथक्‌' या सदराखाली अधूनमधून काही लिहावं असा विचार आहे. अर्थातच एखाद्या मराठी गाण्यावर. पण हा ब्लॉग नसेल. टिप्पणी किंवा विश्लेषण. आजच्या भाषेत याला, गाण्याचं deconstruction असं म्हणता येईल. कदाचित यात काहीच नवीन नसेल, पण एकत्रितपणे मांडलेलं असेल. तळापर्यंत जायचं असल्याने बहुतेक वेळा पुष्टीकरण असेल आणि नसलं तर तुम्हालाच विचारेन.😊🙏)

सुरुवात 'मराठी पाऊल पडते पुढे' या, याच नावाच्या चित्रपटातील शांता शेळके लिखित गाण्याने करते.

'मराठी पाऊल पडते पुढे' या चारच शब्दांतून व्यक्त झालेल्या ओजस्वी भावनेने मराठी मनाचा गेले कैक वर्षे जबरदस्त ताबा घेतला आहे. घरगुती संभाषण ते भव्य-दिव्य सोहळा, अशा कुठल्याही प्रसंगी हे गाणं, या गाण्याचे शब्द सतत वापरले गेल्याने पाठ असतात.
नुकतीच या गाण्यासंबंधी अधिक उत्सुकता निर्माण झाली.

चित्रपटात चित्रित झालेला कडव्यांचा क्रम आणि रेडिओवर ऐकू येणारा क्रम वेगळा आहे, याची नोंद मी आधीच घेतली होती, तरी ते तेवढं महत्त्वाचं नव्हतं. महत्त्वाचं होतं ते हे की याचे सगळेच्या सगळे शब्द शांताबाईंचे नाहीत, हे मला सतत जाणवणं.
शोध घेता जे लक्षात आले ते -

गाण्याची सुरुवात ज्या ओळींनी होते-
खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाचि अनुष्ठीला
भला देखे

या ओळी ’ज्ञानेश्वरी’तून, काही किरकोळ फेरबदल करून आल्या आहेत. श्रीमद्भगवद्गीतेच्या ३र्‍या अध्यायाच्या ३५व्या श्लोकाचं विवेचन करताना ज्ञानेश्वरीत म्हंटले आहे-
अगा स्वधर्मु हा आपुला ।
जरी कां कठिणु जाहला ।
तरी हाचि अनुष्ठिला ।
भला देखैं ॥
ज्ञानेश्वरी (३.२१९) गीता (३.३५)

मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदू ऐसे ॥
हे संत तुकाराम म्हणतात.
तुकाराम गाथा (९८१)

या अभंगात तुकारामबुवा हे मऊपण किती, हे त्यांच्या खास भाषेत सांगताना म्हणतात,
मेले जित असों निजोनियां जागे ।
जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥
भले तरि देऊं गांडीची लंगोटी ।
नाठ्याळा चि गांठीं देऊं माथां ॥

स्वये शस्‍त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई
जय जय रघुवीर समर्थ
यातील शेवटच्या शब्द समूहामुळे, या ओळींचा मी समर्थ रामदासांच्या साहित्यात (असफल) शोध घेतला.
मग अरुणाताई ढेरे आणि धनश्री लेले यांनी सांगितले, या ओळींची रचना समर्थ रामदास यांनी केली असल्याचा सार्वत्रिक समज असला तरी शांताबाईंनी आयत्या वेळी लिहिलेला हा श्लोक आहे. अगदी रामदासांचाच वाटेल इतका सशक्त.
डॉ. माधव खालकर यांनी रामदासी भाषेची वैशिष्ट्ये सांगत, या ओळी रामदास स्वामींच्या कशा नाहीत, हे समजावून सांगितले.
याबद्दल तीनही मान्यवरांचे मन:पूर्वक आभार.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

प्रेरणा

आज लहानपणीची शाळा आठवायचं कारण म्हणजे अर्थातच आजचा शिक्षक दिन.

आमच्या नाशिकच्या शाळेची दगडी इमारत लवकरच १०० वर्षांची होईल. 'गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल' किंवा 'शासकीय कन्या शाळा असं अत्यंत रूक्ष नाव असण्यार्‍या या शाळेने, सांगून होणारे 'शिक्षण' तर दिलेच पण न सांगता होणारे संस्कार जास्त दिले.

पूर्वी एकदा मी शाळेनंतरच्या आयुष्यात, माझी शाळा घेणार्‍या, माझ्या अनुभवांविषयी लिहिलं होतं.
कारण आता 'अभ्यास' या शब्दाचा अर्थ अधिक स्पष्ट आणि नेमका समजायला लागला आहे. 'धडे' पाठ्यपुस्तकांतून निघून जीवनाचे झाले आहेत. 'शिस्त' शब्दाने मनाच्या नियमनाची वाट धरली आहे.
तरी या सगळ्याची पायाभरणी शाळेत सुरू झाली, हे तर नक्कीच.

आमच्या शाळेत प्रार्थनेचा तास घड्याळ लावून एक तासाचा असायचा. अगदी सविस्तर.
मग ४५ मिनिटांचे इतर विषयांचे ८ ते ९ तास.

विषयांच्या तासांनी पुढे जाऊन मूल्यार्जनाची दिशा ठरवली. पण प्रार्थनेच्या तासाने जीवनातल्या मूल्यांची नीव ठेवली.

प्रार्थनेच्या तासाची सुरूवात राष्ट्र्गीत मग लगेचच 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत....' अशी प्रतिज्ञा घेऊन व्हायची. पुढे त्यात बरंच काही होतं.

आमची त्या तासात दर शनिवारी गायच्या समरगीतांची चांगली शंभर पानी वही होती. समूहस्वरात ही पदं त्या बालवयात म्हंटल्याने येणारी राष्ट्रभावना फार खोलवर रुजली. 'बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते..', 'भास्वर तुज सम भास्वर..',... सारखी अनेक अनवट समरगीतं, प्रेरणागीतं अजूनही तोंडपाठ आहेत. यातली काही आम्हाला शिकवायला तर स्वत: वसंत देसाई आले होते. याच पदांनी 'आठवणीतली गाणी'चा स्फूर्तीगीतांचा विभाग समृद्ध केला.

साने गुरुजींची 'भारतीय संस्कृती' याच तासात भेटली. गीतेचा बारावा आणि पंधरावा अध्याय संपूर्ण शाळेने एकत्र म्हणताना गुरुकुल संस्कृतीतील मंत्र पठणाचा अनुभव घेतला. हे किंवा यासरखे काही ना काही प्रत्येकाच्याच शाळेत असते.

पण आमच्या शाळेत प्रार्थनेच्या तासाला एक अशी गोष्ट करण्यात यायची की जिच्या वेगळेपणाची आणि असामान्य असण्याची जाणीव तेव्हाही होती आणि आजही आहे.

पद्धत अशी होती की प्रार्थनास्थळास जाण्यासाठी वर्गातून निघताना जेव्हा एका रांगेत आम्ही सगळ्या मुली उभ्या राहायचो, तेव्हा आम्हाला प्रत्येकीला विचारण्यात यायचं की, तू डबा घेऊन आली आहेस का?
कधी कुणी डबा आणायचं विसरतं, किंवा डबा घेऊन न येऊ शकण्याचं दुसरं कुठलंही कारण असू शकेल..
हे विचारण्याची जबाबदारी रोज पटसंख्येप्रमाणे फिरती असायची. मग त्या मुलीने वर्गातल्या फळ्यावर उजव्या कोपर्‍यात लिहून ठेवायचे- वर्गाच्या पटावर किती, त्यापैकी आज हजर किती आणि त्यातील किती जणींनी डबा आणलेला नाही.

हे अशासाठी की, सगळ्या वर्गाच्या हे दिवसभर लक्षात रहावं, आज आपल्या किती वर्गमैत्रिणी उपाशी राहाण्याची शक्यता आहे.
जेवणाच्या सुट्टीला सगळा वर्ग मोठ्ठा गोल करून एकत्र जेवायला बसायचा. शाळेला तीन भली मोठ्ठी पटांगणे असल्याने ते शक्य होतं. त्यावेळेस सकाळची ती मुलगी, जितक्या मुलींकडे डबा नाही तितक्या ताटल्या घेऊन वर्गाच्या गोलात फिरणार. प्रत्येक मुलीने त्यात आपल्या डब्यातल्या फक्त एक घास, प्रत्येक थाळीत ठेवायचा. या नियमामुळे डबा आणलेल्या मुलींना फक्त दोन-तीन घास कमी मिळायचे पण न आणलेल्या मुलींसाठी ते पन्‍नास-साठ घास पोटभर असायचे.

'एक तीळ सात जणांनी वाटून खावा.' हे फळ्यावर लिहिण्याचं केवळ एक सुभाषित झालं.
पण (शब्दश:) वाटून खाण्याची प्रथा, हे संस्कार झाले.
हे संस्कार माझ्यासाठी आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर दिशादर्शक ठरले.
'आठवणीतली गाणी'ची काही अत्यंत मोजकी प्रेरणास्थाने आहेत त्यात आमच्या शाळेचे स्थान फार वरचे आहे.
शाळेतील सर्व शिक्षकांना आजच्या शिक्षकदिनी आदरपूर्वक वंदन.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

निमित्त आणि नेम


जरी निमित्त 'आठवणीतल्या गाणी'वर नुकत्याच समाविष्ट केलेल्या ३२ गाण्याचं आहे...
तरी असे विचार आणि असा आचार माझ्यासाठी नित्यनेमाचा..........

(संदर्भ- आठवणीतली गाणी / नवीन भर / १३ डिसें. २०१८)

• विदुषी प्रभाताई अत्रे यांनी संगीत दिलेले आणि गायलेले 'दारी उभी अशी मी..' हे गझलेच्या अंगाने जाणारे पद आहे. तब्बल १० मिनिटांची एक दर्दभरी शिकायत प्रभाताई आपल्या समोर मांडतात. ऐकताना वाटलं, हे आचंबित करणारे शब्द कोणाचे असावेत?...
सुरेश भटांची झलक दिसते आहे खरी. त्यांच्या ’मी एकटीच माझी असते कधी कधी..’च्या वळणानं जाणारी रचना.., पण.. नाही, ते नसावेत. भट गाठतात त्या भावनिक उत्कटतेच्या हे थोडं खाली आहे....
मग विंदा? त्यांनी पण एका कवितेत म्हंटलंय, 'स्वप्‍नास सत्य असते सामील जाहलेले.'.. नक्की कळत नाही.
अतींद्र सर्वाडिकर या प्रभाताईंच्या शिष्याकडे धाव घेतली आणि कळलं गीताचे शब्द अशोकजी परांजपे यांचे आहेत. अशोकजी परांजपे तसे दुर्लक्षितच राहिलेले!..........

• पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला श्री संत नामदेवांचा अभंग 'सगुण संपन्‍न पंढरीच्या राया’. शौनक अभिषेकींचा सहस्वर. अभंग भिन्‍न षड्‌ज रागात आहे. हा राग म्हंटला की उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ां साहेब यांच्या 'याद पिया की आए..' या ठुमरीच्या आठवणीची कळ तर उरी येणारच...............

• गदिमांचं अगदी साधं आणि निरागस गाणं- 'आवडला मज मनापसुनी गडी तो घोड्यावरचा..' यात एक ओळ आहे- 'बाजाराला जाता जमला शिनवे त्याचा आमचा..'
आता हे 'शिनवे' म्हणजे काय? जवळचे सगळे मराठी, संस्कृत शब्दकोश धुंडाळले. इंटरनेट खंगाळलं. व्यर्थ.
मग सुमित्र माडगूळकरला हाक. त्यानेही ताबडतोब योग्य व्यक्तींमार्फत भाषातज्ञ डॉ. सयाजीराव मोकाशी यांच्यापर्यंत पोचावं आणि काही मिनिटातच 'शिनं' या माणदेशी शब्दाचा संपूर्ण अर्थ उलगडणारं सयाजीरावांच्या आवाजातलं फोनवरील रेकॉर्डींग whatsapp करावं.
आपणही गदिमांनी वापरलेल्या हटके शब्दांच्या सुयोग्य वापराने स्तिमित होऊन जावं............

• 'भातुकली उधळली अचानक..' सुमनताई कल्याणपूर यांच्या आवाजातलं हे गाणं... त्यांनी पार्श्वगायन केलेल्या त्यांच्या पहिल्या मराठी सिनेमातलं. चित्रपट 'दिसतं तसं नसतं'. साल १९५६. बाईंच्या गाण्यातला दर्द खानदानी आहे. संयत आहे तरी खोल आहे. असाच दर्द त्यांनी 'बोलकी बाहुली' मधल्या 'आठवे अजुनी यमुनातीर..' मध्ये दाखवला आहे. या गाण्यातली 'सौख्य छळे मज......' ही ओळ लक्ष देऊन ऐकावी. गाण्यातून अभिनय केलाय सुमनताईंनी...............

• 'हे राष्ट्ररूपिणी गंगे! घेईं नमस्कार माझा.' या आनंदराव टेकाडेंच्या कवितेच्या शोधात मी गेली वर्षभर होते. दोन महिन्यांपूर्वी पुण्यात असताना, पुणे मराठी ग्रंथालयाला फोन केला. सांगितलं, माझ्याकडच्या आनंदरावांच्या 'आनंद गीते'च्या पहिल्या भागात ही कविता नाहीये. तर तुमच्याकडे भाग २, ३, ४ आहेत का? मला संदर्भासाठी चाळता येतील का? नारायण पेठ, लोखंडी तालीम या त्यांच्या पत्त्यावर पोचायच्या आधीच तिथल्या वाचन विभागात ही पुस्तके तयार होती. पान-पान पिवळं-जीर्ण झालेल्या त्या पुस्तकांतील भाग ३ मध्ये ही कविता मिळाली. ग्रंथालयाच्या परवानगीने त्या पानाचा फोटो काढला. वर त्यांनी हेही सांगितले, अशा संदर्भांकरिता कधीही भेट द्या.
आकाशवाणीवरून स्फूर्तीगीतांच्या कार्यक्रमात ही कविता अनेक वेळा सादर होते........

• 'प्रियकर:' हे संस्कृत गाणं, दोन वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या 'YZ' या मराठी सिनेमातलं आहे. केतकी माटेगावकरच्या स्पष्ट उच्चारांनी आणि नादमधूर गायनाने लक्ष वेधून घेतलेलं. पण हे संस्कृत श्लोक कुठून घेतले आहेत.... ते जसेच्या तसे घेतले गेलेत की त्यात काही बदल केलेत?..... शोधयात्रा संपल्यावर वाटलं, आपल्या जे समजलं आहे ते समस्तांस कळवण्याची तातडी करावी, हे बरं.
जसं, 'तोच चंद्रमा नभात..' हे शान्ताबाईंनी एका संस्कृत श्लोकावरून घेतलं आहे, असं सगळे म्हणतात. पण आपण शीला भट्टारिका यांचा तो श्लोक शोधून काढून 'आठवणीतली गाणी'वर उपलब्ध करून दिलाय, तसं......

• तीन महिन्यांपूर्वीचं बाबांचं जीवघेणं आजारपण... खरोखरीच त्यांचा जीव घेऊन गेलं. ICU च्या बाहेर १२-१३ दिवस बसून राहणे. अनिश्चितता. कासावीस. पण हातात केशवराव भोळ्यांचं त्यांचा सांगीतिक दृष्टीकोन विषद करणारं पुस्तक. का कुणास ठाऊक, त्याचा पण कोण आधार वाटला... त्यातूनच 'आठवणीतली गाणी' करता चार-पाच संदर्भ लेखही मिळाले.
म्हणता म्हणता संकेतस्थळावरील संदर्भ लेखांची संख्या शंभरच्या वर गेली की !....

• गेल्या महिन्यातली गोष्ट. फेसबूकने स्वत:च्या वागण्यात बरेच बदल केलेत. अरे देवा!
हे फेसबुकचं नेहमीचंच तरी आपल्याला आता धावपळ करून त्याचे वेबसाईटवर झालेले परिणाम निस्तारावे लागणार! वेबसाईटच्या प्रोग्रॅम कोड मध्ये काही बदल करावे लागतील आणि त्यासाठी इंटरनेटवर खूप सगळं संशोधन करावे लागेल. हं....!
त्यात या महिन्यात आपणच आपल्याशी केलेला एक व्यक्तीगत पातळीवरील वायदा. #Dubai30x30 fitness challenge, #DistanceRunning च्या अंतर्गत एका महिन्यात कमीत कमी शंभर कि.मी. पळण्याचे स्वीकारलेले आव्हान.... एक ती धावपळ आणि एक ही पळापळ.... दोन्हींनी तसा वेगवेगळ्या अर्थाने घाम काढला... पण पूर्ततेनंतरचे समाधान काही वेगळे.

सुधीर मोघे नेहमी म्हणायचे, "प्रश्न पडणं थांबवू नकोस. ते सतत पडावेत. उत्तरं कधी लगेच सापडतील तर कधी वेळ लागेल."
या अशा शोधयात्रांमध्ये मला पंढरीची वारी दिसते.
.. आणि अशी खोलात जायला लागले म्हणून अनेक गीतरत्‍नं मला सापडली आहेत,... सापडतील.
कबीर म्हणतात तसं,
जिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ।

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Kilimanjaro Summit


रात्र गुरुपौर्णिमेची होती.
रात्र तेजस्वी चंद्राची होती,
दुर्बिणीतून खास निरिक्षण करावे अशा खग्रास चंद्रग्रहणाचीही होती....
रात्र समुद्रसपाटीपासून पंधरा हजार फुटांवरील आमच्या बेस कॅम्पवरून, नुसत्या डोळ्यांना स्पष्ट दिसणार्‍या लखलखीत आकाशगंगेची होती,
रात्र सुंदर होती......

रात्र वैर्‍याची नव्हतीच मुळी....
पण प्रचंड थंडीची होती. तापमापकातील अती वेगाने खाली घसणार्‍या पार्‍याच्या पातळीची होती.
हातापायांची बोटं गोठवणार्‍या बोचर्‍या वार्‍याची होती.
इतक्या उंचीवर असल्यामुळे हवेतल्या आणि त्यामुळे आमच्या रक्तात कमी झालेल्या प्राणवायूची होती.
पुढील १० तास शांतपणे, दृढतेने वर वर चढत जाण्याची तर होतीच होती....
रात्र summit climb ची होती......

रात्र उत्‍सुकतेची होती.
सखोल आणि जय्यत तयारीची होती..
मोजून ४ दिवसांपूर्वीच भेटलेल्या १५ जणांनी, एकमेकांना सांभाळत, सावरत, एकसंघ वागण्याची होती.

आम्ही आमच्या टोळीचं नाव 'Kili Ninjas' असं अगदी नुकतंच,
म्हणजे कालच्या सरावाच्यावेळी ठेवलं होतं. यातला 'Ninja' हा शब्द आमच्यातील लढाऊ वृत्तीशी, कृतनिश्चयी असण्याशी निगडीत असावा.

बडबडी, बिनधास्त, मलेशीयाची जॅकी, जपानची चिझा, पंजाबची रुपिंदर, काश्मिरचा अजय आणि त्याची २६ वर्षांची मुलगी अहिल्या आणि १६ वर्षांचा मुलगा अहान, मलेशीन असून तामिळ ब्राह्मण भारतीयाशी लग्न करून दोन मुलांची आई असलेली कॅरी, उत्तर भारतीय अरूण - या सगळ्यांचं वास्तव्य सिंगापूरला.... ते सगळे तिथून आलेले.
मी आणि आशय दुबईहून. जस्टीन अमेरिकेहून. केरळची मीरा सध्या इंडोनेशियात वास्तव्य असल्याने कौला लंपूरहून. डॉ. संजीव दिल्लीहून आले होते तर प्रेरणा आणि जयेश मुंबईहून.

अशा सगळ्यांची ही मोट,
पण एकाच उद्देशाने एकत्र आल्याने लवकरच बांधली गेली.
त्यात कालच्या सरावाच्या वेळी आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलेलं- एका ओळीत, लागून लागून चालावे. पुढच्या माणसाच्या पावलांकडे लक्ष द्यावे. डावा पाय - उजवा पाय हा ठेका सगळ्या ग्रुपचा सारखा असावा. आधी ट्रेकिंग पोल पुढे टेकवावा आणि मग पाय उचलावा, वगैरे सगळं तर होतंच..
..... आणि बरंच काही होतं.

चार दिवसात केलेली साडेदहा हजार फुटांची चढण होती...
त्यासाठी रोज केलेली दहा तासांची तंगडतोड होती..
एकमेकांबरोबर वाटून खालेला चॉकलेट, बदाम, खाखरा सारखा खाऊ होता.
एव्हाना tree-line, shrub-line मागे पडलेली होती. त्यांचा आडोसा होता तोपर्यंत ठीक होतं. पण आता फक्त वर एक आभाळ आणि खाली धरती, एवढंच काय ते उरलेलं. मग कोणी एकीने ओरडून सांगितलेलं "all guys look on the other side. we girls need a loo break." हेही होतं.

'किबो हट' बेस कॅम्‍पला दुपारी १ वाजता पोचलो असू. पाच तास चालणं आधीच झालं होतं. जेवण झाल्यावर आम्हाला आमच्या तंबूत विश्रांतीसाठी, तसंच रात्रीच्या तयारीसाठी पाठवण्यात आलं.
सगळे summit climbs रात्रीच सुरू होतात. आमचा मुहूर्त मध्यरात्री १२.३० चा, असा आदेश होता. 'रात्रीचं' जेवण 'संध्याकाळी' सहा वाजता मिळणार होतं. जेवण झालं की रात्रीची तयारी म्हणून अंगावर सगळे कपड्यांचे थर घालायचे आणि sleeping bag मध्ये चक्क झोपायचं ते साडे बाराचं बोलावणं येईपर्यंत.

(sleeping bag -३०°C तापमानासाठी योग्य असली तरी एवढ्याशा त्या तंबूतल्या सुळसुळीत तीच्यात झोपणं, खरं तर झोपण्याचा प्रयत्‍न करणं, तंबूतून आत बाहेर करणे.. याचं वर्णन हा एका वेगळ्या स्वतंत्र blog चा विषय असू शकतो.)

रात्रीची तयारी म्हणजे काय? हे नीट समजाऊन घेऊ. अशासाठी की या सगळ्यानंतर काही खाणं किंवा फोटो काढणं यातली निर्थकता लक्षात येईल-
​• तळपाय - blister proof socks एकावर एक. सर्वात शेवटी woolen जाड, असे तीन थर
​• पाय - base layer, fleece pants, trekking pants, shell pants
​• धड - base layer, t-shirt, fleece jacket, light down jacket, shell jacket​
​• डोकं - bandana, woolen cap, hood of down or shell jacket
• तळहात - liner gloves, fleece gloves, shell gloves
​• 2 trekking poles
​• headlamp
​• backpack मध्ये water bladder, energy bars.. बर्फावर चालण्यासाठी घालावयाचे, शूजवर लावायचे cleats..
अशी सगळी तयारी पूर्ण झाली.

"OK guys.. time to move" अशी साडे बारा वाजता हाळी आली आणि Kilimanjaro नावाच्या महाकाय पर्वताच्या शेवटच्या चढणीची सुरुवात झाली. हा सगळा चढ थेट, अंगावर येणारा आहे. सर्वाधिक काळ तो जमिनीशी ३० अंशाचा कोन करतो तर काही भागात तो ४५ अंशांपर्यंत जातो. असा चड चढण्याचं एक तंत्र असतं. टान्झानियाच्या स्वाहिली भाषेत त्याला 'पोले पोले' असं म्हणतात. आपण त्याला हळू-हळू किंवा पाऊल-पाऊल म्हणू शकतो. म्हणजे आपल्या स्वत:च्या पाउलाच्या लांबी इतक्याच अंतराची प्रत्येक स्‍टेप घ्यायची. असं करण्याने श्वास कधीही तोकडा पडत नाही. शांत, सावकाश पण ठाम असं चढायचं.
जोजेफ- आमचा सिस्‍टम गाईड पेस सेटर होता. सगळे त्याच्या मागे.


Kilimanjaro हा ज्वालामुखी पर्वत आहे. वर चढत त्याच्या मुखाशी पोचलं की पहिल्यांदा लागतो तो Gilman's point. इथपर्यंत पोचलं की तुम्ही Kilimajaro पर्वत चढला असं म्हणू शकता. त्या अर्थाचं प्रमाणपत्रं तुम्हाला मिळू शकतं. मग त्या crater च्या कडेकडेने चालायला लागलो की या पर्वताच्या सर्वाधिक उंचीच्या दिशेने जाऊ लागतो. इथे बर्फावर चालण्यासाठी cleats घालावे लागले. नंतर येतो तो Stella point. सगळ्यात उंचावर Uhuru peak. तिथे पोचायला सकाळचे १० वाजले. Gilman's point ते Uhuru peak हा प्रवास दोन तासांचा आहे. एव्हाना एकमेकांमधील अंतर प्रत्येकाच्या दमणूकीच्या प्रमाणात वाढत गेलेलं. पण १५ पैकी १४ जण थोडं पुढे-मागे का होईना Uhuru peak पोचलो. एक मात्र Gilman's point हून परत गेली.


Uhuru peak ला एक गंमत झाली. Kilimanjaro च्या इतिहासात घडली नसेल अशी गोष्ट घडली. रुपिंदरने माझ्याकडे तिची बॅकपॅक देत त्यातून लिपस्टिक काढली. एक छोटासा आरसा काढून त्यात डोकावत रीतसर ओठांवर लावली. डोक्यावरचा सगळा uniteresting पसारा काढून टाकला. एक छानशी हॅट घातली. एक रंगबेरंगी ओढणीही गळ्याभोवती घेतली. मग सुंदर pose देत स्वत:चे फोटो काढून घेतले.
खरं तर तिला bikini घालायची होती किंवा साडी नेसायची होती. तिचा हा बेत आम्ही आदल्या दिवशीच हाणून पाडला होता. -२० अंश तापमानात असलं काही आत्मघातकी ठरू शकलं असतं. पण या काही गोष्टी ती घेऊन आलीच.
व्यवसायाने wardrobe stylist असलेल्या रुपिंदरने हाही अनुभव खूप 'स्टाईल’ मध्ये घेतला.

Uhuru peak ची समुद्रसपाटीपासूनची उंची १९,३४१ फूट आहे. इतक्या उंचीवर हवेतील प्राणवायूचे प्रमाण कमी असते. त्याची आपल्या शरीराला सवय नसते. म्हणून इथे १५ मिनिटांपेक्षा अधिक कुणीच थांबू नये.
पण प्रत्येकाच्या येण्याच्या वेगवेगळ्या वेळा आणि मग फोटो यात आमची तब्बल ४५ मिनिटे गेली. ही अर्थातच मोठी चूक होती. त्यामुळे आमच्यापैकी चार-पाच जणांना altitude sickness चा त्रास झाला. एकाला तर oxygen देत खाली आणावे लागले.

डोंगर चढणे अवघड पण उतरणे सोपे.. अशी जर कुणाची समजूत तर ते बरोबर नाही. हे खरं की उतरण्यास वेळ कमी लागतो. पण loose, मुरमाड, तीव्र उतार असलेल्या जमिनीवरून उतरतानाची कसरत फार अवघड. दोन्ही ट्रेकिंग पोल्सचा आधार घेउनही उतरण्याच्या वेगावर आणि घसरण्यावर फार काही ताबा ठेवता आला नाही. बरेच वेळा आपटी खालली. सुरुवातीला 'किती वेळा' ते मोजायचा प्रयत्‍न केला. पण मग संख्या इतकी वाढली की मोजण्यात फारसा अर्थ उरला नाही. त्यात तासभर झालेली बर्फवृष्टी. अगदी मनापासून सांगायचं झालं तर ते पडणं आणि तो बर्फ हा माझ्यासाठी या ट्रेकचा high point होता.

बेस कॅम्पला परतायला दुपारचे दोन वाजले.. तिथे जेवण.
तिथली साडेपंधरा हजार फुटांची पातळी देखील राहण्यास योग्य नसल्याने पुढील पाच तासात बारा हजार फुटांवर उतरून रात्रीचा मुक्काम तिथे.


Kilimanjaro पर्वत चढण्याचा प्रयत्‍न करण्यार्‍यांपैकी फक्त ३५% Uhuru peak पर्यंत पोचतात, हे पाहिलं तर आम्ही आमचं Kili Ninjas हे नाव सिद्ध केलं, असं म्हणता येईल.

अशी ही summit climb च्या रात्रीची,
किंवा रात्रीची आणि नंतरच्या दिवसाची,
नव्हे एका रात्रीपासून दुसर्‍या रात्रीपर्यंतची कहाणी....

सुफळ आणि संपूर्ण.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

आठवणीतली गाणी साठवताना


साप्‍ताहिक विवेक - दिवाळी अंक २०१७
'या आठवणीतल्या गाण्यांमुळे ICUतून ढगांत जाता जाता वाचलो. येथील गाणी ऐकणे ही माझ्यासाठी थेरपी होती.' किंवा 'मी २२ वर्षांची असताना माझ्या दोन्ही कानांची ऐकण्याची क्षमता गेली. मी hearing handicapped आहे. पण 'आठवणीतली गाणी'मुळे मला खूप गाणी वाचता व गुणगुणता येतात. रोजचा दिवस एका तरल आनंदात जातो.'

कधी अशी थेट भावनेला हात घालणारी ईमेल्स येतात, तर कधी 'लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला - हे बालगीत माझे आजोबा नारायण गोविंद शुक्ल यांनी लिहिलं आहे. ते कसबा पेठ, पुणे इथे राहतात. मी निमिषा, त्यांची नात. त्यांच्यासह आम्हां सगळयांना फार आनंद झाला की असा एक गीतसंग्रह असावा आणि त्यात स्थान मिळवून या गाण्याचा आनंद समस्तांस घेता यावा.' किंवा 'इतकी वर्षे गाणी म्हणतेय. म्हणजे तो माझा व्यवसायच आहे. पण शब्दांच्या अचूकतेकडे कधी फारसं लक्ष दिलं गेलं नाही. आता 'असोवरी मेखला' यासारखे शब्द अगदी बरोबर आणि अर्थ समजून गायल्याने माझे गायन अधिक परिणामकारक होते.' यासारखे निरोप....

थोडक्यात काय, 'आठवणीतली गाणी' या माझ्या संकेतस्थळाला नियमित भेट देणाऱ्याने एकाने म्हटलं आहे तसं, 'ही वेबसाइट माझ्या कामाची नाही असं कुणीही म्हणू शकत नाही.'

जशी तुमची प्रकृती/प्रवृत्ती, तसा तुम्ही अनुभव घ्यावा. आता 'आपली आवड'सारख्या कार्यक्रमासाठी रेडिओवर अवलंबून राहण्याची गरज नाही.. फक्त आपल्याला आवडणाऱ्या गीतांची निवड करावी आणि ती मनसोक्त ऐकावी..

हे आता सहज शक्य झालंय ते 'आठवणीतली गाणी'मुळे (www.aathavanitli-gani.com).

ही वेबसाइट तयार करणं, चालवणं हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. एकीकडे मराठीतील गीतरत्नं शोधावी, दुसरीकडे बदलतं तंत्रज्ञान शिकावं - ते 'आठवणीतली गाणी'वर अंमलात आणावं, असा समन्वय साधत माझा प्रवास चालू आहे. यांस अनेकविध मार्गांनी कसं संपन्न करता येईल, हा सजग विचार सतत मनात असतो.

चौदा वर्षं झाली. सुरुवातीला फक्त गाण्यांचे शब्द लिखित स्वरूपात होते. आता तेवढंच सीमित राहिलेलं नाही. अवघड शब्दांचे अर्थ, ब्लॉग, संदर्भलेख, संतांच्या रचनांचा भावार्थ, विविध गायकांनी केलेले एकाच गाण्याचे स्वराविष्कार, गीताचा राग असे अनेक आयाम जोडले गेले. जिथे गाणी ऐकता येतात अशी अनेक संकेतस्थळं आंतरजालावर उपलब्ध आहेत. पण वर दिलेल्या आपल्याच अशा खास वैशिष्टयांमुळे 'आठवणीतली गाणी'चं स्थान अनन्य असं आहे. उपलब्ध माहिती दुर्मीळ आणि अनुभव संपन्न आहे.

या निमित्ताने अनेक कलाकारांच्या, त्यांच्या वारसदारांच्या, अभ्यासूंच्या भेटी घडत असतात. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक चर्चा या गीतरचनांवर वेगवेगळा प्रकाशझोत टाकते. तसंच खूप वाचनही घडतं. मध्यंतरी वि.स. खांडेकर यांचा एक लेख वाचनात आला. त्यात त्यांनी कुसुमाग्रजांच्या 'पाचोळा' कवितेविषयी लिहिलं आहे. त्यांचीच प्रस्तावना असलेल्या 'विशाखा' या कविता संग्रहातील ही कविता. तिचा त्यांनी लावलेला अर्थ, कवी मायदेव यांना वाटलेला सापेक्ष अर्थ आणि खुद्द कवीच्या मनातील कविता लिहितानाची भावना, यातील तफावत याचं गमतीदार वर्णन या लेखात त्यांनी केलं आहे. मग मी पुढे जाऊन पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी या कवितेची चाल बांधताना कुठला अर्थसंस्कार केला असेल, याचा विचार करू लागले. मग दोन संगीतकार जेव्हा एकाच गाण्याला चाल लावतात तेव्हा त्यांचा काय विचार असेल? तसंच एकच गाणं दोन गायक गातात त्यातून मिळणारा आनंद.. हे सर्व रसिक श्रोत्यांना पोहोचवणं फार महत्त्वाचं आहे, असं मला वाटलं. ही सर्व माहिती 'आठवणीतली गाणी'वर वेळोवेळी संकलित केल्याने तिचा विस्तार एकसुरी राहिलेला नाही.

गदिमांच्या शब्दांचा आधार घेऊन या माझ्या उपक्रमाचं वर्णन असं करता येईल -
ज्ञानदेविच्या, मराठियेच्या नगरीतून हिंडून,
आणिले टिपुनी अमृतकण

'आठवणीतली गाणी' संपूर्णत: अव्यावसायिक तत्त्वावर आहे. म्हणजे non-commercial, non-profit. या कामासाठी कुणाकडूनही आर्थिक किंवा कुठल्याही स्वरूपात मोबदला घेतला जात नाही. त्यामुळे इथे जाहिरातींचा गोंधळ नाही.

तसंच इथल्या पानांवर भेट देणाऱ्यांचे अभिप्राय, टिप्पण्या नाहीत. त्यामुळे 'आठवणीतली गाणी' हा एक निवांत असा अनुभव आहे. येथे भेट देणं अनेकांना मन शांत करण्यास मदत करणारं वाटतं. असे अभिप्राय येतच असतात. श्री. आबा पाटील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असताना नेमक्या याच कारणासाठी अनेक वेळा ते येथील गाणी ऐकत असत. त्यांनी तसं कळवलं होतं. काही मानसोपचारतज्ज्ञ, संगीत आवडणाऱ्यांना या संकेतस्थळाला मुद्दामहून भेट देण्यास सांगतात. तो त्यांच्या उपचार पध्दतीचा एक भाग झाला आहे. म्हणूनच 'आठवणीतली गाणी'च्या दृश्य स्वरूपात कुठलाही बदल करताना या अनुभवास धक्का लागणार नाही याचं भान मी नेहमी ठेवते.

गाणी ऐकणं, त्यांचे शब्द लिहिणं, मग कधी अडल्यानडल्या शब्दांचे अर्थ शोधणं हा माझा नेम. यातून मी संकेतस्थळावर शब्दार्थ देणं चालू केलं. आणि ते देणं चालू केलं, म्हणून मी शब्दार्थांच्या अधिक खोलात जायला लागले. 'ॠतू हिरवा, ॠतू बरवा' - शांताबाईंची ही रचना आशाताई आणि पं. हृदयनाथ यांनी घराघरातील लहानमोठयांपर्यंत नेऊन पोहोचवली आहे. पण त्यातील 'बरवा' हा शब्द प्राकृतातून येतो. आजकाल आपण वापरत नाही. 'तो हा विठ्ठल बरवा..' बरवा म्हणजे छान, सुंदर. हा अर्थ मुद्दामहून नमूद केल्याशिवाय सहजी त्याकडे लक्ष जात नाही.

कधी गाण्यातला एखादा शब्द वर्षानुवर्षं अडतो, तर कधी एखादा शब्द नव्यानेच उलगडतो. हेच पाहा, गदिमांचं सर्वांचं तोंडपाठ असलेलं, 'गोरी गोरी पान, फुलासारखी छान' हे बालगीत. यात एक ओळ अशी आहे - 'चांदण्याच्या पदराला बिजलीचा ...' अनेक जण 'बिजलीचा बाण' म्हणतात. कुणी 'बिजलीचा मान' म्हणतात. गदिमांनी 'बिजलीचा वाण' लिहिलं आहे. 'वाण' इथे 'वर्ण' या अर्थाने येतो. यासाठी मला बरीच शोधाशोध करावी लागली. 'वाण' हा शब्द वस्त्रोद्योगात नमुना किंवा आडवा धागा या अर्थाने येतो. श्रावणातल्या सणासुदीला 'वाण' स्त्रिया 'वसा' म्हणून देतात. हे कुठेच इथे बसत नाही. मग कधीतरी पी. सावळारामांच्या एका गीतात तो वापरलेला सापडला. ते म्हणतात, 'गव्हाळी वाणाचा तो हसरा मुखडा'. सगळा उलगडा होण्यास ते पुरेसं होतं.

ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग आणि ज्येष्ठ कवी सुधीर मोघे यांनी मला वेळोवेळी खूप मदत केली. पहिले मला पितृस्थानी, तर दुसरे गुरुस्थानी. दोघांचीही सांगीतिक कारकिर्द जवळपास सहा दशकांची. दोघांनीही अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलेलं. मराठी भावसंगीताच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या टप्प्यांचे ते साक्षीदार. काही वेगळं, चांगलं घडण्यास आणि घडवणाऱ्यास प्रोत्साहन देण्याची दोघांचीही वृत्ती असल्याने दोघांनीही वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यांच्याबरोबर घडलेल्या गप्पा नेहमी दिशादर्शक ठरल्या. कवी सुधीर मोघे यांच्याकडे गेले की हा एक प्रश्न नेहमी चर्चेत असायचा. 'गाणं नेमकं कोणाचं? संगीतकाराचं की गायकाचं?' इथे 'चर्चा' किंवा 'गप्पा' म्हणणं खरं तर अवघड अशासाठी, की ते बोलायचे, खूप सांगायचे आणि मी ऐकायचे. त्यांच्या मते गाणं हे त्याच्या अंतिम टप्प्यात रसिकांचंच होतं. ते तसं व्हायलाच हवं. पण कवी आणि संगीतकार या दोघांच्या भूमिकांबद्दलची तौलनिक मतं ते स्वत:च मांडायचे. देवकीताई पंडित यांना त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी सुधीर भटांची त्यांनीच संगीत दिलेली गझल 'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' गायला शिकवली. ते कसं होतं आणि आत्ता देवकीताई जसं आता गातात यात झालेला बदल त्यांनी एकदा गाऊन दाखवला होता. म्हणजे चाल तीच. पण गायिकेचं कोवळं वय ते तीच गायिका वयाच्या चाळीशीनंतर.. हा बदल त्यांनी दाखवला. यातून माझे काव्यानुभव समृध्द झाले आणि मराठी भाषेच्या ज्ञानाची कक्षा रुंदावत गेली.

'आठवणीतली गाणी'वर आपण शब्द वाचत गाणी ऐकतो. म्हणून गाण्याची निवड करताना प्रथमत: शब्द... मग नंतर चाल, गायकी, संगीत संयोजन, रागाचा वापर वगैरे सगळं. शब्द वाचताना गाणं ऐकण्यात शब्दप्रधान गायकी येते. शब्दांत काव्य असावं लागतं. अशा वेळेस 'कोंबडी-तंगडी' हे यमक खटकतं. त्यामुळे काही लोकप्रीय गीतं जाणीवपूर्वक बाजूला ठेवली आहेत. मराठी संगीताच्या इतिहासात त्यांचं स्वत:चं असं एक स्थान नक्कीच आहे. पण ती गाणी या संकेतस्थळाच्या निवडकक्षेत येत नाहीत, इतकंच.

२००२ साली आम्ही दुबईला राहायला आलो, तेव्हा मी भारतातील माझा अतिशय व्यग्र दिनक्रम मागे ठेवून आले. भारतात संख्याशास्त्र, गणित या विषयांची १४ वर्षं प्राध्यापिका आणि मग ओरॅकल, एएसपी या संगणक क्षेत्रातील विषयांचं व्यावसायिकांना प्रशिक्षण देणं अशी कामं करत होते. त्यामुळे सळसळती बुध्दिवादी तरुणाई आसपास असे. दुबईत आले आणि हे सगळं एकदम संपलं.

त्या काळात मराठी फाँट्स इंटरनेटवर उपलब्ध नव्हते, फारसे प्रचलित नव्हते. तो प्रयोग करून पाहावा, म्हणून लहानपणी रेडिओवर ऐकलेल्या गाण्यांची एक जुनी वही शोधली. सुमारे ३५० गाणी असतील. अगदी नेहमीची. आपल्या सगळयांच्या हृदयाजवळची. ती संगणावर टंकलेखित केली. आपल्या स्नेही-संबंधितांपर्यंत ती पोहोचवावी, म्हणून त्यांची एक वेबसाइट केली. त्यास सहज नाव दिलं, 'आठवणीतली गाणी'. वेबसाइट करणं हा माझा भारतात शिकवण्याचा विषय होता, म्हणून मला हे काही अवघड नव्हतं. हा प्रयोग फार अनोखा वाटल्याने पहिल्याच महिन्यात ज्योत्स्ना नगरकर या माझ्या मैत्रिणीने 'गल्फ न्यूज' या मध्यपूर्वेतील प्रसिध्द दैनिकात त्याची दखल घेतली आणि आपण हाती नेमकं काय घेतलं आहे, याची जाणीव झाली.

'मनाचे मराठे मराठीस ध्याती, हिची जाणुनी योग्यता थोरवी' हे संपूर्ण सत्य आहे. अशा सर्व महाराष्ट्रातील, भारतातील आणि जगभरातील, मरहट्टयांच्या ई-मेल्सचा धबधबा सुरू झाला. प्रोत्साहन, अपेक्षा यांनी ती भरून असायची. माझ्याही उत्साहाला पारावार राहिला नाही. आई मराठीची शिक्षिका असल्याने मिळालेले भाषेचे संस्कार, माझं संगणक तंत्रज्ञानाचं ज्ञान आणि काही वेगळं-अर्थपूर्ण करावं याची वाटणारी ओढ या सगळयांचा मिलाप साधणारं हे माध्यम होतं. मी त्यात बुडी मारण्याचं ठरवलं. वेगवेगळया शक्यतांची दारं उघडली गेली.

'आठवणीतली गाणी' हे संकेतस्थळ सुरुवातीला कसं दिसायचं, ते आत्ता जसं दिसतंय आणि आणखी ६ महिन्यांनी ते कसं असेल.. याचा जर विचार केला तर असं म्हणता येईल - आतापर्यंत ते तीन अतिशय महत्त्वाच्या स्थित्यंतरांतून गेलंय आणि पुढील सहा महिन्यांत आणखी एकातून - चौथ्यातून जाणार आहे. हे बदल दोन प्रकारचे असतात. पहिले संरचनेचे म्हणून दृश्य. हे बदल करताना सौंदर्यवर्धनाबरोबरच भेटकर्त्यांचा वय वर्षे 15 ते वय वर्षं 90 एवढा मोठा वयोगट विचारात घ्यावा लागतो. त्याला कारणही तसंच आहे. एकदा एका नव्व्दीच्या गृहस्थांची ईमेल आली. म्हणाले, आम्ही दोघं नवरा-बायकोच राहतो. 'आठवणीतली गाणी' हा आमचा दिनक्रम आहे. पण आमचा जुना संगणक चालेना, म्हणून नवा लॅपटॉप घेतला, तर आता काही अडचण येते आहे. हा माझा फोन नंबर. खरं तर ते मुंबईत, ठाण्याला. मी दुबईला. पण मी फोन केला. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी बोलले आणि आम्ही दोघांनी मिळून त्यांची अडचण दूर करून दिली.

दुसरे बदल हे ही वेबसाइट तयार करण्याकरिता जे तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे, त्यात होणारे बदल. आता मोबाइल्सचा जमाना आहे. इंटरनेटवर जाणं हे लॅपटॉपपेक्षा मोबाइल उपकरणावरून अधिक घडतं. त्या पध्दतीचे काही बदल लवकरच होतील.

सध्या 'आठवणीतली गाणी'वर ३१००हून थोडी अधिक गाणी आहेत. पहिली 1000 गाणी शोधणं फारसं अवघड नाही गेलं. पण हा संच अगदी निवडक गाण्यांचा असावा, म्हणून त्यानंतरची निवड फारच काळजीपूर्वक होत आहे. जसं काही प्रत्येक गाण्याला आपली निवड इथे का व्हावी हे जणू सिध्द करायला लागत असावं.

आतापर्यंत 'आठवणीतली गाणी'चा उल्लेख मी 'माझं' म्हणून केला, ते केवळ त्याची संकल्पना आणि संचलन मी करते म्हणून. आज ते 'आपलं' वाटणाऱ्याची रसिक-प्रेमीजनांची संख्या जगभर पसरली आहे. ते ई-मेल्समधून 'आपण असं करायचं का?', 'आपल्या साइटवर ते गाणं नाहीये' असा उल्लेख करतात. या सगळया आपलेपणाचा सन्मान म्हणून गेल्या वर्षीपासून आपण एक टॅगलाइन वापरणं चालू केलं आहे. 'आठवणीतली गाणी... आपल्या सगळयांची, आपल्या सगळयांसाठी.' हा आपलेपणा माझ्या ऊर्जेचा स्रोत आहे, माझी प्रेरणा आहे.

वेबसाइटवरील 'अभिप्राय' विभागात गेल्या १४ वर्षांत कळवले गेलेले अगदी निवडक अभिप्राय दिले आहेत. त्यावरून कल्पना येते किती वेगवेगळया कारणांसाठी, किती तीव्रतेने हे संकेतस्थळ अनेकांना भिडतं. हे व्यक्त होण्यासाठी या संकेतस्थळाची फेसबुक, गूगल प्लस आणि टि्वटर पेजेस आहेत. त्यावरून तुम्ही संपर्कात राहू शकता अथवा वेबसाइटवरून ईमेल पाठवू शकता.

'आठवणीतली गाणी' वेबसाइट ही मी करत असलेल्या अनेक 'उद्योगां'पैकी एक आहे. बौध्दिक, शारीरिक आणि सर्जनशीलता या तिन्ही पातळयांवर स्वत:ला तपासून पाहणं मला खूप आवडतं. हिमालयातले अती उंच डोंगर चढणं, लांब पल्ल्याचं पळणं, क्वचित कधी ब्लॉग्ज लिहिणं, क्रोशे विणकाम हे माझे फार जिव्हाळयाचे विषय आहेत.

मराठी लोकसंगीत, संतवाङ्मय, नाटयसंगीत, भावसंगीत ही परंपरा फार थोर, उज्ज्वल आणि समृध्द आहे. दिसागणिक त्यात भर पडत असते. शाहिरी रचना ते आजची चित्रपट गीतं आणि jingles हा फार मोठा कालखंड आहे. ही वाट चालले असंख्य कलाकार.. त्यांच्या कामाचा आवाका पाहिला की मन भरून येतं. करावं तितकं कमी. 'देता किती घेशील दो करांनी' अशी अवस्था. एक निकष म्हणून ज्या पदरचनांच्या ध्वनिमुद्रिका आहेत, ज्यांचं रेकॉर्डिंग झालेलं आहे, केवळ त्यांचाच विचार 'आठवणीतली गाणी'साठी केला जातो.

जे आजचं ते उद्याच्या आठवणीतलं.....
ही सेवा अविरत करता येवो, हीच प्रार्थना !

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Outsourcing


नवर्‍याचा सगळा दिवस checklists, check boxes आणि reminders यांवर चालत असतो. आणि नेमक्या याच कारणामुळे तो आता एका परिस्थितीत सापडला आहे.
त्याचं झालंय असं......

मी नं माझ्या नवर्‍याची peripheral memory आहे. म्हणजे external hard disk म्हणा नं...

या व्यवस्थेने एक साध्य होतं की त्याला 'office' या विषयाच्या परिघाबाहेर मुद्दामहून फार कमी लक्षात ठेवावं लागतं.
जसं काही- येऊ घातलेले सणवार, लग्नं-मुंजी-वाढदिवस, येणारे पाहुणे, असलं काहीही.... फक्त गरज असेल तेव्हा मला विचारावं.
नेहमीच्या नसलेल्या कोणाकडेही जाताना, त्यांना असलेली मुलं-बाळं, त्यांच्या घरी जाण्याचा रस्ता या सर्व गोष्टींवर मी त्याला गाडीत बसल्याबसल्या अद्ययावत करत असते.
असली माहिती फार काळ retain करण्याची गरज नाही असं त्याला वाटतं. तीचा वापर झाला की तितक्याच तत्परतेने विसरून जावी.

( हे सगळं कसं त्या शेरलॉक होम्स्‌ सारखं आहे. तो नाही का त्या डॉ. वॉटसनला म्हणतो, "Now that I know the Earth revolves around the Sun, I will make an every effort to forget it." कारण त्याच्या Science of deduction मध्ये या माहितीचा काहीच उपयोग नव्हता. )

त्यामुळे एक तर मी, नाही तर त्याच्या त्या checklists, यांवरच त्याला अवलंबून रहावं लागतं.

या याद्या बनवणं हा सुद्धा एक मजेशीर प्रकार असतो.
उदाहरणार्थ, वाणसामानाची यादी. या यादीतील प्रत्येक पदार्थाचं रंग-रूप वर्णन करून सांगावं लागतं.
जसं काही,
'१ किलो पोहे आणायचे आहेत. पण पोहे दोन प्रकारचे असतात. जाड आणि पातळ. मला जाड हवे आहेत. समोर आहेत ते नेमके जाड आहेत की पातळ हे तुला कळणार नाही. तिथे काम करणार्‍या माणसाला त्यांच्याकडे असलेले सर्व प्रकारचे पोहे दाखवायला सांग. त्यातले जे तुला relatively जाड वाटतील ते आण.’
किंवा ’कोबीच्या गड्ड्याचा diameter ५ इंचांपेक्षा जास्त नको.’

या सगळ्यात दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेला प्रकार काही बसत नव्हता.

मी पुण्यात असतानाची गोष्ट आहे. त्याने दुबईहून फोन केला आणि सांगितलं, "I love you."
इतकी उत्‍स्‍फूर्तता, असं व्यक्त होणं, त्याच्या स्वभावाचा भाग नसल्याने भांबावून मी पण म्हंटलं, "बरं मग? त्याचं आत्ता काय? झाली की लग्नाला कितीतरी वर्ष."
तरी त्याचं आपलं तेच.. "Today I have to tell you, I love you."
काही दिवसांनी परत तसाच फोन.. मग परत पुन्हा.... (मी मनात... फार प्रवास झाला वाटतं आपला एवढ्यात.. ... तब्येत बरी आहे ना याची... / .... वगैरे.)

दुबईत परत आले तरी तेच. पण यावेळेस वाक्य थोडं बदललं होतं. Today is Tuesday and I love you....
आता हा मंगळवार कुठून आला ?

शेवटी समोर बसवलं आणि हा काय प्रकार समजावून सांगायला लावला.
म्हणतो कसा, "नाही. नाही. मंगळवार तसा incidental आहे. माझ्या असं लक्षात आलंय की मी तुला असं काही फारसं म्हणत नाही. But I should be saying such a thing to you regularly. म्हणून मी सरळ दर मंगळवारचं एक reminder फोनवर टाकलंय. To tell you- I love you."

माझा अर्थातच- dropped jaw.

मग मी पण काट्यानेच काटा काढायचा ठरवला. त्याचा फोन घेतला. ते reminder delete केलं.
आणि एक नवीन Location based reminder तयार करून टाकलं.
Repeat - Forever
Location - Our home
Reminder text- 'Google- Remind me to be nice to Alka when I am at home.'
आता या माणासाने बाहेरून येऊन कधीही घरात पाऊल टाकलं रे टाकलं की त्याचा फोन ’टण्ण’ वाजतो आणि नवर्‍याला एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून देतो.

माझ्या चेहर्‍यावर हलकिशी स्मितरेषा उमटते पण मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. 🤣😇
Love such idiosyncrasies in people. Life is beautiful !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सय


दूधाची पिशवी सकाळी घरी येणे- या अनुभवापासून मी अंदाजे २० वर्षे वंचित आहे.
दुबईला प्लॅस्टीकच्या कॅनमधले, सुपरमार्केटमधून आणलेले दूध असते. पुण्याला काही दिवसांसाठी आले की अमूलचे tetra pack वापरते.

साय-दही-ताक-लोणी-तूप-बेरी आणि तीवर पिठीसाखर घालून खाणे हा अनुभव, २-३ आठवड्यांच्या भारतातील नाचानाचीत पूर्णत्वास नेता येत नाही. पुण्यातल्या या मुक्कामात मात्र काही कारणाने दूधाची पिशवी आणली....
आणि दूध तापवताना उतू गेलं. अगदी गॅसचा नॉब पकडून उभं राहून सुद्धा नेमक्या क्षणी दुर्लक्ष झालं. दूधाला आलेला उमाळा त्याला.. खरं तर मला आवरता आला नाही. सायीचं एक टोक पातेल्यावरून ओघळलं.. त्याच्या नादाने दूधाचे काही मोजकेच थेंब.. पण टप टप करीत गॅसवर पडले. सगळं पातेलं मात्र सायीने- माखलं. 'माखलं' हे उगीच सकारात्मक बोलायचं म्हणून. पण खरं तर बरबटलं.

गोष्ट अगदी किरकोळ, घरोघरी, अगणित वेळा घडणारी. दूध उतू जाणे.
पण ते तसं घडलं आणि आईची आठवण आली.

लहानपणी नाशिकला घरी दूधाची पिशवी आली की, दूध आणि त्याची पिशवी, यांना त्यांच्या logical end पर्यंत नेण्याची तिने ठरवलेली अशी एक प्रणाली होती आणि ती आम्हा भावडांनी पाळणे बंधनकारक होते. दुधाने गच्च भरलेली पिशवी आधी पाण्याच्या नळाखाली धरायची. स्वच्छ धुवायची. स्टीलचे एक पातेले पाण्याने विसळून त्यात २ चमचे पाणी तसेच ठेवायचे. मग दूधाच्या पिशवीचे एक टोक कात्रीने कापायचे आणि दूध त्या पातेल्यात ओतायचे. नाशिकच्या त्यावेळच्या पहाटेच्या थंडीत ती पिशवी दूधातल्या मलईने आतून तशीच लडबडलेली राहायची. मग अर्धा वाटी पाणी उकळून घ्यावं. ते एका मागून एका सगळ्या पिशव्यांत फिरवावं आणि शेवटी दूधाच्या पातेल्यात ओतावं.

दूध किती तापवावं.. तर दूधाचं पोट तडस लागल्याइतकं फुगावं पण साय न मोडावी, इतकंच. पातेल्यावर बरबटीची एक रेघही न उमटावी. अशा सायीचं खास असं एक texture असतं. दुपारी फ्रीजमधून पातेलं काढलं की सूरीने पातेल्यापासून विलग केलेली साय एखाद्या थालीपिठासारखी उचलून दह्याच्या विरजणावर विराजीत करावी.

यात काही गडबड झाली तर आईला ते कळू न देण्याची आमची पण तितकीच ठोस तयारी होती. पण आम्हाला ती कितीही कडेकोट वाटली तरी आईच ती.. त्यातल्या फटी तिला बरोबर समजायच्या.
. दूध उतू गेलं की सगळ्यात पहिल्यांदा ते दुसर्‍या एका पातेल्यात काढावे.
. पातेले बदललेले आईला नक्की समजणार. म्हणून पहिले पातेले धुवून दूधास परत मूळ पातेली परत आणावे.
. या सगळ्यात सायीच्या त्या खास texture ची बरीच मोडतोड होणार. ती काही लपवता येणार नाही.
. त्यामुळे दुपारचा चहा करण्याची तत्परता दाखवावी, ज्या आड मोडलेली साय लपवण्याचा एक दुर्बळ प्रयत्‍न करावा. तत्परता प्रमाणातच असावी. अती करणे हेतूस मारक ठरते.
. आणि तरीही चहा पिऊन झाल्यावर 'आज दूध उतू गेलं वाटतं' हे आईचं वाक्य ऐकावं.
. संध्याकाळी, हे तिला कळलं कसं? याचा आणि पुढील सुधारणांचा विचार करत दोन बहिणी एका भावाने खलबतं करावी.... पुन्हा एकदा पकडलं जाण्यासाठी.

एक दूध उतू गेलं काय.. आणि तिच्या मायेची साय अशी अचानक आठवणींवर दाटून आली !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

जित्या गळ्याचा माणूस


( हा लेख सुप्रसिद्ध मराठी भावगीत गायक श्री. अरुण दाते यांच्या ‘शुक्रतारा’ या आत्मचरित्रात प्रसिद्ध झालेला आहे.
शब्दांकन - सुलभा तेरणीकर : मोरया प्रकाशन, पुणे : प्रथम आवृत्ती - ४ मे २०१६ )

थोर कलाकारांभोवती नेहमीच उत्सुकतेचे वलय असते. या कुतूहलाचे निवारण वेळोवेळी, त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर- त्याच्यांवरील लेखांमधून, त्यांच्या मुलाखतींमधून होत जातं. पण काही माणसं अशी असतात की त्यांना कितीही जाणून घेतलं तरी अजून काही जाणणं दशांगुळे उरतंच. ‘अरुण दाते’ या कलाकार आणि व्यक्तिमत्त्व, अशा दोन्ही अर्थाने टोलेजंग माणसाविषयी नेमकं हेच म्हणता येईल.

तब्बल सहा दशकांची सांगीतिक कारकीर्द, २६०० हून अधिक, फक्त स्वतः गायलेल्या गाण्यांचे जगभर केलेले कार्यक्रम.. यामुळे रसिकांचा प्रचंड आदर, प्रेम ‘याचि देही याचि डोळा’ बघण्याचे भाग्य अरुणजींना लाभले आहे. जी. एन्‌. जोशी, बबनराव नावडीकर, गजाननराव वाटवे यांनी घालून दिलेल्या पायावर मराठी भावगीत परंपरेची उत्तुंग इमारत अरुणजींनी उभारली. या इमारतीस जवळपास पाच पिढ्यांचे मजले आहेत. या मजल्यांमधून अरुणजींनी गायलेल्या गीतांचं प्रसन्‍न वारं झुळझुळत असतं. त्या वार्‍याला काळाचा शिळेपणा अजिबात शिवलेला नाही, शिवूच शकत नाही. कुणीही रसिकाने येथे आश्रयास यावं. या वार्‍याची एक लहर अंगावर घ्यावी आणि ताजंतवानं होऊन जावं.

अरुणजींनी ही भावगीते जनसामान्यांपर्यंत नेऊन पोचवली. ती रसिकांच्या मनांना भिडली, हृदयांवर राज्य करू लागली. आज देखील आकाशवाणीच्या ‘आपली आवड’ सारख्या कार्यक्रमात दाते साहेबांचं गाणं वाजलं नाही असा दिवस विरळाच असेल. बोजड नसलेले शब्द, वेधक चाली आणि त्यावरचा कळस असलेला अरुणजींचा मार्दवपूर्ण आवाज, शैली.. खानदानी शालीनतेचा साज ही गीते गेली ६० वर्षे मिरवीत आहेत.
याला समांतर आणि अरुणजींच्या समकालीन उदाहरण गझल गायक जगजीत सिंह यांचं देता येईल. जगजीतजींच्या आधी आणि त्याच वेळेस अनेक गायक उर्दू गझल गात असत. पण जगजीतजींनी गझलेला रसिकांच्या मनांत रुजवलं आणि गळ्यावर चढवलं.

१९६२ च्या सुमारास अरुणजी त्यांचं पहिलं मराठी भावगीत ‘शुक्रतारा मंदवारा’ गायले. शुक्र ग्रह अवकाशात कधी जन्माला आला माहित नाही पण पाडगांवकर-खळे-दाते या त्रयीच्या ‘शुक्रतारा’ने जन्म घेतला आणि तेव्हापासून ही ‘शुक्राची चांदणी’ मराठी भावसंगीताच्या अवकाशातलं आपलं अढळ स्थान राखून आहे. ‘भारलेल्या या स्वरांनी’ रसिकांचा जन्‍म भारला गेला तो कायमचाच.

‘हात तुझा हातातुन’, ‘पहिलीच भेट झाली’, ‘येशिल येशिल राणी’, ‘श्रीरंस सांवळा तू, मी गौरकाय राधा’, ‘मज सांग सखे तू सांग मला’ सारख्या गाण्यांनी प्रेमाची परिभाषा निर्माण केली. ‘सच्ची मुहब्बत’चे तरल स्वर- मृदू, संयत आवाजात रसिकांपर्यंत पोहोचू लागले.

पण हा आवाज फक्त प्रेमतरंगांवर लहरत राहिला, असं नाही. ‘भातुकलीच्या खेळा’मधली तडप, ‘वाळवंटातून भीषण वैराण’ मधला अंगावर येणारा एकटेपणा, ‘धुके दाटलेले’ मधले औदासिन्य, ‘या जन्मावर या जगण्यावर’ मधली जिंदादिली, ‘असेन मी नसेन मी’ मधली शाश्वतता, ‘सोबती’ चित्रपटतील ‘देवाघरच्या फुलातली’ असहय्यता, ‘डोळ्यांत सांजवेळी’ मधला समजूतदारपणा, ‘अखेरचे येतील माझ्या’ मधली फकिरी, ‘जपून चाल्‌ पोरी जपून चाल्‌’ मधलं लावण्य (पाडगांवकरांनी खास अरुणजींच्या विनंतीवरून त्यांच्यासाठी लिहिलेला हा ‘लावणा’).... हे सर्व अरुणजींनी आपल्यापर्यंत तितक्याच दृढतेने पोचवलं.

मराठी भावसंगीतावर त्यांनी उमटवलेला ठसा, इतका ठळक आणि खोल आहे की जणु ‘मराठी भावगीत’ आणि ‘अरुण दाते’ हे समानार्थी शब्द व्हावेत. मी हे धाडशी विधान करण्याचं कारणही तसंच आहे. त्याचं झालं असं, स्‍नेहासिस चॅटर्जी नावाचे माझे एक बंगाली मित्र आहेत. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्यावर त्यांनी खूप आभ्यास, लेखन केलं आहे. लताबाईंच्या मराठी गाण्यांसाठी त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. आमच्या अनेकवेळा चर्चा झाल्या. स्वाभाविकपणे दिदींच्या भावगीतांचा उल्लेख आला. तेव्हा स्‍नेहासिस म्हणाले होते.... "भावगीत तो वहीं होता हैं ना जो अरुण दातेजी गाते हैं।"

कवी सुधीर मोघे हे मला गुरुस्थानी. त्यांच्याकडे गेले की हा एक प्रश्न नेहमी चर्चेत असायचा. ‘गाणं नेमकं कोणाचं ? संगीतकाराचं की गायकाचं ?’ इथे ‘चर्चा’ किंवा ‘गप्पा’ म्हणणं खरं तर अवघड अशासाठी- की ते बोलायचे, खूप सांगायचे आणि मी ऐकायचे.
त्यांच्या मते गाणं- हे त्याच्या अंतीम टप्प्यात रसिकांचंच होतं. ते तसं व्हायलाच हवं. पण कवी आणि संगीतकार या दोघांच्या भुमिकांबद्द्लची तौलनिक मतं ते स्वत:च मांडायचे. कधी एकाच्या बाजूने पारडं जड तर कधी दुसर्‍याच्या. (खरं तर ते स्वत: कवी / गीतकार / संगीतकार. पण व्यक्तीश: त्यांच्यासाठी एकदा कविता कागदावर उतरली की ती तिच्या मार्गाने, तिच्या नशिबाने जाते आणि कवी त्याच्या.)

मी त्यांना एकदा म्हंटलेलं, ‘गायक’ हा त्या गाण्याचा प्रवक्ता किंवा चेहरा असतो. म्हणून जर गीताच्या शब्दरचनेविषयी किंवा चालीविषयी बोललं जात नसेल तर उरलेला पूर्णवेळ गाणं हे (लौकिक अर्थाने) गायकाचं असतं. याची पुष्टी म्हणून आज मला हे एक उदाहरण देता येईल. ‘संगदिल’ या हिंदी चित्रपटात ‘दिल में समा गयें सजन’ असं एक गाणं आहे. त्याच्या वजनावर, मराठीतल्या एका वेगळ्या छंदात, गंगाधर महाम्बरे यांनी एक गीत लिहिलं आणि त्याला हृदयनाथांनी चाल लावली. ‘संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा, चांद येई अंबरी..’ जेव्हा कधी या गाण्याच्या इतिसासात, खोलात जाण्याची वेळ येते तेव्हाच या तपशीलाचं महत्त्व. अन्यथा आपल्यासाठी ते फक्त अरुण दातेंचं गाणं असतं.
दाते साहेबांनी, त्यांनी गायलेल्या सर्व गाण्यांना असं सर्वाथाने आपलं करून घेतलं आहे.

जाताजाता अरुणजींच्या नावावर नसलेल्या तीन गाण्यांचा मला मुद्दामहून उल्लेख करायचा आहे. ’काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही’,’पाऊस कधीचा पडतो’ आणि ‘उष:क्काल होता होता’. ही गाणी अरुणजींच्याही आवाजात ऐकता येतात. त्या गाण्याचे प्रचलित गायक आणि अरुणजींसारख्या सिद्धहस्त गायकाने केलेला त्यांचा आविष्कार, हे दोन्ही पाठोपाठ ऐकण्याचा आनंद काही वेगळा आहे.

आणि त्यांच्या दोन युगुलगीतांच्या ध्वनीमुद्रीत स्वरुपाच्या शोधात मी बरेच वर्षे आहे. दोन्ही गीते शांताबाई शेळके यांची आहेत आणि सहगायिका आहेत कुंदा बोकिल. ‘हा मंद मंद वारा ही धुंद रातराणी, आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी’ आणि ‘जे सत्य मानले मी आभास तो ठरावा, दोघांतला कसा हा साहू अता दुरवा’. पूर्वी कधीतरी आकाशवाणीवर ऐकलेली ही गाणी. आज इतक्या वर्षांनी देखील त्यांचे शब्द नजरेसमोर आले तर स्वर मनात रुंजी घालू लागतात.

असा हा ‘जित्या गळ्याचा माणूस’. कविवर्य मंगेश पाडगांवकर उगीच त्याला गर्दीत आणि कोलाहलात शोधत होते. तो खरं तर त्यांना केव्हाच सापडला होता.. तो त्यांचीच गाणी गात गेली कित्येक वर्षे रसिकरंजन करतो आहे.

{ कोलाहलात सार्‍या माणूस शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी
..
काळ्या उभ्या तिजोऱ्या गाणे खरीदणाऱ्या
येथे जित्या गळ्याचा माणूस शोधतो मी
..
-मंगेश पाडगांवकर
}

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

'यमक'श्री गदिमा


"आनंद काव्य माझे, त्याच्या अनंत ओळी" असं सार्थ वर्णन गदिमांनी आपल्या काव्यरचनांचे केले आहे. 'आठवणीतली गाणी' या माझ्या संकेतस्थळावर आज मितीस उपलब्द्ध असलेल्या ३१४३ गाण्यांपैकी तब्बल ४३३ गाण्यांमधून हे आनंद काव्य स्‍त्रवत आहे- यावरून गदिमा-गीते आपल्या काव्यजाणिवेचा केवढा अवकाश व्यापतात हे ठळकपणे समोर येतं.

या 'अनंत ओळीं'चं रसग्रहण आत्तापर्यंत असंख्य वेळा झालं आहे आणि होत रहावं. प्रत्येक विश्‍लेषण एक वेगळा प्रकाशझोत या रचनांवर टाकतं आणि मूळ काव्य या विविधरंगी झोतांमध्ये अधिकच झळाळतं. गंगाधर महाम्‍बरे या व्यासंगी कवीने खूप अभ्यासपूर्ण आणि सखोल असा गदिमांच्या काव्यप्रतिभेचा आस्वाद रसिकांना पुस्तक स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. हे सगळं वाचल्यामुळे असेल कदाचित, नव्हे म्हणूनच, गदिमांची एखादी वेगळी खुबी नजरेस आली की त्यात बुडी मारण्याचा मोह अनावर होतो.

आज मी मला भावलेली गदिमांची 'यमक' हाताळणी, यावर काही म्हणावं असा विचार करते आहे. बघू कसं जमतंय ते..

व्याकरणाच्या दृष्टीने विचार केला तर 'यमक' हा एक शब्दालंकार आहे.. कवितेचं सौंदर्य वाढवण्याचं ते एक तंत्र आहे. पण गदिमा आपल्या प्रतिभेचा त्यावर मंत्र टाकतात. मग ती नुसती 'र' ला 'र' जोडण्याची यांत्रिकता किंवा अट्टहास राहत नाही तर ती अगदी सहज आणि ओघाने येणारी शब्दरचना होते. कधीकधी त्यात झालेली जुळणी आश्चर्याचा आणि आनंदाचा अनुभव एकाच वेळेस देते.
गीतकाराच्या अशा ज्या काही मर्यादा असतात.... कथेतील कुठला प्रसंग आहे, गाणारी व्यक्तीरेखा कशी आहे, या गीताने कथेच्या प्रवाहाचे कुठले वळण अपेक्षित आहे... गदिमांची सर्जशीलता या बंधनांना पार ओलांडून जाते.

याची उदाहरणे शोधताना 'गीतरामायण' जाणीवपूर्वक बाजूला ठेवू. कारण तो एक वेगळा विषय आहे. ('गीतरामायण- गदिमा आणि शेक्‍सपिअर' असं पूर्वी एकदा मी लिहिलं आहे.)
तसंच अगदी नेहमीचं 'त्या तिथे, पलीकडे... झाड एक वाकडे' किंवा 'घननिळा लडिवाळा' सारखं अनेक वेळा उद्‌धृत झालेलं पण बाजूला ठेवूया.
चला, काहीतरी वेगळं, त्यांच्या नेहमीच्या शे-सव्वाशे गाण्यांच्या पलीकडचं शोधू...

गदिमांनी यमक साधण्यासाठी केलेल्या शब्दांचा वापर आणि / किंवा ते ज्या पद्धतीने यमकावर land होतात (जसं पट्टीच्या गायकाने आधी लयीला हूल द्यावी मग नेमक्या समेवर उतरावं, तसं), दोन्हीही खूपच आकर्षक आहे. दोन्हीही बघू...

'प्रीत शिकवा मला' या चित्रपटात एक गाणं आहे. ती जी कुणी हे गाते तिला तिचं सगळं.. दिसणं, वागणं.. सगळंच, तिच्या प्रियकराच्या मनासरखं करायचं आहे. या एकाच विचाराने तिचं विश्व व्यापलं आहे. मग गदिमा लिहितात,
आवडसी तू, एक ध्यास तुझा घेतला
आवडतो तुजसी तसा वेष गडे घातला..
.. या गीतात 'ओतला' हा तसा साधा शब्द पण कसा येतो ते पहा..
आवडीच्या मुशीत तुझ्या मी स्वभाव ओतला..

'बैल' आणि 'सैल' हा तसा सरधोपट यमक पण जेव्हा तो 'सांगत्ये ऐका'तल्या 'झाली भली पहाट'मध्ये असा समोर येतो, तेव्हा केवळ दोन ओळीत गदिमांचा काव्यहंस आपल्यासमोर 'नादचित्र' रेखाटतो -
अंगे झिंझाडून सैल
उभे ठाकले रे बैल

याच चित्रपटात एक लावणी आहे. त्यात लावणीची अदा करणारीने साडी नेसली नाही तर अंगरखा घातला आहे. नेहमी साडी नेसणार्‍या स्‍त्रीने जर असा वेगळा वेष परिधान केला तर ती कशी अस्वस्थ होत याचे बारीक निरिक्षण करत गदिमा म्हणतात-
नसत्या पदराकडे धावतो हात गडे सारखा
दिलवरा दिल माझे ओळखा !

मापणे (मोजणे) या शब्दात जरा बदल करत, त्यावर कोकणी भाषेचे किंचित संस्कार गदिमा करतात आणि 'तिच्या घोवाला कोकण दाखव’ताना म्हणतात-
गोमू माहेरला जाते हो नाखवा
.. उंची माडांची जवळून मापवा

'झाली ग बरसात, फुलांची..' या गाण्यातली 'ती' खूप सुखात - आनंदात आहे. त्यामुळे तिला सर्वत्र सुगंधाने भारलेला वाटतो आहे. याचं वर्णन करताना ती म्हणते-
तळहातीच्या भाकित रेखा
जित्या जुईच्या झाल्या शाखा

वाम आणि डावा- असे दोन समानार्थी शब्द वापरत आणि ’व’चा अनुप्रास साधत, बन्सीधर कृष्णाचं चित्र गदिमा एखाद्या सिद्धहस्त चित्रकाराच्या शैलीत दोन स्ट्रोक्‍स मध्ये चितारतात -
वाम बाहुवर कपोल डावा
अधरि आडवा धरितो पावा
.. गोकुळीचा राजा माझा

होडीत एक गर्भार नार बसली आहे. त्यामुळे होडी कशी चालव हे नावाड्याला सांगताना तिच्या मैत्रिणी म्हणतात-
बेतात राहू दे नावेचा वेग
चालु दे नाव जसा श्रावण मेघ
.. निळा समिंदर निळीच नौका..

गदिमांनी गेयतेच्या परिमाणात न बसणार्‍या अनेक शब्दांचा वापर त्यांच्या गाण्यांमध्ये केला आहे. जसे,
सोलीव, सचिव, शाकारणी, हल्लरू, ओंडका, पानकळ्याची, कंगवा, अवेदा, आपसुख, पलटण, तोंडात बोटे घालणे, कोल्हाळ, अकिंचन, अप्पलपोट्या, पाणंद, वासक.. आणि चक्क यातील काही यमकाचे कार्य साधतात.

सचिव म्हणजे सेक्रेटरी. एका अतिशय निरागस युगुलगीतात -
डोळ्यापुढे दिसे गे मज चित्र ते सजीव
माझ्या घरातली तू गृहिणी, सखी, सचिव
.. याच गाण्यात 'सोलीव' शब्द पण फार चपखल बसला आहे.

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
.. केसावरती लहर उठविली फिरवुन हळू कंगवा
इथे 'कंगवा' शब्द आपल्या भोवतीचा किळसवाणा गुंतवळा झटकतो आणि गोड वाटायला लागतो. सुलोचनाबाई चव्हाण गाताना त्यात आणखी माधुर्य आणतात.

ती एक खूप छोटी मुलगी आहे. परीकथांचं तिचं विश्व आहे. तिच्या दादाची बायको कशी असावी, असं ती स्वप्‍नरंजन करते आहे. वहिनी स्वप्‍नातलीच असल्याने तिचं सगळंच दैवी आहे. वहिनी गोरीपान आहे, तिची गाडी हरणांची आहे, तिची अंधारासारखी काळीभोर साडी आहे.. त्या साडीवर चांदण्या चिकटवल्या आहेत आणि त्या साडीचा पदर.. चमचमणार्‍या बिजलीसारखा झळाळता...
चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण..
दादा, मला एक वहिनी आण
गोरी गोरीपान, फुलासारखी छान..
इथे 'वाण' हा शब्द 'वर्ण' या अर्थाने येतो. (पी. सावळारामांनी पण तो या अर्थाने एका गाण्यात वापरला आहे. 'गव्हाळी वाणाचा तो हसरा मुखडा... प्रीत माझी पाण्याला जाते..')

पु. ल. देशपांडेंनी एकदा म्हंटलं होतं-
"अणिमा, महिमा, गरिमा.... सारखीच 'गदिमा' ही एक सिद्धी आहे. तिला परकाया प्रवेश करता येतो."
त्यामुळेच गदिमांना नेमक्या शब्दांत नेमके भाव व्यक्त करता येत असावेत.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Territorial war


पुण्यातलं आमचं घर नदीच्याकाठी आहे.
नदी, पलीकडचा घाट.. अगदी थेट ‘पैल घंटा घुमे राउळी’ सारखा.. छान मोकळी जागा.... आणि त्यामुळे भरपूर पक्षी.
पाच वर्षांपूर्वी तिथे राहायला गेल्यावरच्या पहिल्या पावसाळ्यात खिडकीच्या गजांवर ओले पक्षी येऊन बसले आणि मी घरातल्या प्रत्येकाला बोलावून बालकवी वर्णन करतात ते ‘फडफड करुनी भिजले अपुले पंख पांखरें सांवरिती’ कसं असतं, ते उत्फुल्ल मनाने दाखवलं.

पण थोड्याच दिवसात त्या गजांवर गळलेली पिसं, त्या पक्ष्यांची शी, शू, वळचणीला घरटी, ती बांधण्यासाठी त्यांनी शोधून शोधून आणलेल्या काड्या, जुन्या वायरींचे तुकडे.. मग पिलांची अंडी, त्यातून पिल्लं बाहेर पडताना सुटलेला वास, अंड्याची टरफलं…. असं सुरू झालं आणि माझ्या पक्षीप्रेमाचा पार धुव्वा उडाला.
ती ‘बगळ्यांची माळ’ अंबरातच उडत आहे आणि ते ‘द्विजगण अवघे वृक्षीं’च आहेत, तोपर्यंतच ठीक. आता पारव्याचं घुमणं माझ्या छातीत एक वेगळीच धडधड वाढवतं.. आल्या का या कबुतरीणबाई बाळंतपणाला !!
उलटपक्षी माझं असं स्पष्ट मत झालं आहे- कुठल्याही कवीला, एका कबुतरणीचं एक जरी बाळंतपण निस्तरायची वेळ आली तर ते ‘कबूतर जा जा..’ फार वेगळ्या अर्थाने म्हणतील.

गेल्या माझ्या मुक्कमात मी एका कबुतरीणबाईंशी full on.. territorial war लढले.. त्याची ही कहाणी.

तिची territory कुठली? याचं किंचित वर्णन करायला लागेल. एका गच्चीला POPचं छत घालून त्याखाली एक छानसं जेवणाचं टेबल ठेवलं आहे. POP वर पाणी पडू नये म्हणून त्यावर जाड प्लॅस्टीकचं शीट आहे. POPचं छत आणि plastic-sheet, यात साधारण पाच इंचाची जागा आहे आणि नेमक्या याच जागेत एका कपोत युग्माने गेले दोन-तीन वर्षे मुक्काम ठोकलेला.

आम्ही या घरी काही कायमचे राहात नाही. वर्षाकाठी जेव्हा केव्हा मी इथे येते, तेव्हा बराच वेळ त्यांना आवर घालणं, हा एक मोठा उद्योग असतो. महिनाभरात परत गेले की पुन्हा त्यांचंच राज्य. पण इतक्या कमी उंचीच्या जागेतील त्यांच्या उच्छादाने काही इतर प्रश्‍न निर्माण झाले आणि यावेळेस त्यांना विस्थापित करणे, हा मुद्दा ऐरणीवर आणावा लागला.

एकदा वरती चढून तिथे काय परिस्थिती आहे ते पहावं तरी, म्हणून एक शिडी घेतली. त्यावर चढले. मग एक पाय शिडीवर, एक जवळच्या गजांवर, एका हाताने ड्रेनेजचा पाईप पकडून... असं सगळं करत जेमेतेम नजर पोचेल इतकी उंची गाठली. पाहते तर काय.. चांगली मोठ्ठी झालेली दोन पिल्लं माझ्यापासून आठ इंचांवर. त्यांच्या डोळ्यातले भाव पाहून मी ‘क्राइम पेट्रोल’ मधली मुलं पळवून नेणारी बाई आहे की काय, असं वाटलं. ते मला घाबरले- तितकंच मी त्यांना घाबरून खाली उतरले. आता ती उडून जाईपर्यंत थांबणं आलं.. तीन-चार दिवसांनी ती उडून गेली.
चला.... हीच ती वेळ, हाच तो क्षण.......

आमची कामवाली बाई रेखा म्हणाली, कबूतरं काळ्या रंगाला घाबरतात. तू तिथं एक काळं कापड बांध. मग एक जुनी काळी साडी शोधली.. तिचे तीन चार तुकडे केले.. वेगेवेगळ्या उंचीच्या काठ्यांना ते बांधले आणि निषेधाचं, बंडांचं पहिलं काळं निशाण रोवलं.

माझं असं म्हणणं होतं... प्लॅस्टीक शीटवरचं सगळं आभाळ तिचं- कबुतरणीचं..... आणि पीओपी छताखालचं घर माझं...
मधली पाच इंचांची जागा no man’s land तर होतीच, तशीच ती no bird’s land ही असायला हवी. पण कबुतरीणबाईंना ते साफ अमान्य होतं. ’कसेल त्याची जमीन, राहिल त्याचं घर’ हा कुळ-कायदा माझ्यापुढे फडकवत, तिथं दोन वर्षे मुक्काम असल्याचा हक्क सांगितला. मी रोवलेल्या निषेधाच्या निषाणांची पायमल्ली केली. आपल्या पंखांनी सगळे झेंडे उधळले व जागेवरचा ताबा सोडायला स्पष्ट नकार दिला.

पुढील घरगुती उपाय म्हणून तिथे डांबराच्या गोळ्या टाकल्या, हीट मारलं, जे म्हणून काही उग्र वासाचं सापडलं त्यांचा वर चढून मारा केला. पण छे ! ह्या बयेचं माझ्या डोक्यावर नाचणं, शब्दश: आणि लाक्षणिक, दोन्ही अर्थाने थांबेचना मेलं. तिच्या पावलांचा आवाज ऐकला रे ऐकला की मी हाताशी ठेवलेली काठी घेऊन पळायचं आणि खालून टकटक करून तिला हाकलायचं..
पण कृतनिश्वयी सौ. कबूतर, श्रीमद्‌ भगवद्‌ गीतेच्या ३र्‍या अध्यायाची- कर्मयोगाची- जन्मल्यापासून रोज पारायणे करत असल्यासारख्या ध्येय आणि कर्म दोन्ही सोडायला तयार नव्हत्या.
नानाच्या (पाटेकर) मते ‘एक मच्छर...’ तुमची वाट लावतो इथे तर हे एक अख्खं कबूतर होतं.

हे काही खरं नाही. आता आपण Google नावाच्या Oracle कडे हा प्रश्‍न घेऊन जावा. त्याच्याकडे सर्व उत्तरं असतात..
त्याने दोन उपाय सुचवले. एक म्हणजे फळीला खिळे ठोकायचे आणि ती उलटी करून कबूतरं बसतात त्या ठिकाणी ठेवायची. छे छे !! हे असलं अघोरी काम होणं नाय... दुसरं म्हणजे CDs उलट्या ठेवायच्या. चमकणारा भाग वरच्या दिशेने. त्यात कबुतरांना त्यांचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं की ते घाबरतात... इति गूगल.

भराभरा घरात सापडलेल्या जुन्या CDs घेतल्या. त्यांची वेगवेगळे कोन करून रचना केली. त्या पडू नये म्हणून फेविकॉलचा ठिपका देऊन चिकटवल्या. वरची वळचणीची जागा आणि त्या भोवतीची भाग, महाराणी पद्मिनीच्या आरसे महालाला लाजवेल असा करून मी आणि रेखा वाट पाहू लागलो. एक दिवस शांतता. दुसर्‍या दिवशी सकाळपासून ही शंभी महाराणीच्याच तोर्‍यात त्या विवक्षित जागेत प्रवेश करती झाली.

मग मात्र मी अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष महामहीम श्री. ट्रंप यांच्याकडून प्रेरणा घेतली. एका POPचं काम करणार्‍या माणसाला बोलावलं. त्याने काही तास काम करून एक भिंत बांधून अनधिकृत घुसखोरीचा मार्ग कायमचा बंद केला.
कबुतरीणबाईंनी दोन दिवस माझ्याकडे खूप रागाने बघितलं. मान गरागरा फिरवली. वेगवेगळे भीतीदायक आवाज काढले.. त्या भिंतीवर चार-पाच धडकाही देऊन पाहिल्या.
एकीकडे मी मात्र दुबईला परतण्याच्या तयारीला लागले.

विमानतळाकडे निघताना शेवटचं, सगळं नीट बंद केलंय नं, असं तपासत फिरत होते तो काय.. दुसर्‍या गच्चीतल्या inverter वर बसून ही गंगी शांतपणे सर्वेक्षण करत होती.

टॅक्सीत बसल्याबसल्या कबुतरीणबाईंऐवजी मीच श्री. ट्रंप यांना tweet केलं.... "भिंत बांधून अनधिकृत घुसखोरी थांबवता येत नाही. पुरावा आहे."
... आणि पुढच्यावेळचं theatre of war काय असेल याचा विचार करू लागले.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

ग्रेस


एक विहीर असावी. अंधारी.
वास्तवाच्या परिघाच्या किंचित बाहेर.. किंवा कदाचित आतही, नक्की ठरवता येत नसावं.
तिच्या भोवतीचं सगळंच अगम्य, दुर्बोध. तिच्या दिशेने पाऊल टाकलं की अंगावर शहार्‍याचे कोंब फुटावेत.

मी दोन-तीन पाउले टाकते.. आणि मागे फिरते.
पण विहीर परतू देत नाही.
आत डोकावून पाहणं झेपेल? नको. शक्यतो कडेकडेनेच जावं.
तिच्याबद्दलच्या आकर्षणाने एव्हाना कुतुहल, उत्सुकतेच्या मर्यादा पार केलेल्या असतात.
विहीरही तिचा अदृश्य पगडा घट्ट.. आणखी घट्ट करते.

सर्वत्र ओला, गूढ-काळा वास. त्या वलयात मी गुरफटायला लागते. वाट अधिकच निसरडी होते.
शेवाळलेला फुटका दगडी कठडा. कालातीत असल्यासारखा. कशीबशी त्याला रेलते. त्याच्या आधाराने डोळे गच्च मिटून आत डोकावते.
ऐकू येते ती घुमणारी शांतता. डोळे उघडावे की नाही? काय असेल..आणि आपल्याला काय दिसेल?
पाणी खोल असेल? की तिला तळच नसेल? आणि असलाच तळ तर तळाशी....
असतील कदाचित काही नि:श्वास.. उमेदी सुद्धा.

आता हळूहळू डोळे उघडायचे..
उडी मारणं, डुंबणं, तळ गाठणं वगैरे...
कुणास ठाऊक..

हे नातं आहे, कवि ग्रेस यांच्या कवितांचं आणि माझं..

'गांव'
आभाळ जिथें घन गर्जे
तें गांव मनाशीं निजलें;
अंधार भिजे धारांनी
घर एक शीवेवर पडलें..

अन्‌ पाणवठ्याच्या पाशीं
खचलेला एकट वाडा;
मोकाट कुणाचा तेथें
कधि हिंडत असतो घोडा..

झाडांतुन दाट वडाच्या
कावळा कधींतरि उडतो;
पारावर पडला साधू
हलकेच कुशीवर वळतो..

गावांतिल लोक शहाणे
कौलांवर जीव पसरती;
पाऊस परतण्याआधीं
क्षितिजेंच धुळींने मळती....

-ग्रेस


( फोटो सौजन्य- आंतरजाल )

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

पाऊस


तो तसा सर्द-चिंब पावसाळा, ते वय आणि ते शहर मागे टाकल्यानंतर कधीच भेटला नाही.

आईचं घर, लहानपण, ’अद्वैत’ नावाची ती नावाला जागणारी कॉलनी, त्या कॉलनीत असलेलं आमच्या घराचं विशिष्ट असं भौगोलिक स्थान, नाशिक .... आणि कोसळून-कोसळून चराचरांत मुरलेला बेबंद पाऊस.. ह्या सगळ्यांचे जमून आलेलं ते रसायन होतं.

आता घर असलं तरी आई नाही. मनात मूलपण जपलं असलं तरी वय लहान नाही. नाशिकला देखील ’तसा’ पाऊस पडतो, असं वाटत नाही....पण अंदाजे साडेतीन दशकांपूर्वीच्या पावसाळ्यांनी सोडलेल्या त्या पाऊसखुणा, पुसट काही झाल्या नाहीत. आजच्या पावसाने काही मागे ठेवलंय का? हे भिंग घेऊन शोधत फिरताना उलट त्या अधिकच ठळक होतात.

माझ्या जन्माच्या सुमारास बांधलेलं आमचं घर काही जंगलात नव्हतं. शहराच्या मध्यवर्ती भागातल्या कॉलनीतच... पण तिच्या सगळ्यात आतल्या टोकाला होतं. कॅनडा कॉर्नरहून आत शिरलं की एक डावं-एक उजवं-एक डावं अशी वळणं घेत तिथं पोचायचं... सगळी वर्दळ, गजबज मागे पडलेली असायची.

घराच्या मागच्या दोन बाजुंना लांबच्या लांब पसरलेली काळीभोर शेत जमीन. हे शेत पायी ओलांडायचं म्हंटलं तर तब्बल पंधरा मिनिटे लागायची... घराच्या मागे पडकी विहीर... उंचच्या उंच गवत... हे सगळं पार करून पुढे गेलं की पुन्हा घरं, दुकानं, गिरणीवाल्या बाईंची पीठाची गिरणी, इस्‍त्रीवाला, सायकलवाला, शाळा, कॉलेज असं सगळं....
जसं काही शहराने वाढतावाढता दम लागून एक श्वास घेण्यासाठी थांबलं असावं, तसं...

या सगळ्यामुळे पहिला पाऊस, मातीचा वास, वळीव.. हे काही फक्त कवितेत भेटलं नाही. गरमागरम तापलेली काळ्याभोर मातीची ढेकळं. त्यावर आकाशातून पडलेला पाण्याचा थेंब.. वाफाळलेला सुगंध... अशा वातावरणात आम्हा भावंडांवर पावसात भिजण्यावर नाही, तर न भिजण्यावर बंदी होती.

’ये ग ये ग सरी, माझे मडके भरी’ अशी सुरुवात केलेला पाऊस, पुढच्या चार महिन्यात आपली वेगवेगळी रुपे दाखवत ’पाऊस कधीचा पडतो...’ असा प्रवास करायचा. मातीच्या ढेकळांचा हळूहळू गच्च चिखल व्हायचा. त्यावरही संततधार पडत राहिली की सगळीकडे पाणीच पाणी.. शेतातलं पाणी कंपाउंडच्या भिंतीवरून बागेत यायचं. घराची तिसरी पायरी बुडली की रेनकोट घालून, कुदळ-फावडे घेऊन बाहेर शेतात जायचे. मधेमधे छेद देऊन पाणी मोकळे करायचे. त्या मोकळ्या झालेल्या, खळाळत धावणार्‍या पाण्याचा आवाज.... त्या पाण्याबरोबर वाहत येऊन पोटर्‍यांना अडलेले लव्हाळे... आणि ई.. शी.. करत त्याला भराभरा बाजूला काढणं.....

दहा-दहा दिवस, उभ्या सरळ रेषेत पडणार्‍या पावसाबरोबर अनेक पाहुणेमंडळी घरी यायची. शेतातली त्यांची घरं पाण्यात पार बुडून गेलेली असायची. चिक्कट आणि फिक्कट गुलाबी रंगाचं गांडूळ फारसं कुणालाच आवडायचं नाही. रात्रभर प्रेमसंवाद करणारे श्रीयुत आणि श्रीमती बेडुक... शेतात पाणी जितकं खोल, गच्च आणि जुनं, तितका या बेडकांचा अंदाज रुमानी.... आम्ही मुलं तर त्यांच्या ’डराव’च्या स्टाईल वरून त्यांना नावं द्यायचो आणि कोण कोणाच्या मागे लागलंय... कोणाचं कोणाशी जमलंय याचा अंदाज लावायचो.
काडी लावली की गोल वेटोळे करून बसणारा लाल-तपकिरी रंगाचा आणि शंभर पायांचा पैसा... मखमली लाल रंगाचा, तूतीची पानं खाऊन वाढणारा किडा. रिकाम्या काड्यापेटीला भोकं पाडून, त्यात खाली गवत अंथरून त्यावर याला ठेवायचं. तीव्र-उंच-चिरक्या आवाजांचे रातकिडे... पण हे सगळे तसे निरुपद्रवी.

काही भीतीदायक पाहुण्यांचे स्वागत मात्र व्हायचे नाही. आताच्या निसर्गमित्रांना हे फारसे आवडणार नाही. पण कॉलनीतल्या छोट्या मुलांची संख्या बघता हे स्वाभाविकच होते. विंचू दिसला की चपलेने मारलाच जायचा. ४-५ फुट लांबीची सापाने टाकलेली कात बागेत सहज मिळायची. ती दिसायची सुंदर पण तिची भीती वाटायची. एकदा बागेतल्या कारंजाच्या नळाच्या खोबणीत पाय सोडून बसलेल्या भावाच्या पायाला लागूनच एक पिवळा जर्द साप गोल करून बसलेला होता. अशा प्रसंगांना घाबरूनच साप-नाग-धामण-मण्यार दिसले की जोरात ओरडायचे. मग शेजारचे सगळे काका-दादा काठ्यालाठ्या घेऊन धावत यायचे. मारल्या गेलेल्या नागदेवतेने त्रास देऊ नये म्हणून रीतसर पूजा करून, दुधाचा नैवेद्य दाखवून त्याला अग्‍नी दिला जायचा. अनेकवेळा या साप-नागांची बोटभर लांबीची पिल्लं घरात सापडायची. ती पिटुकली पिल्लं सुद्धा काय सुंदर फणा काढायची !

एकदा एक गंमत झाली. तुडुंब पावसाळा आणि शेतात भरलेलं गुडघाभर पाणी.... मध्यरात्री झाली की कुणी स्‍त्री कण्हल्यासारखा आवाज यायचा. १०-१२ दिवस भरपूर पाऊस झालेला होता. त्यामुळे आधी वर्णन केलेले अनेक निर्वासित प्राणीमात्र बाहेर पाण्यावर तरंगत फिरत होते. रात्रीच्या मध्य प्रहरी बाहेर जायची कोणाचीच हिमंत होईना. चार दिवसांनी बाबा बॅटरी घेऊन गेलेच. तेव्हा लक्षात आलं कंपाउंडचा खिळखिळा झालेला एक खांब आणि त्याला बांधलेली काटेरी तार, वारं एका विशिष्ट दिशेने आले की एकमेकांना घासले जात होते आणि त्याचा तो आवाज होता.

घरची बाग या काळात फळा-फुलांनी भरून गेलेली असायची. काय नव्हतं तिथं? मोगरा, जाई-जुई-सायली, पाच रंगाच्या जास्वंदी, हिरव्या रंगाची अबोली, गुलाब (आणि त्यावर कलम करायला येणारे म्हातारे काका), द्राक्षाचे वेल, ऑगस्ट मध्ये पिकणारा हापूस, मलगोवा-पायरी अंबा, गुलमोहर, चिकू, पेरू, लिंबू, नारळ, मघई पान .....

आईचं घर आणि पाऊस यांचा आणखी एक ऋणानुबंध आहे.
ती गेली तेव्हाही आभाळ गच्च भरलेलं होतं आणि पाऊस खरोखरीच रिमझिम निनादत होता... आसमंत जसा दु:खाच्या मंद स्वराने भारलेला !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कान तुटका


तसे घरात पाणी पिण्यासाठी काचेचे अनेक ग्लास होते. एकसारखे, संचातले. पण त्यामुळे फार गोंधळ उडायचा. कुणाचा कुठला? हा प्रश्न सतत चर्चेत राहायचा. त्यावर एक साधा-सरळ उपाय म्हणजे ग्लास विसळून ठेवणे. त्याने एका नवीन वादाला तोंड फुटायचे. विसळण्याची जबाबदारी कुणाची? खरं तर पाणी पिऊन झाल्यावर प्रत्येकाने विसळून ठेवायला हवा, पण..... तसे झाले नसेल तर ? ..... confusion, अविश्वास....
साधारण चार साडेचार वर्षांपूर्वी यावर मी एक उपाय सुचवला. घरातील प्रत्येकाने आपल्या व्यक्तीमत्त्वाला साजेसे असे दर डोई तीन mugs आणायचे. त्यांचा वापर पाणी-चहा-कॉफी अशा सामान्य, दैनंदिन आणि वैयक्तिक पेयपानासाठी करायचा. अर्थातच त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी ज्याच्या-त्याच्या डोक्यावर.
तसे मी जाऊन सगळ्यांसाठी विकत आणू शकले असते... "ह्या रंगाचे हे तुझे तीन", वगैरे. पण आपल्या 'व्यक्तिमत्त्वाला साजेसे' असा एक catch टाकून 'mugs' हा प्रश्न मी अस्मितेचा आणि तत्त्वाचा केला आणि गुपचूप त्या जबाबदारीतून सुटका मिळवली.

नवर्‍याने एका दिवसात एकसारखे आणि संपूर्णत: काळ्या रंगाचे mugs आणले आणि 'Black is beautiful, simple.' असं म्हणत फार मूलभूत निवड केल्याचा आव आणला.
लेकाने बाजारात mugs या प्रकारात जितके म्हणून चित्र-विचित्र रंग-आकार शोधता येतील तेवढे शोधले, त्यासाठी तब्बल तीन आठवडे घेतले आणि तीन भन्नाट mugs माझ्यासमोर आणून ठेवले.
मी मात्र फार विचार केला नाही. कारण 'व्यक्तीमत्व' वगैरे gimmick, हे निव्वळ माझ्या कमी काम करण्याच्या सोयीचे, म्हणून होते. मध्यम मार्ग स्वीकारत त्या दोघांच्याही निवडकक्षेत नसतील असे, पण जरा बरे वाटणारे, जवळच्याच सुपर मार्केटमधून उचलले.

आणल्याच्या तीसर्‍याच दिवशी माझ्या एका mugला छोटासा अपघात झाला आणि त्याचा कान तुटला. "टाकून दे ग, कशाला ठेवतेस ?" दोघांचं टुमणं. इतक्या लगेच, केवळ कान तुटला म्हणून, त्याला कचर्‍याची टोपली दाखवणे मला संपूर्णत: अमान्य होते. कारण बाकी त्यावर ओरखडासुद्धा नव्हता.

जशी मी त्याला वापरत राहिले तसे त्याचे 'कान तुटका' हे संबोधन प्रचलित होत गेले. मी ते फारसे मनावर घेतले नाही, त्याने घेण्याचा प्रश्नच नव्हता.
असे काही महिने गेले. मग वाटले, त्याच्या तुटक्या कानाचे कंगोरे फारच बेढब दिसतात. मग एक छानशी कानस आणली. stone grinding करतात तसे पाणी वापरून, कानसने घासतघासत ते कंगोरे नाहीसे केले.
या घटनेला चारहून अधिक वर्षे झाली. त्याच्याबरोबर आणलेल्या आठ जणांनी एकेक करून आमची साथ सोडली. 'कान तुटका' मात्र आहे तस्साच आहे.

दरम्यान 'तुटका कान' हे त्याचे व्यंग न राहता ती त्याची identity झाली आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

विलक्षण ’पु.ल. क्षण' : काळजी


सुरभी नीमाची सून आणि नीमा जुनी मैत्रीण, असं सांगितलं तर वाटतं..... तितका काही हा 'बादरायणी' संबंध नव्हता.
त्यामुळे नवीन लग्‍न करून सुरभी दुबईला रहायला आली, तेव्हापासून ती, मला माझीच जबाबदारी वाटत होती. तसं नीमाला मी म्हंटलं देखील.. "नको ग काळजी करूस. तू आणि मी काही वेगळ्या नाही. मी बघते त्या दोघांचं अडलं-नडलं."

आणि असे अडल्या-नडल्याचे प्रसंग आलेही चिक्कार. नवीन संसार, नवा देश, नव्या नोकर्‍या...
नवी नवरी ते पहिल्यांदा येणारे आईपण असा सुरभीचा दोन वर्षांचा प्रवास मी नुसता काठावर बसून नाही बघितला. अनेकवेळा धावून गेले. प्रसंगानुरूप कधी घरीही घेऊन आले. कधी एखादी रेसिपी, इतकं साधं तर कधी पाच महिन्यांची गरोदर असताना गेलेला तोल, इतकं कठीण. काही महिन्यांपूर्वी सुरभी तिच्या बाळंतपणासाठी माहेरी गेली.

जानेवारीत भारतात गेले तेव्हा सुरभीला-बाळाला भेटावसं वाटलं म्हणून नीमाकडून तिच्या आईचा फोन नंबर घेतला, दिवस-वेळ ठरवली...
सुरभीच्या आईने दार उघडले. त्यांच्या छोटेखानी, दुमजली बंगल्याच्या वरच्या मजल्यावर ती दोघं आहेत आणि लवकरच खाली येतील, बसा.. असं म्हणाल्या.

दरम्यान आम्ही बेल वाजवल्यापासून दोन्ही मजल्यांच्या मधल्या जिन्यात बांधलेलं त्यांचं ’पाळीव’ श्वान, त्याच्या असलेल्या किंवा नसलेल्या बेंबीच्या देठापासून ओरडत होतं... म्हणून त्या बाईंनी aplomb bearing घेऊन ’मॅक्स’ला शांत करायला सुरुवात केली. तेवढ्यात फोन वाजला.

त्या प्रचंड गोंधळात फोनवरचं, एका बाजूचं जे संभाषण ऐकू आलं ते असं.. "हो आलेत... नाही, तो ठीक आहे. खायला दिलंय आधीच... नको.. बाहेर नको.. बाहेर ऊन आहे." वगैरे.

फोन बंद झाल्यावर त्या वळल्या आणि म्हणाल्या, "ह्यांचा ऑफिसमधून फोन होता. तुम्ही येणार माहित होतं नं, म्हणून चौकशी करत होते.... तशी यांना मॅक्सची खूपच काळजी असते.............!!!"

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

’पेट’ स्‍नो


समोरच्या फ्लॅटमध्ये जेमिमा राहते. गेली काही दिवस ती, तिच्या गावी इंग्लंडला सुट्टीसाठी गेली होती. त्यामुळे तिचा अडीच वर्षांचा मुलगा जेम्स आणि त्याने पाळलेली कुत्र्याची दोन पिल्लं, यांचा दंगा नव्हता आणि ती शांतता आम्हाला आवडत नव्हती.
काल रात्रीपासून परत कल्ला सुरू झालेला. आली असावी. तिच्याशी थोडं बोलावं म्हणून दार उघडलं.

"कशी गेली सुट्टी ?"
"मस्त. छान बर्फ होता ह्यावेळेस. आणि जेम्सने पहिल्यांदाच बर्फ बघितला."
"मग ? आवडला का त्याला.. white winter ?"
"खूपच. पण त्यामुळे आमच्यावर एक प्रसंग ओढवलेला.
जेम्सला नं बर्फ ...... 'pet' म्हणून पाळायचा होता."

"अरे बापरे! तू कसं सांगितलंस त्याला.... हे शक्य नाही म्हणून."

"नाही नाही. मी तसं का करू?
उलट तो आणि मी, आम्ही दोघं रोज बाहेर जायचो. थोडा बर्फ गोळा करून आणायचो आणि घरात वेगवेगळ्या जागी ठेवायचो."

माझी उत्सुकता शिगेला.
"कधी त्याच्यासाठी एखादी बास्केट तयार करून तिच्यात किंवा टॉवेलची गादी करून त्यावर....
पण कुठेही ठेवलं तरी बर्फच तो, वितळून जायचा.
मग जेम्सला कळलं. बर्फाला घरात आणलं की त्याला खूप रडू येतं.
इतकं.. की तो संपून जातो.
सात-आठ दिवसांनी हा प्रकार बंद झाला.

आता जेम्सला स्वत:ला कधीही रडू आलं की एक-दोन मिनिटातच सावरतो आणि म्हणतो,
I won't cry so much. Otherwise, I will be over too."

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें


संत तुकारामांचा अभंग आहे, ’वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें’

अलीकडे पर्यावरण हा विषय निघाला की या ओळीचा वापर हमखास होतो.
रस्त्याच्या कडेने पाट्या असतात, ’झाडे लावा झाडे वाचवा’ आणि लगेच ’वृक्षवल्ली आम्हां ..’

पण या रचनेचा विषय ’पर्यावरण’ हा नाही.

या अभंगाचा गाभा काही वेगळाच आहे .. जो त्याच्या शेवटच्या दोन ओळींमधे व्यक्त होतो.
त्या अशा आहेत .............

तुका म्हणे होय, मनासी संवाद
आपुलाचि वाद आपणांसी

तुकोबा जेंव्हा विजनवासात .. एकांतात असतात .. तेंव्हा काय होतं ?

सभोवतीची झाडं-वेली-प्राणीमात्र त्यांना सगे-सोयरे वाटायला लागतात. आकाश डोईचे छप्पर होते आणि पृथ्वी बसायचे आसन.. जाडीभरडी वस्त्रे आणि एक कमंडलु एवढेच काय ते, देहाचे म्हणून जे उपचार त्यासाठी पुरेसे होते. अशा वातावरणात कुठलेही अमंगळ भाव तुकोबांच्या मनात येत नाहीत.....

सगळ्यात महत्वाचे म्हणजे या minimalistic वातावरणात तुकोबा म्हणतात, माझा.. माझ्याशी उहापोह चालू होतो.

वाद-संवाद जेव्हां दुसर्‍याशी होतो तेंव्हा त्यात चढाओढ, ईर्ष्या येते ... पण इथे मंडनही आपलंच आणि खंडनही आपलंच.

आपुलाचि वाद आपणांसी ... म्हणजे, स्वत:शी भांडण उभे करणे नव्हे ......
तर एक विषय घेतला की त्याची सर्वांगीण चर्चा .. आपणच आपल्याशी करायची.

तुका म्हणे होय...... मनासी संवाद !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

झिणिझिणि वाजे बीन


झिणिझिणि वाजे बीन
सख्या रे, अनुदिन चीज नवीन

बा. भ. बोरकरांची काय सुंदर कल्पना आहे पहा.
कविता संपूर्णत: अध्यात्मिक वळणाने जाते.
ते म्हणतात ..

हे जे माझे, अव्यंग शरीर-मन आहे, ते बीन म्हणजे.. एखाद्या पुंगी-वाद्यासारखे आहे.
कवितेत ते या शब्दांत येतं .........
' सौभाग्ये या सुरांत तारा '

आणि त्यातून हा जो प्राणवायू आत-बाहेर करतोय त्यामुळे, हरघडी.. हरक्षणी एक वेगळीच सुरावट, अनोखी लयकारी बाहेर पडते.
ती कधी शांत-प्रसन्न मंत्रघोषासारखी असते .. तर कधी उगीच वायफळ .. अर्थहीन तराण्यासारखी .. तर कधी फारच कठीण .. जीवाचा लचका तोडणार्‍या अवघड तानेसारखी.

आणि हे वाजवणारा ..
या शरीररूपी वाद्यातून .... प्राणवायू फुंकून .... ही सुरावट काढणारा ... आहे तरी कोण ? ......
अर्थात ... साक्षात परमेश्वर.......
तो तर काय .. अलख निरंजन...... सहजपणात प्रवीण .....

जसा पारा हातात पकडायचा प्रयत्‍न केला तरी हाती लागत नाही.. तसा ह्या शरीररूपी वाद्याच्या तारा छेडणारा परमेश्वर आपल्या हाती येत नाही.
त्याचे अस्तित्व तर जाणवते... हे आपल्याकडून कुणीतरी सर्व करून घेत आहे, याची जाणीवही असते... पण ’तो’ मात्र आकलनाच्या पलीकडेच रहातो.

सख्या रे, झिणिझिणि वाजे बीन ..

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कवी सुधीर


कवी सुधीर मोघे यांच्यावरचे हे माझे खरं तर दुसरे लिखाण. या आधीचे आणि हे, दोन्हीत एक समान सूत्र आहे आणि काही असमान धागे.
समान असे की या दोन्हीत त्यांची 'जीवनी' अशी नाही. किती पुस्तके लिहिली? कोणते पुरस्कार मिळाले? यात ते अडकलेलं नाही. पण,
पहिलं त्यांच्या निधनाच्या दुसर्‍याच दिवशी लिहिलेलं. त्यामुळे उत्‍स्‍फूर्त आणि काहिसं अचानक आलेल्या पोरकेपणाने बावरून गेल्यासारखं. तरी त्यांना वाहिलेली ती आदरांजली असल्याने त्याचे महत्त्व वेगळे.
दुसरे आजचे.. त्यांच्या निधनानंतर सहा महिन्यांनी लिहिलेलं. भावनेच्या पगड्याच्या थोडं बाहेर येत.

त्यांच्या कविता-गाण्यांचे अवलोकन करण्याची किंवा त्यांची साहित्यिक मीमांसा करण्याची माझी योग्यता नाही. 'आठवणीतली गाणी' या माझ्या उपक्रमामुळे त्यांच्या गीतलेखनात दिसलेले सुधीरजी आणि आमच्या सात-आठ वर्षांच्या ओळखीतून दिसलेले काव्याबाहेरचे सुधीरजी.. यांच्याशी झालेल्या चर्चांतून माझे काव्यानुभव समृद्ध झाले आणि मराठी भाषेच्या ज्ञानाची कक्षा रुंदावत गेली.

अलीकडचे प्रसिद्ध कवी वैभव जोशी त्यांच्या एका कवितेत म्हणतात,
'रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते.. '

पण जर कुणाला अशी 'एखादी'च नाही, तर अशा अनेक 'कविता पानोपानी' सुचल्या असतील तर.. त्यांना काय म्हणावे? कविवर्य, कविश्रेष्ठ? आणि त्याही पुढे जाऊन, ते जर फक्त शब्दचित्रेच नाही तर रंगचित्रे, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय सादरीकरण, पटकथालेखन.. असंही बरंच काही करत असतील तर?

सुधीर मोघे यांना मात्र त्यांची 'कवी सुधीर' अशी सुटसुटीत ओळख करून दिलेली अधिक आवडायची. 'Poet Sudheer' अशी झोकदार इंग्रजी सही ते करायचे. कारण कवितेव्यतिरिक्‍त इतर कुठल्याही माध्यामातून व्यक्त होणं, हे त्यांच्या 'कवी' असण्याशी निगडीत आहे, असं त्यांना वाटायचं. त्यांच्याच शब्दांत सागायचं तर, "माझ्या प्रत्येक असण्याला माझ्या कवी / poet असण्याचा base आहे, संदर्भ आहे." आमच्या चर्चेत हे त्यांचं कवी असणं भरून असायचं.

टेरिकॉटची पॅंट, ढगळसा झब्बा. अशी अनौपचारिक वेषभूषा. 'पद्मा फूड्स' हा अनौपचारिक गप्पांचा तितकाच अनौपचारिक अड्डा. जवळपास पन्‍नास वर्षांची कारर्किर्द. सांगण्यासारखे प्रचंड काही आणि ते सांगतासांगता समोरच्याला जाणून घेण्याची खुबी..

त्यांची कविता शब्दबंबाळ नाही. शैली मिताक्षरी. थोडक्यात आणि मार्मिक. बुद्धीवादी, तर्कनिष्ठ आणि त्याचवेळी तरल. scientific temperची झलक असणारी. परमेश्वराच्या सगूण आणि निर्गूण, दोन्ही रूपांचं एकाच तन्मयतेने वर्णन करणारी..

शब्दांवर प्रेम करताना त्यांच्या आहारी न जाता.. त्यांच्याकडे केवळ माध्यम म्हणून पाहताना, शब्दांविषयी ते म्हंटतात..

शब्दांच्या नकळत येती.. शब्दांच्या ओठी गाणी..
शब्दांच्या नकळत येते.. शब्दांच्या डोळा पाणी..

शब्दांना नसते दु:ख.. शब्दांना सुखही नसते..
ते वाहतात जे ओझे.. ते तुमचे माझे असते..

सुधीरजी एकदा म्हणाले होते, "मुकुंद (फणसळकर) म्हणतो, माझ्या प्रत्येक कवितेत-गाण्यात माझी सही असते. तुला वाटतं तसं?" त्यांचं काव्य-गीत लेखन जवळजवळ मुखोद्गत असल्याने मी लगेचव रुकार दिला. म्हंटलं, "हो. हो. नक्कीच.
'सांज ये गोकुळी' मध्ये .. 'पर्वतांची दिसे दूर रांग .. काजळाची जणू दाट रेघ',
'सूर कुठूनसे आले अवचित' मध्ये .. 'रूप स्वरांचे तरल.. अपार्थिव',
'सांज ये गोकुळी' मध्ये .. 'सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या',
.. या तुमच्या सह्याच तर आहेत."

'मन' या विषयावर सुधीरजींना खरं तर Ph.D. मिळायला हवी होती. एका कवितेत ते म्हणतात .. 'मन मनास उमगत नाही .. आधार कसा शोधावा ! .. चेहरा-मोहरा ह्याचा कुणि कधी पाहिला नाही .. धनि अस्तित्वाचा तरिही ह्याच्याविण दुसरा नाही.' आणि असंही .. 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' याच कवितेत 'मन'च कसं आपल्या भावविश्वावर नियंत्रण ठेवतं हे सांगताना, 'तुझ्यामधे सामावला वारा, काळोख, प्रकाश'. एका ठिकाणी .. 'मनाचिया घावांवरी मनाची फुंकर ..' आणि 'मन' ते 'कविता' असा प्रवास ...

एकांत, लेखणी, कागद- वाया सारे
मन कागदाहुनी निरिच्छ अणि कोरे
गिरविता अहेतुक रेषांचे गुंडाळे
बोटांवर अवचित मन ओठंगुन आले.

सुरेश भट, शांता शेळके, कुसुमाग्रज यांच्यावर 'झी मराठी' या दूरचित्र वाहिनीने केलेल्या 'नक्षत्रांचे देणे' कार्यक्रमांचे लेखन सुधीरजींनी केले आहे. एकदा त्यावर बोलत असताना, समोर बसल्याबसल्या त्यांनी संवादिनी घेतली. ती त्यांच्या खोलीत असायचीच. आणि चक्क सुरेश भटांचं 'रंगुनी रंगात सार्‍या रंग माझात वेगळा' गायला लागले आणि म्हणाले, "देवकी (पंडीत) अंदाजे सतरा वर्षांची असताना मी तिला हे गाणं शिकवलं ते असं. तेव्हा कोवळ्या वयामुळे तिला गीताचा संपूर्ण अर्थ उमगलाच होता, असं म्हणता येणार नाही. ती, मी शिकवलेली चाल या लयीत म्हणायची. आता थोडी ठायमधे असते. पण हा 'तिचा' व्यक्त होण्याचा भाव आहे."

'लय' वरून आठवलं ..

लय एक हुंगिली खोल खोल श्वासात,
ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात,
लहडला वेल... तो पहा निघाला गगनी,
देठांना फुटल्या - कविता पानोपानी

सुधीरजी म्हणायचे, "एकदा कविता लिहिली की तिचे नशिब माझ्या हातात नसते. ती तिच्या मार्गाने जाते .. मी माझ्या .."
एक कवी आपल्या कवितेकडे इतक्या निर्ममपणे तेव्हाच पाहू शकतो जेव्हा कुठल्यातरी पातळीवर कवितालेखन हे त्याच्यासाठी ध्यानसाधनेसारखं असतं.

मी ओंजळ माझी रितीच घेऊन आलो
जाताना- ओंजळ रितीच ठेवून गेलो
ओंजळीत आल्यागेल्या श्रेयांवरती;
पण पुसट.. कोवळे नाव ठेवुनी गेलो.

ह्या नि:शब्दांच्या आड कुजिते कसली?
पानांच्या रेषांतुनी भाकिते कुठली ?
होशील एकटा तू देहाच्या पैल
सोबतीस तेथे कविता फक्त असेल

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

The caucus race


कालच्या Dubai Women's Run ( ‪#‎DHWomensRun‬ ) मध्ये ६२.०५ मिनिटांत १० किलोमीटर्स पळाले. छान वाटलं.
ते नखशिखांत घामात निथळणं.... that sudden rush of energy....
हे ते 'किक' की काय म्हणतात नं.. तसं असतं.

पण गेल्या वेळेपेक्षा तब्बल साडेपाच मिनिटं जास्त लागली. लागू देत.
तो दिवस वेगळा होता. आजचा वेगळा.
अंतिम रेषा पार केली आणि स्वत:लाच सांगून टाकलं... येस्स, मी जिंकले !!
कारण व्यक्तीश: हे माझ्यासाठी हे लांब पल्ल्याचं पळणं, रोजचा दिवस आणि आयुष्यच एकंदरीत, 'कॉकस रेस' सारखं आहे.

पण हा दृष्टिकोन माझा नाही. लेकाने पहिलीत असताना त्याच्याही नकळत शिकवलेला.
शाळेतून घरी आल्यावर त्याने सांगितलं, "उद्या पळण्याची शर्यत आहे."
त्या वयातही पुस्तकांतच नितांत रमणारं माझं हे लेकरू फार काही पळेल अशी अपेक्षा नव्हती. तरी उगीच उत्सुकता म्हणून दुसर्‍या दिवशी विचारलं तर म्हणाला, "मी पहिला आलो."
"कसं शक्य आहे आशय? तुला कोणी सांगितलं?"
"असं कोणी कोणाला सांगत नाही. ॲलिसच्या गोष्टीत नाही का ती 'कॉकस रेस' सगळेच जिंकतात.. तसं आपणच ठरवायचं असतं."

The caucus race.
Alice's Adventures in Wonderland ह्या पुस्तकात Lewis Carroll यांनी एका छोटेखानी परिच्छेदात वर्णन केलेली.

वरवर लहान मुलांसाठी वाटणार्‍या या पुस्तकात, तशा nonsensical वाटणार्‍या अनेक घटना satire पद्धतीने मोठ्यांसाठी एवढं काही सांगून जातात.
ॲलिसच्या अश्रूंच्या तलावात तिच्यासकट अनेक प्राणी बुडून ओले झालेत. कोरडे होण्यासाठी डोडो सगळ्यांना पळण्याची शर्यत सुचवतो. ह्या शर्यतीला जशी सुरुवात नाही तसा शेवटही नाही. ती एका वर्तुळात होते... म्हणजे सगळे एका गोलात फिरतात.. कोणी मधूनच सामील होतं तर कोणी मधूनच सोडूनही जातं. आणि तरी सगळे जिंकलेले असतात.

थोडक्यात,
कोणी कुठुनही निघत नाही आणि तसंच कुठेही पोचत नाही.
या गोलगोल फिरण्याच्या शर्यतीत जन्माला येणारा प्रत्येक जीव कुठेतरी सामील होतो.
एखादा मधूनच, अचानक बाहेर पडतो आणि आपल्या पारलौकिक प्रवासास निघून जातो.
आणि दोन बिंदूंमधील अंतर पळताना तो स्वत:ला विजयी ठरवतो. नव्हे, तो असतोच.
कारण रोजच्यारोज त्याने, त्याच्या स्वत:च्या, अत्यंत व्यक्तीगत, फक्त त्यालाच जिचं संपूर्ण आकलन आहे अशा.. परिस्थितिवर मात करण्याचा प्रयत्‍न केलेला असतो.

कालच्या पळण्यास जास्त वेळ लागल्याचं रत्तीभरही दु:ख न होण्याचं, विजयी समजण्याचं, हेच कारण होतं.
नुकतेच झालेले मानेतील bulging disc चं निदान. त्यामुळे दुखरा उजवा खांदा आणि हात.
माझ्या नेहमीच्या दिनक्रमात कुठलाही बदल होऊ नये यासाठी pain management शिकवणारे माझे अतिशय प्रेमळ मित्र डॉ. सुरेंद्रन आणि समिरा..
साडेपाच मिनिटं काहीच जास्त नाही.

दोन वर्षांच्या पिल्लाला stroller मध्ये घेऊन पळणारी एक आई, Dubai maids services चा group........ अशा आम्ही मिळून सार्‍या अंदाजे ५००० जणी, एका स्वयंस्फूर्तीच्या आणि परिपूर्णतेच्या जाणीवेने सामाधानी होतो.


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

२०१४


पहाटेच्या थंडगार वार्‍यासारखं..... अजून ऊन न झेलेलं..
नव्या कोर्‍या साडीसारखं..... अजून घडी न मोडलेलं..
नुकत्याच केलेल्या कागदाच्या होडीसारखं..... अजून पाण्यात न सोडलेलं............. ⛵

....... एक अख्खं नवं कोरं कॅलेंडर........................
१२ पानांचं आणि ३६५ चौकोनांचं....
.... अगणित अपेक्षांचं ओझं वाहणार्‍या..... मोजून नेमक्या क्षणांचं......

.. उत्साह.. योजना.. उत्कंठा.. प्रार्थना............
या नव्या रोजनिशीचं रोजचं पान लिहिताना.................
हे मना, माझा हात कधीही न थरथरो...... !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS